मंगळवार, १८ ऑगस्ट, २०१५

बाबासाहेब पुरंदरे
























बरं झालं शिवाजी महाराज ब्राह्मण नव्हते नाही तर “साहेबांच्या” जाती पातीच्या राजकारणात महाराज पण भरडले गेले असते.
पूर्वी कधी तरी काका विधातेच्या “संताजी” कादंबरीत एक उल्लेख होता. संताजी घोरपडे लहान असताना त्यांना शिकवणाऱ्या केशव भटांना त्यांनी विचारलं “स्वाभिमान आणि स्वामीनिष्ठा यात फरक काय “ केशव भटांनी दिलेल्या उत्तराचे नेमके शब्द मला आठवत नाहीत पण त्याचा अर्थ असा होता “स्वत:चा आणि स्वकीयांचा मान राखण्यासाठी जीवाची बाजी लावणं हा स्वाभिमान आणि स्वत:च्या स्वामीसाठी आप्त स्वकीयांच्या जीवावर उठायला तयार असणं ही स्वामीनिष्ठा”

“साहेबांच्या” श्वानपथकातल्या स्वयंघोषित इतिहासाचार्यांना ह्या पुढेही “साहेबांच्या धोरणानुसारच” नवीन नवीन शोध लागत राहतील आणि स्वामीनिष्ठेचं प्रदर्शन करण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखे शिव चरित्राचे कीर्तनकार त्यात भरडले जातील.... या सगळ्यात वेगळं किंवा आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.

मी इतिहासाचा अभ्यासक वगैरे नाही पण वाचक नक्की आहे. बाबासाहेब पुरंदरेनी महाराजांवर लिहायला बोलायला सुरुवात केली त्या आधी देखील महाराजांवर लिहीलं जात होतंच की, पण ती भाषा माझ्यासारख्या “मध्यमवर्गीय” अक्कल असणाऱ्याला न झेपणारी होती. तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी भगवत गीता साध्या सोप्या....त्या वेळच्या सर्वसामान्यांच्या भाषेत आणली....मला तुलना नाही करायची पण माझ्यासाठी ऋषीतुल्य बाबासाहेब पुरंदरेनी तसंच काहीसं केलं.

“साहेबांच्या” श्वानपथकात स्वेच्छेने भरती झालेल्यात मुंब्र्याच्या अनधिकृत वस्तीचा पुळका असणाऱ्या गावगुंडांपासून आयुष्यभर कुसुमाग्रजांवर भूंकून निर्लज्जपणे त्यांच्याच नावाचा पुरस्कार स्वीकारणारे पण आहेत याचं वाईट वाटतं.

काल तर ऐकलं की उदयनराजे भोसले पण आता बाबासाहेबांच्या विरोधात बोलताहेत .......हा विरोध त्यांनी सकाळी नोंदवला की संध्याकाळी हेही तपासून बघावं लागेल.

नकाच देऊ बाबासाहेबांना पुरस्कार काही फरक नाही पडत ...........महाराष्ट्राच्या घराघरात बाबासाहेबांनी लिहिलेलं शिवाजी महाराजांचं चरित्र आज भगवत गीता आणि ज्ञानेश्वरीच्या बरोबरीने जपलं जातं हाच खरा पुरस्कार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: