लेख - मला वाटतं.... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख - मला वाटतं.... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ११ एप्रिल, २०१६

IPL ला विरोध कशासाठी ?

70 लाख लिटर पाण्याचा अपव्यय होतो म्हणून काही लोक आणि संस्था महाराष्ट्रात IPL च्या सामन्याना विरोध करताहेत. दबावाला बळी पडून सरकारने खरंच राज्यात IPL ला बंदी घातली तर त्यांच्यासारखे कर्मदरिद्री तेच.

महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी किमान एक कोटी लोक फ्लॅटमध्ये राहतात ? एक व्यक्ति फ़क्त तीनदा घरातला "फ्लश" वापरते असं धरलं तरी किमान 15 कोटी लिटर पाणी फ्लश मध्ये वापरलं जातं असं म्हणता येईल ? नीट नियोजन केलं आणि  दिवसाकाठी ह्यातलं फ़क्त 5% पाणी वाचवता आलं तरी वर्षभरात साधारण 250 कोटी लिटर पाणी वाचू शकेल ?

मुळात पाणी ही समस्या जेवढी मोठी आहे त्यापेक्षा मोठी समस्या आहे पाण्याचं Distribution. मराठवाड्यातला दुष्काळ आजचा नाही बंदी घालायाचीच तर ती तिथल्या राजकारण्यांवर आणि त्यांनी स्वार्थासाठी तिथे उभ्या केलेल्या साखर कारखान्यावर घालावी लागेल.

अनुराग ठाकुर म्हणाले ते खरं मानायचं तर 100 कोटींचा महसुल अपेक्षित आहे राज्याला IPL मधून. सामन्याना विरोध करणाऱ्या लोकांनी खरं तर हा निधी दुष्काळग्रस्त भागासाठी वापरण्यासाठी सरकारवर दबाव आणावा...... किमान 50 खेड़ी सहज कायमची दुष्काळमुक्त होतील एवढ्या पैशात.

"काही लाख लिटर पाण्यासाठी एवढ्या महासुलावर पाणी सोडण्यात काय अर्थ आहे ?"

FYI -  मी क्रिकेटप्रेमी वगैरे अजिबात नाही. गेल्या 5 वर्षात दोनदा "लगान" बघितला आहे ते धरून एकूण पावणे चार सामने बघितले आहेत मी. ढोणी आणि विराट कोहली ( तो पण अनुष्काचा BF म्हणून) एवढे दोनच खेळाडू माहीत आहेत मला आताच्या संघातले

रविवार, ३ एप्रिल, २०१६

“देऊळ बंद”



मगाशी झी सिनेमावर “देऊळ बंद” सिनेमा बघत होतो .......छान आहे सिनेमा म्हणून ........मोहन जोशीचं काम तर अप्रतिमच आहे. बाकी काही फारसं मला पटलं नाही पण “सध्या” त्यावर बोलून लगेच ज्वलंत, धर्माभिमानी, धर्मरक्षक लोकांच्या भावना वगैरे खाजवायच्या नाहीयेत.

ह्या सिनेमातलं मला एक कळलं नाही .......स्वामी आधी म्हणतात की “देव जन्म आणि मृत्यूत ढवळाढवळ करू शकत नाही” आणि सिनेमाच्या शेवटी राघववर झाडलेली गोळी स्वतःवर घेतात ......रक्त सांडत सांडत जातात ....... राघवचा जीव वाचवतात .........असं कसं ?

Cinematic Liberty वगैरे थोडंफार मला मान्य आहे पण ही केवळ निर्मात्याच्या किंवा लेखकाच्या Logic मधली चूक आहे की देवाचं महात्म्य ज्यांना कळतं (असं त्यांचं म्हणणं आहे) त्यांच्याही डोक्यात असं काहे confusion आहे?

जाऊ दे मला काय ह्यातलं फारसं कळत नाही तसंही  मी “छोटा भीम” बघणंच जास्त चांगलं..............


बुधवार, ३० मार्च, २०१६

टी.आर.पी. साठी काय पण, कधी पण, कुठे पण ......



