मी वाचलेली पुस्तकं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मी वाचलेली पुस्तकं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १६ मार्च, २०१६

लस्ट फॉर लालबाग - विश्वास पाटील



मुळात मी विश्वास पाटलांच्या लिहीण्याचा कट्टर भक्त, सर्वात पहिली कादंबरी वाचली ती झाडाझडती. मग व्यसनच लागलं पाटलांच्या लिहीण्याचं. चंद्रमुखी, पानिपत, पांगिरा, महानायक , संभाजी, नाना पाटलांवरचं क्रांतीसुर्य, रणांगण अशी जवळपास सगळीच पुस्तकं आधाशासारखी वाचून काढली.
बरेच दिवस येणार येणार ऐकलेलं लस्ट फॉर लालबाग हातात पडेपर्यंत जीव वरखाली होत होता. पुस्तक वाचायला घेतलं...... जसजसं पुस्तक वाचून होत गेलं तसतसा मी मात्र पुस्तकापासून Disconnect होत गेलो. काही तरी चुकतंय असं वाटत राहिलं. इच्छा होत नव्हती तरीही शेवटपर्यंत वाचून काढलं.


Normally चांगल्या कादंबरीवरून चित्रपट काढला जातो पण पुस्तक वाचताना सतत कुठे तरी असं वाटत राहिलं की कुठल्या तरी “मसाला” चित्रपटावरून ही कादंबरी लिहीली आहे. गिरणी कामगार .......बंद पडत चाललेल्या गिरण्या .......दत्ता सामंतांनी कामागारांसाठी दिलेली झुंज .......त्याच वेळी गुन्हेगारी विश्वाचा मुंबापुरीवर वाढत चाललेला प्रभाव ............आणि चोरावर मोर असलेले राजकारणी........त्यातच नायकाची प्रेमकथा ........तत्त्वासाठी झगडणारा त्याचा बाप .............आणि मग कलाटणी देणारा ........अनपेक्षित शेवट.... हे सगळं सगळं आहे कादंबरीत

वास्तव चित्रपटातला संजय दत्त सापडला कादंबरीत, जागोजागी दिवार मधला अमिताभ सापडला,“अपहरण” चित्रपटातला अजय देवगणचा बाप सापडला कादंबरीत, वास्तव मधलीच रिमा लागू पण सापडली .........फक्त माझ्यासाठी “ग्रेट” असलेले विश्वास पाटील मात्र शेवटपर्यंत नाही सापडले मला कादंबरीत.

त्यांच्या आधीच्या लिखाणामुळे माझ्याच अपेक्षा मी खूप वाढवून ठेवलेल्या असतील किंवा असंही असेल की मला कादंबरी कळलीच नाहीये. 

शनिवार, २५ जुलै, २०१५

हत्या– श्री.ना पेंडसे



लेखक – श्री.ना पेंडसे

पुस्तकाचं नाव वाचून मला वाटलेलं “हत्या” म्हणजे खून ह्या अर्थी, एखादी रहस्य कथा असावी पण मग कळलं ते कादंबरीतल्या एका व्यक्तिरेखेचं नाव आहे.
जेमतेम कळायला लागणाऱ्या वयातल्या एका मुलाची ही कथा. ढीगभर दुःख आणि गळ्यापर्यंत अडचणी सोसत पुढे जात राहणाऱ्या एका कोवळ्या जीवाची जीवघेणी धडपड. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता साधं दिसणारं पण वळणा वळणांनी पुढे जात राहणारं खिळवून ठेवणारं कथानक.

“तुंबाडचे खोत” प्रमाणेच तत्कालीन परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहते, वाचता वाचता आपणही त्या काळाचा, हत्याच्या आयुष्याचा एक भाग होवून जातो.


खूप छान कादंबरी 

शुक्रवार, २४ जुलै, २०१५

शांताराम - ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स




लेखक ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स
अनुवादक : अपर्णा वेलणकर

एक परदेशी गुन्हेगार भारतात येतो आणि मग इथलाच होवून राहतो. आत्मचरित्राच्या नावाखाली जवळपास १००० पानांचं एक थोतांड. माझ्या मते फार तर ३०% सत्य आणि ७०% कल्पना.

मुंबईतल्या अंडरवल्ड मध्ये हिरोगिरी करून, अनेक बदले वगैरे घेऊन, एकेकट्याने हाणामाऱ्या करून, समाजकार्य करून समाधान होत नाही म्हणून अफगाणिस्तानात जाऊन लढून, जिवंत परतलेल्या एका साहसावीराची सुरुवातीला खरी वाटणारी आणि नंतर नंतर कल्पनाविलासात भरकटलेली कादंबरी. जबरदस्त "मार्केटींग" मुळे अपेक्षा उंचावणारी एक पोकळ कथा एवढंच मला म्हणता येईल.

अपर्णा वेलणकरांनी केलेला अनुवाद मात्र मानावा लागेल. संपूर्ण पुस्तक मराठीतच प्रकाशित करून मग त्यावरून इंग्रजी अनुवाद केला असावा असं वाटावं इतपत उत्कृष्ठ अनुवाद.

गुरुवार, २३ जुलै, २०१५

पर्व - डॉ. एस. भैरप्पा


मुळ कन्नड लेखक डॉ. एस. भैरप्पा

अनुवाद उमा कुलकर्णी

माझ्या अंदाजाने महाभारत हा एक असा विषय आहे ज्यावर आजवर सगळ्यात जास्त लिहीलं आणि वाचलं गेलंय. मी आजवर वाचलेल्या आणि मला कळलेल्या महाभरतापेक्षा सर्वस्वी वेगळं "महाभारत" डॉ. भैरप्पानी "पर्व" मधे मांडलंय.

आजवर महाभारत म्हणजे चमत्कार आणि अमानवीय शक्ती प्राप्त असलेल्या चांगल्या / वाईट व्यक्तींमधला संघर्ष इतकंच कळलं होतं. पर्व मधे डॉ. भैरप्पानी चमत्कार किंवा अमानवीय गोष्टींना फ़ाटा दिलाय. चमत्कार गाळल्यामुळे कोणतीही व्यक्तीरेखा छोटी होत नाही उलट त्यामुळे प्रत्येक घटनेची कारणमिमांसा करणं सोपं झालं.

पर्वमधे चमत्कार नाहीत, प्रत्येक व्यक्तीरेखेला मानवी चेहेरा मिळालाय तसंच त्यांचं वागणं बोलणं त्यांच्या भावना ह्या प्रत्येक गोष्टीला human touch मिळाल्यामुळे पुस्तक वाचताना नकळत आपण स्वतः देखील महाभरताचा एक भाग बनुन जातो. चुक की बरोबर हे जरी ठरवता नाही आलं तरी प्रत्येक घटनेची माझ्या परीने मला कारणं शोधता आली.

डॉ. भैरप्पानी मांडलेले दोन मुद्दे पटले आणि मनात कायमचं घर करुन बसले.

१. युधिष्ठीराच्या जुगारातल्या पराभवाबद्दल लिहीताना डॉ. भैरप्पा म्हणतात ध्युत खेळायला संपत्ती लागते पण जिंकण्यासाठी अजुनही बरंच काही लागतं.
२. द्रौपदी बद्दलच्या इतरांच्या लालसेबद्दल लिहीताना डॉ. भैरप्पा म्हणतात पाच पतींबरोबर संसार आणि पर्यायाने शय्या सोबत करणाऱ्या स्त्री बद्दल समाजात जरा जास्तच लालसा निर्माण होते.

महाभारत एका वेगळ्या अर्थाने समजुन घ्यायचं असेल तर अवश्य वाचावं असं पुस्तक.


मंगळवार, २१ जुलै, २०१५

एम. टी. आयवा मारु - अनंत सामंत



लेखक - अनंत सामंत

पुस्तकाचं नाव वाचल्यावर वाटलं भाषांतर असेल पण नंतर कळलं मुळ मराठीच पुस्तक आहे.

अथांग सागर आणि हा सागर पार करायला लागणारी दुर्दम्य इच्छाशक्ती. निसर्गाशी, स्वतःच्या भावनांशी, मर्यादांशी अपुऱ्या साधनांच्या सहाय्याने टक्कर देत पुर्ण केलेली एक भयाण सफ़र.

बापाच्या विकृतीवर विकृत सुड घेणारी उज्वला, खेडवळ पत्नीला पाश्च्यात्य संस्कृतीत वावरायला तयार करायला धडपडणारा, प्रसंगी त्यासाठी तिच्या भावनांचा विचार न करता लैंगिक विकृतीकडे झुकणारा दीपक, ह्या सगळ्या छळवादातुन जवळपास वेडी झालेली उज्वला, वेश्यालय चालवणारी ॲना  प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे वेगळं अस्तित्व आहे तरी एक क्षण असा येतो की प्रत्येकाचा शेवटही एकच दिसु लागतो. त्यावेळी प्रत्येकाचं वागणं प्रत्येकाच्या मर्यादा अधोरेखित करतात.

जहाजावरचं आयुष्य, तिथली दडपणं तिथले धोके आणि ह्या सगळ्याला कसलीही भिक न घालणारा व्यवहार खुप संयमित भाषेत चित्रीत केलाय सामंतांनी.


पुस्तक वाचुन झाल्यावर मानवी विकृती, हव्यास, निसर्गाशी लढताना दिसणाऱ्या मर्यादा सगळं सगळं आपल्यावर अनेक ओरखडे उठवुन जातं.

गवत्या - मिलिंद बोकील



लेखक – मिलिंद बोकील

एका  भरकटत राहिलेल्या, अस्वस्थ पण सुशिक्षित आणि सुसंस्कृत भटक्याची ही कहाणी. अफाट लेखनशैलीमुळे गवत्या, बाज्या, अनु, मेहेर , गुरुजी, जानकी अगदी एकूण एक पात्र उभी राहतात डोळ्यासमोर.

सगळ्या भरकटण्यात एक सुसूत्रता दिसते, आकांडतांडव न करता, तत्त्ववेत्त्याचा आव न आणता स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून जाणवत राहतो.

खूप संथ कहाणीचा शेवट मात्र मला नाही आवडला .....”Typical Happy Ending “

एकूण कादंबरी मात्र “शाळा” इतकी  नाही पण खिळवून ठेवते एवढं नक्की 

गुरुवार, १४ मे, २०१५

तुंबाडचे खोत ( भाग पहिला ) - श्री.ना. पेंडसे



लेखक  - श्री.ना. पेंडसे

पेशवाईच्या अस्तानंतर कोकणातील बऱ्यापैकी सधन "खोत" घराण्याची  साधारण चार पिढ्यांची कथा. कादंबरी काल्पनिक असली तरी त्या त्या काळात चपखल बसणाऱ्या व्यक्तीरेखांमुळे कादंबरी वाचताना आपल्याला त्यातील व्यक्ती, घटना खऱ्या वाटु लागतात.

ब्राह्मण समाजाचं त्या काळातील समाजावरील वर्चस्व, दादा खोताच्या करारी, कठोर मुखवटयामागे लपलेली लिंगपिसाट वृत्ती, त्याच्या अघोरी शिक्षा ह्या सगळ्यातुन त्या काळातल्या सरंजामशाही मानसिकतेचं किळसवाणं दर्शन होतं. शेवटी अघोरी विद्या प्राप्त करण्यासाठी नरबळी देउन ह्या सगळ्याचा कळस होतो आणि त्या हव्यासापोटी तुंबाडकरांची एक पिढीच गारद होते.

पुढची पिढी म्हणजे गणेशशास्त्रींची पिढी, सभ्य सात्विक स्वभाव आणि आयुर्वेदाचा प्रचंड अभ्यास ह्या जोरावर पुन्हा घराण्याला प्रतिष्ठा प्राप्त होते पण शास्त्रीबुवांनंतर पुन्हा घराणं रक्तातल्या सरंजामशाहीकडे वळतं.

कादंबरीत वेगवेगळ्या व्यक्तीरेखांमधुन तत्कालीन सामाजिक परिस्थीतीवरही प्रकाश टाकला गेला आहे, टिळक श्रेष्ठ की गांधी ह्या वादाची पाळंमुळं त्या काळातील समाजव्यवस्थेत होती असंही जाणवतं. स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेणारा विश्राम, वाघावर झेप घेणारा बजापा, त्या काळच्या रुढींना आव्हान देत शाळेत शिकवणारी ताई, शाळेसाठी जीवाचं रान करणारा नरसु, प्रेमासाठी आयुष्याची होळी करणारी जुलाली अशा व्यक्तीरेखा नकळत आपल्या काळजात घर करुन जातात.

अन्नात केस आला म्हणुन रखेलीसारख्या ठेवलेल्या मोलकरणीचे केस भादरणारा दादा खोत
रोग्यांकडुन एका पैशाचीही अपेक्षा न ठेवता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झटणारा गणेशशास्त्री
खुले आम रखेल्या ठेउनही सख्ख्या भावांच्या बायकांशी संबंध ठेवणारे, प्रसंगी बलात्कार करणारे जुळे,
निडर साहसी पण जुलालीच्या प्रेमात तिला शेवटपर्यंत साथ देणारा बजापा
गुरासारखा मार खाउनही अन्यायाविरुद्ध पाय रोवून उभा राहाणारा आणि नंतर स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेणारा विश्राम, 
दिराकडून झालेल्या बलात्कारातून दिवस गेल्याचे कळल्यावर जीव देणारी गंगा
असा हा वळणावळणांचा, चढउतारांचा तुंबाडच्या खोतांचा इतिहास अस्वस्थ करणारा आहे.


मंगळवार, ५ मे, २०१५

शहेनशहा - ना.सं. इनामदार




लेखक  - ना.सं. इनामदार

साधारण ३०० वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या छाताडावर दैत्य होऊन नाचलेला एक क्रूर सेनानी - औरंगजेब

आजवर औरंगजेब म्हणजे खलनायक, एक क्रूर, पाशवी शक्ती लाभलेला इस्लामी शहेनशहा एवढंच ऐकलं होतं. इनामादारांनी कादंबरीच्या स्वरुपात मांडल्यामुळे असेल कदाचित पण मला मात्र हा खलनायक , खलनायक न वाटता एक जबरदस्त सेनानी, कुशल राजकारणी आणि कडवा मुसलमान वाटला. अफाट सत्तेची हाव असणं हे ३०० वर्षापूर्वी तरी निश्चितच "खलनायक" बनण्यासाठी पुरेसं नव्हतं. त्याने भावांना मारलं नसतं तर मुघल परंपरेप्रमाणे त्याला त्याच्या भावांनी मारलं असतं. तो जगला, त्याने राज्य केलं कारण तो त्यासाठी सक्षम होता, लायक होता.

त्याला शिकवल्या गेलेल्या, समजावल्या गेलेल्या इस्लामचं त्याने आयुष्यभर पालन केलं.

मला इतिहास माहीत नाही पण ना.सं. इनामदारांनी "मांडलेला" शहेनशहा मात्र मला खटकला नाही कारण त्याच्या वागण्याचं त्याच्याकडे Justification" होतं.

सोमवार, २७ एप्रिल, २०१५

नॉट विदाउट माय डॉटर - बेट्टी मेहमुदी


मूळ लेखिका बेट्टी मेहमुदी,

अनुवाद लीना सोहोनी

अमेरिकन संस्कृतीत वाढलेली एक तरुणी मूळच्या इराणी मुस्लीम डॉक्टरच्या प्रेमात पडते, त्याच्या भूलाथापाम्ना बळी पडून काही काळासाठी इराणला जायला तयार होते आणि माग मात्र त्याचा खरा चेहरा बघून उध्वस्त होत जाते. पराकोटीचे अत्याचार सहन करूनही लेखिका स्वदेशी परतते.

सतत प्रचंड अपमान , अनन्वित अत्याचार सोसूनही शेवटच्या क्षणापर्यंत वाघीणीसाराखी लढणारी एक समर्थ आई, एक एकाकी स्त्री एका बाजूला तर पराकोटीचा इस्लामी पुरुषसत्ताक समाज एका बाजूला. असा हा खरं तर असमान लढा.

वाचायला घेतल्यावर शेवटच्या पानापर्यंत पुस्तक हातून सोडवत नाही एवढं मात्र खरं.

बुधवार, २२ एप्रिल, २०१५

उचल्या - लक्ष्मण गायकवाड


लेखक - लक्ष्मण गायकवाड


१९८७ मधे प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकाच्या जवळपास ६/७ आवृत्ती निघाल्या. स्वातंत्र्याचा अर्थही पुरेसा न कळलेल्या, मुख्य प्रवाहापासुन जाणुन बुजुन लांब ठेवल्या गेलेल्या एका समाजाची ही कहाणी.

लेखकाने मनोगतात सांगितल्याप्रमाणे सदर पुस्तकाचे साहित्यीक मुल्य काय आहे ? पुस्तकातुन सामान्य माणसाला काय मिळालं ? असले वांझोटे प्रश्न पुस्तक वाचल्यावर पडत नाहीत. जे आहे ते गावाबाहेरचं खरकटं वास्तव.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच पोलिस "आजीच्या थानाला धरु धरु मारत होते " असं वाक्य येतं आणि माझ्यातल्या पांढरपेशा मध्यमवर्गीय हादरतो. आमच्या पिढीजात शहरी चौकटीतुन आम्हाला असलं हिडीस कधी काही दिसलंच नाही. संपुर्ण पुस्तक वाचताना आपण त्या किळसवाण्या जगाचा भाग होवुच शकत नाही. लांब बसुन एखादया डबक्यातल्या किडयांची वळवळ पहावी तितक्या अलिप्तपणे मी हे पुस्तक वाचलं.

उंदीर भाजुन खाणं, मांजर खाणं नुसत्या कल्पनेनीही आपल्याला मळमळल्यासारखं होतं पण कुठे तरी आपल्या स्वच्छ, हायजीनीक वगैरे जीवनशैलीवर घणाचे घाव घातल्यासारखं वाटतं. चोरीचं शिक्षण देताना मार खायचं पण शिक्षण दीलं जातं. ह्या शिक्षणात "नागडं करुन गांडीत मिरचु भरलं" तरी तोंड बंद ठेवायला शिकवलं जातं. पोलिसांचा खबरी म्हणुन लेखकाच्या आजोबाला राजरोस पणे कु-हाडीचे घालुन मारलं जातं तरीही कुठेही तक्रार न करता प्रकरण दाबलं जातं. एकुणच मुख्य प्रवाहातील कायदा व न्याय व्यवस्थेवरचा अविश्वासच ह्यातुन प्रतिबींबीत होतो.

पुढे एका प्रकरणात बापानेच मुलीला बायकोप्रमाणे "वापरल्याचा" उल्लेख येतो, जातपंचायतीकडुन त्याला शिक्षाही ठोठावली जाते. अशिक्षीत, असुनही किमान नितीमत्तेचं भान ह्या समाजाला असल्याची ही खुण वाटते.

ह्या जमातीवर चोर जातीचा शिक्का ब्रिटीशांनी मारला, व्ही. टी. ( आताचं छत्रपती शिवाजी टर्मिनस ) च्या इमारतींसारखाच आपण हा शिक्काही अभिमानाने जपला.

शिक्षणाशी दुरान्वयेही संबंध नाही, चोर म्हणुन नोकरी नाही, शेतीवाडी नाही अशा परिस्थीतीत पोलिस आणि इतर उच्च्वर्णीयांकडुन केली गेलेली पिळवणुक, लेखकाचा तक्रारीचा सुर कुठेच दिसत नाही जे आहे जसं आहे तसंच्या समोर ठेवलं गेलंय.

पुस्तकाच्या शेवटच्या भागात लेखकाने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणुन केलेले प्रयत्न दिसतात. दलितांचा वापर आजही फ़क्त "व्होटबॅंक" म्हणुनच केला जातो हे वास्तव समोर येतं. राजकारण्यांना दलित मतं हवी असतात पण सत्तेच्या सारीपाटात बरोबरीचं स्थान देण्यात आजही कमीपणा मानला जातो.

पुस्तक वाचुन झाल्यावरही मला सावरायला बराच वेळ लागला. आपणच आपल्याला प्रश्न विचारत राहतो आणि निरुत्तर होवुन आपलीच कीव करत राहतो.


रविवार, १२ एप्रिल, २०१५

राडा - भाऊ पाध्ये



लेखक - भाऊ पाध्ये

आपल्या पिढीला भाऊ पाध्ये हे नाव माहित असणं जरा अवघड आहे. मुळात भाऊ पाध्येंची पुस्तकं विकत मिळणंच खुप अवघड आहे. साधारण १९७५ साली प्रकाशीत झालेलं हे पुस्तक १९९६ साली निखिल वागळेंनी पुनः प्रकाशीत केलं.

एकंदर भाऊ पाध्येंचं लिखाण मला कायम परखड समाजवादाकडे झुकणारं वाटत आलय. "राडा" घडत जातो तो शिवसेना महाराष्ट्रात रुजली तेव्हाच्या काळात. शिवसेनेची तेव्हाची मानसिकता, आणि त्याचे समाजावर होत असलेले परिणाम ह्यांचं सुरेख चित्रण राडामधे वाचायला मिळतं.

सधन अण्णेगिरी कुटुंब, अण्णेगिरी कुटुंबातला लाडका मुलगा मंदार, लाडातुन आलेला हट्ट्ट्टीपणा, नैसर्गीक निडर स्वभाव तरीही आतुन खुप हळवा मंदार अण्णेगिरी ही राडा मधली सर्वात महत्त्वाची व्यक्तीरेखा भाऊ पाध्येंच्या लेखणीतुन समर्थपणे आपल्या समोर उभी रहाते. तुसडया, विक्षीप्त मंदारबद्दल कुठे तरी आत नकळत सहानुभुती निर्माण होते.

शिवसेना शाखाप्रमुख नाना खारकर, त्याची बहिण ( मंदारच्या भाषेत "रांड) शालिनी, फ़ंटा, मनवेल, खुबसुरत काकु, दारुचा अड्डॆवाला गजु अशा सगळ्या व्यक्तीरेखांमधुन त्या वेळच्या एकंदर राजकीय, सामाजिक परिस्थितीबरोबरच मानवी मनाचे खेळही उलगडुन दाखवले आहेत.

घरच्यांशी पटलं नाही म्हणुन ऐश्वर्यावर लाथ मारणारा मंदार शराबी मधल्या अमिताभ ची आठवण करुन देतो, विनाकारण शालिनीला छळण्यातुन मंदार एकंदरच समाजातील शालीनतेचे बुरखे घेउन वावरणा-या वर्गालाच आव्हान देतो, नाना खारकर आणि मंडळींना नडताना मंदार झुंडशाही विरुद्ध पाय रोवुन उभा ठाकतो. एकंदरच मंदार "लार्जर दॅन लाईफ़ " वाटायला लागतो तितक्यात त्याच्या हातुन अनावधानाने खुन होतो, तेव्हा मात्र मंदार सामान्य माणसासारखा वागुन आपल्याला पुन्हा जमिनीवर आणुन ठेवतो.

संपुर्ण कादंबरीमधे "खुबसुरत काकु", रांड शालिनी " असे उल्लेख वारंवार येत रहातात आणि आपल्या मध्यमवर्गीय, सांस्कॄतिक वगैरे विचारसरणीला लाथा हाणत राहतात. भाऊ पाध्येंचं लिखाण आजच्या काळात एवढं झोंबतं तर १९७५ साली किती आग लागली असेल.


शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

एका दिशेचा शोध - संदीप वासलेकर


लेखक - संदीप वासलेकर

संदीप वासलेकरांनी मांडलेले मुद्दे, दीलेली आकडेवारी थक्क करणारी आहे. भारत एक आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे असं एक चित्र सातत्याने आपल्यासमोर उभं केलं जातं. ऐकायला कितीही गोड वाटलं तरी अर्थिक महासत्त्ता वगैरे बनणं  म्हणजे हे पोकळ स्वप्नच आहे ही वस्तुस्थिती वासलेकरांच्या ह्या पुस्तकातुन समोर येते.

सरकार किंवा वित्तीय संस्थांकडुन जी आकडेवारे दिली जाते त्या पेक्षा न दीलेली आकडेवारी बरीच मोठी असते.  अर्थिक ताकदीत जरी भारत पहिल्या पाच दहा देशांमधे असला तरी एकुण नागरी सुविधा, आरोग्य, शिक्षण अशा इतर मह्त्त्वाचे निष्कर्ष लावले तर मात्र आपण पहिल्या शंभरात पण नसु.

नुसती आकडेवारी मांडुन, निष्कर्ष काढुन वासलेकर थांबत नाहीत तर त्यांनी मार्गही सुचवलेत.


अभ्यासण्यासारखं पुस्तक.

बुधवार, ८ एप्रिल, २०१५

कंपनी ऑफ़ विमेन - खुशवंतसिंग



लेखक -- खुशवंतसिंग अनुवादीत

खरं तर खुशवंतसिंगांचं नाव बघुन पुस्तक घेतलं पण पुस्तक तद्दन बाजारु आहे. फ़ुटपाथवर मिळणाऱ्या "तसल्या" पिवळ्या पुस्तकांपेक्षा जरा बरं म्हणता येईल एवढी नको त्या गोष्टींची वर्णनं. पुस्तक नक्की कशावर, आणि का लिहीलंय ते शेवटपर्यंत समजलं नाही.

एक घटस्फ़ोतित उद्योजक, त्याच्या मोकाट, भरकटलेल्या आयुष्य़ाची ही कहाणी. पुस्तकाचा ८०% भाग "रसाळ" वर्णनांनी भरलेला. शेवट मात्र एखाद्या बोधकथेसारखा, संदेश वगैरे देणारा.

सोमवार, ३० मार्च, २०१५

ब्लास्फेमी - तेहमिना दुर्रानी


लेखिका - तेहमिना दुर्रानी 

खरंच मुळापासुन हादरवणारं पुस्तक. पुस्तकाची पार्श्वभुमी जरी इस्लामी असली तरी पुस्तकातल्या पुरुष व्यक्तीरेखा एकाच जागतिक मानसिकतेचं प्रतिनिधीत्व करतात. थोडा वेगळ्या पद्धतीने विचार केला तर एकाच वेळी स्त्रीची अनेक रुपं बघायला मिळतात.

नवऱ्याचे अनन्वित अत्याचार मुकाटयाने सहन करणारी एक "सहनशील स्त्री"
स्वतःच्याही नकळत कोणावर तरी मोहुन जाणारी हळुवार "प्रेमिका"
मुलीसाठी, मुलीला अशा अत्याचारापासुन वाचविण्यासाठी पाप पुण्याचा विचार न करता मार्ग शोढणारी "माता"
संयमी आतल्या आत धुमसत राहणारी "आणि संधी मिळताच जीव तोडुन वार करणारी  "रणरागिणी चील"


अफ़ाट पुस्तक आहे.

बुधवार, २५ मार्च, २०१५

पॅपिलॉन - हेन्री शेरीयर




मूळ लेखक हेन्री शेरीयर –

अनुवाद रविंद्र गुर्जर

एका फ्रेंच कैद्याची आत्मकथा. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अचाट साहसी वृत्ती एवढ्या भांडवलावर ८ ते १० वेळा तुरुंग फोडून पलायनाचा प्रयत्न करणारा कथा नायक म्हणजेच स्वतः लेखक. वरकरणी सत्यकथा वाटत असली तरीही सुरुवातीचा काही भाग सोडला तर मला मात्र निव्वळ बाजारू "फिल्मी" कथा वाटली. सहज विश्वास ठेवता न येणाऱ्या घटना एवढ्या सातत्याने घडत राहतात की विश्वास ठेवणंच अवघड होत जातं.

कथानक ज्या काळात आणि जिथे घडले त्या काळची तिथली परिस्थिती कदाचित वेगळी असेल पण ९०% घटना मला तरी अशक्यप्राय वाटल्या.

एक साहसकथा म्हणून वाचायला ठीक आहे पण "ग्रेट" वगैरे नाही वाटलं मला पुस्तक.

बुधवार, १८ मार्च, २०१५

कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला ? - शेषराव मोरे


लेखक - शेषराव मोरे

पुस्तकाबद्दल अनेक परस्परविरोधी लेख निरनिराळ्या वृत्तपत्रात आणि इंटरनेटवर वाचनात आले आणि पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण झालं म्हणून पुस्तक घेतलं. पुस्तकात मांडलेली मतं चूक की बरोबर त्यावर इतिहासाचे किंवा समाजशास्त्राचे अभ्यासक चर्चा करत राहतील पण एक वाचक, एक भारतीय नागरिक म्हणून काही गोष्टींची नोंद घ्यावीशी वाटली.
१. १८५७चं बंड मुळात इस्लामी राज्यकर्त्यांनी पुरस्कृतकेलेलं बंड होतं.

२. ब्रिटीश राज्यसत्तेने ह्या बंडाचा सूड एवढा भयानक पद्धतीने घेतला ज्याची तुलना हिटलरने केलेल्या ज्यू हत्याकांडाशीच होऊ शकते. दिल्लीतल्या प्रसिद्ध जामा मशिदीचा वापर अनेक महिने घोड्यांच्या तबेल्यासाठी केला गेला. चौकाचौकात हजारो मुसलमानांना फाशी दिली गेली. मिर्झा गालिबने लिहिलेलं खरं मानायचं झालं तर एकट्या लखनौ मध्ये मुस्लिमांची संख्या अडीच लाखावरून एक हजारावर आली. मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना परागंदा होण्याची वेळ भारतीय इतिहासात पहिलीच असावी.

३. मोगल खानदानातील २९ पुरुषांना संपविण्यात आलं.

४. स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातसर अहमदयांनी प्रथम मांडली. जीना त्या वेळी बहुदा जन्मालाही आले नसावेत

५. राष्ट्रवादी मुस्लीमांना अखंड भारत हवा होता पण हिंदुच्या बरोबरीने सत्तेत भागीदारी ( ५०%) हवी होती ( जेमतेम १५% असूनही )

अतिशय विचारपूर्वक आणि मुद्देसूद केलेल्या मांडणीमुळे संपूर्ण पुस्तक वाचनीय आहे. फाळणीबाबत बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला विचार ह्या विषयावर पुरेसा बोलका आहे.
जर हिंदुस्थान अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते...
मुसलमान ही शासनकर्ती जमात बनली असती... जेव्हा फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्‍वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंध, महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मला एकच वाटतंआज पाकिस्तान आणि पाकिस्तानी मानसिकता सीमेच्या पलीकडे आहे, मधे पोलादी भारतीय लष्कर आहे तरीही आपल्याला एवढा उपद्रव आहे, हीच कीड सीमेच्या अलीकडे असती तर तुमचं आमचं आयुष्य १००% नरकच झालं असतं.


रविवार, १५ मार्च, २०१५

बकऱ्याची बॉडी - समर खडस



लेखक - समर खडस

अफाट पुस्तक, प्रत्येक कथा अफाट, हलवून टाकणारी. स्वतःची समाजवादी विचारसरणी न लपविता खडस स्वतःला समाजवादी म्हणविणाऱ्यांचे बुरखे सहज फाडून काढतात. so called "System" वर हल्ला चढवताना हल्लेखोरांच्या "मर्यादा" स्पष्ट करून दाखवायलाही खडस कचरत नाहीत.

बकऱ्याची बॉडी खेरीज "भायेरची", "नशीब", "असे हे विलक्षण जग", "बेगम", "रेताड", "त्या तिथे", "तवंग नाही तलावात" ह्या कथा असलेलं हे पुस्तक एकदा हातात घेतलं की सोडवत नाही.

भाऊ पाध्येंची आठवण होते प्रत्येक कथा वाचताना. खूप दिवसांनी एवढं "सकस" काही वाचायला मिळालं.

मंगळवार, १० मार्च, २०१५

एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर



लेखिका – वीणा गवाणकर

आजपासून साधारण दीडशे वर्षांपूर्वी कापसावर अवलंबून असणाऱ्या दक्षिण अमेरिकेतील शेतकऱ्यांसाठी “देवदूत” ठरलेला एक कृष्णवर्णीय संशोधक म्हणजे  “कार्व्हर” आयुष्यभर फक्त कष्ट आणि कष्टच उपसत, सरळ संपन्न आयुष्य नाकारून समाजासाठी, सामान्य शेतकऱ्यांसाठी राबलेला एक “संत” असंच त्याच्या बाबतीत म्हणावं लागेल. वर्णभेदाच्या झळा सोसूनही कोणताही द्वेष मनात न ठेवता सर्वांसाठीच आयुष्यभर झटला हा प्राणी.
अफाट बुद्धिमत्ता, कमालीचा सोशिक स्वभाव स्वीकारलेल्या कामावरची निष्ठा अशा गुणांचं अनोखं रसायन असणारा कार्व्हर वीणा गवाणकरांनी खूप ताकतीने मांडलाय.

१००% संग्रही असावं असं पुस्तक 

गुरुवार, ५ मार्च, २०१५

चंद्रमुखी - विश्वास पाटील

लेखक - - विश्वास पाटील

विश्वास पाटलांची जवळपास सर्व पुस्तकं मी वाचलेली आहेत साधी सरळ भाषा, प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याची अफ़ाट ताकद.

ग्रामिण जीवनाचं दर्शन घडवतानाच राजकारणातल्या खाचाखोचा सहज आपल्यासमोर उलगडत जातात. कादंबरीतली कुठलीच व्यक्तीरेखा "माणुसपणाच्या" सीमा सोडत नाही. आपल्या आजुबाजुलाच कादंबरी घडत जातेय असं वाटत रहातं

राजकारण, सत्ता अशा दगडी किना-यांवरुन वाहतानाच कादंबरीचा प्रवाह स्त्रीमन उलगडुन दाखवताना मात्र वरुन कितीही आक्रस्ताळा वाटला तरी आतुन खुप हळुवार होतो. विश्वास पाटलांची हीच खरी ताकद.

एका तरुण तडफ़दार राजकारण्याला पडलेलं रांगडं स्वप्न म्हणजे................... चंद्रमुखी,

प्रियकरासाठी अवघं आयुष्य एका क्षणात उधळायला तयार होणं काय असतं ते जी सांगते ती................... चंद्रमुखी

पैशांसाठी कला, शरीर आत्मा सगळं विकुनही माणुसपण टिकवते ती................ चंद्रमुखी

पोकळ समाजनियम लाथेने  उडवुन लावते, प्रसंगी वाघिणीसारखी तुटुन पडते ती............... चंद्रमुखी.

संपुर्ण कादंबरी नायिकेभोवती फ़िरते, तिच्या भावभावना उलगडुन दाखवते, तिच्यावरचा अन्याय मांडते तरीही कुठेही रडकथा न होता उलट चंद्रमुखी अंगावरच येते.

एक तरुण राजकारणी एका कलावंतीणीच्या प्रेमात पडतो, तीही काही काळ वाहवत जाते, दोघांना जाग येते तेव्हा त्याला जाणवतं त्याची संपुर्ण कारकीर्द पणाला लागलेली आहे. जिच्यावरच्या प्रेमामुळे ही वेळ आली तीच शेवटी त्याला सगळ्यातुन बाहेर काढते. एखादया स्वप्नातुन जागी व्हावी तशी आपल्या आयुष्यात परतते. जणु भीक म्हणुन त्याला त्याचं आयुष्यच देउन टाकते.


एवढी साधी सोपी कथा पण वाचताना आपणही त्या कथेतीलच एक व्यक्तीरेखा आहोत असं वाटू लागतं. कादंबारीचा शेवट मात्र आपल्या डोळ्यात थोडं तरी पाणी आणल्याशिवाय रहात नाही.

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०१५

पवनाकाठचा धोंडी - गो.नी. दांडेकर



लेखक - गो.नी. दांडेकर

गो.नी.दां. च्या इतर कथांप्रमाणेच चुटपुट लावणारी एक ग्रामिण कथा. घराण्याची परंपरा, अभिमान जीव तोडुन जपणा-या शेतक-याची ही कथा.

कथा हळुहळु उलगडत जाताना दोन पिढ्यांमधला संघर्षदेखील जाणवत रहातो, अस्वस्थ करत राहतो.

धाकटया भावाविरुद्ध कुस्तीचं आव्हान स्वीकारणा-यालाही प्रोत्साहन देताना कोंडीला असलेलं नैतिक जबाबदारीचं भान प्रकर्षाने जाणवतंच पण धाकटया वहिनीमधे आजी शोधणारा कोंडी जमिनीवरचाच माणुस राहतो.

शेतात गुरासारखा राबणारा कोंडी धाकटया वहिनीजवळ मात्र हळुवार होतो, तिच्या शिक्षणाचं कौतुक जगाला ओरडुन सांगतो. एकंदरीत त्याचा विरोध बदलत्या प्रवाहाला नाही, बदल स्वीकारायला त्याची तयारी आहे पण जग बदललं म्हणुन स्वतः बदलायची मात्र त्याची तयारी नाही. वरवर बघितलं तर कथा साध्या सोप्या नेहेमीच्या मार्गानेच जाते खुप काही वेगळं असं काही घडत नाही. कथेच्या शेवटी कोणाचे उपकार घ्यायला लागु नयेत म्हणुन कोंडीचं गुरासारखं शेतात राबणं तो शेवटच्या प्रवासाला निघाल्याची जाणिव करुन देतं पण जन्मभर सांभाळलेल्या व्रतासाठी त्याने दीलेलं बलिदान मात्र वाचकांना असह्य चुटपुट लावुन जातं.