ह्या मिडीयाचं म्हणजे कसं झालंय माहितेय का ? आधी स्वतःच आग लावायची ................मग “सबसे पेहले” त्या आगीची “ब्रेकिंग न्यूज” द्यायची .....................मग आग विझवायला सरकारी यंत्रणा कशी चार मिनीटांऐवजी साडेपाच मिनिटात पोहोचली ह्यावर दिवसभर काथ्याकुट करायचा.............पुन्हा संध्याकाळी स्टुडिओत दोन चार “स्वयंघोषित” विद्वान जमा करायचे आणि..................... आग विझवायला दोनशे एकोणपन्नास लिटर पाण्याची आवश्यकता असताना फक्त दोनशे चाळीस लिटर पाणीच वापरून सरकारी यंत्रणेला मूर्ख ठरवायचं किंवा.................... आग विझवताना दोनशे बावन्न लिटर पाणी वापरून सरकारी यंत्रणेने पाण्याचा कसा अपव्यय केला ह्यावर AC स्टुडीओत वांझोटी चर्चा घडवून आणायची.

अगदी अलीकडची त्या कन्हैय्याची केस असेल किंवा त्या कुठल्या तरी साधू बाबाला पडलेलं जमिनीखालच्या खजिन्याचं स्वप्न असेल, काड्या घातल्या त्या मिडीयाने..................सरकारी यंत्रणा पण ह्यांच्या नादाला लागून मुर्खासारखी पावले उचलते आणि हसं करून घेते.

एका गोष्टीचा जरा विचार करून बघा ........ राजकारणी , गुंड किंवा अगदी काही वेळेला मोठे
Businessman सुद्धा उघड उघड एकमेकांच्या विरोधात उभे राहतात ...........आव्हान देतात ....................असं कधी कुठल्या न्यूज चानेलने केलंय का ? ................कधी झी न्यूज ने ए.बी.पी. न्यूजचं स्टिंग ओपेरेशन केलंय का ? कधी जय महाराष्ट्रवाल्यांनी ..........आय.बी.एन. लोकमतचं “भांडाफोड”वगैरे केलंय का ?..........जवळपास प्रत्येक राजकीय पक्षावर ............राजकारणातल्या व्यक्तींवर....................ह्या सुपारीबाज मिडीयाने वाट्टेल ते आरोप लावले.......... पोलिस किंवा इतर सरकारी अधिकारी कसे नालायक आहेत ते आपल्याला सांगितलं, पटवून दिलं ............वाट्टेल तशा बातम्या पसरवल्या पण आजवर कोणत्या तरी प्राईम टाईमच्या चर्चेच्या गुऱ्हाळात ह्या पत्रकारांना ...........आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय का ?

लोकशाहीचा चौथा स्तंभ ...........सशक्त लोकशाही साठी “स्वतंत्र” मिडीयाची कशी गरज आहे वगैरे सगळं मला मान्य आहे .................पण हा असला टी.आर.पी. साठी वाट्टेल त्या थराला जाणारा मिडीया असण्यापेक्षा ..........



उरलेल्या तीन स्तंभांवरच लोकशाही टिकलेली बरी. 

शनिवार, २६ मार्च, २०१६

"TRP" साठी कुठल्याही थराला जाणारा मिडीया


भ्रष्टाचार, काळा पैसा, गुन्हेगारी ह्या समस्या जेवढ्या मोठ्या आहे तेवढीच मोठी समस्या आहे "TRP" साठी कुठल्याही थराला जाणारा मिडीया. त्या कसाबला पण ह्यांच्या समोर उभं केलं असतं तर नुसत्या प्रश्नांनी जीव घेतला असता ह्या लोकांनी त्याचा.............काय असू शकले असते ह्यांचे प्रश्न ?

१. कसाबजी सेंकडों लोगोंको मार कर आपको कैसा लग रहा है ?
२. तुम्हाला तुरुंगात देतात ती बीर्याणी तुम्हाला आवडते का ? बीर्याणी नंतर स्वीटडीश पण देतात का ?
३. पाकिस्तानमधे शाहरुख खान लोकप्रिय आहे की सलमान खान ?
४. तुम्हाला शुक्रवारी फ़ाशी जायला आवडेल की कोणताही दिवस चालेल ?
५. तुरुंगात डास फ़ार आहेत का ?
६. तुरुंगात तुमच्यासाठी शौचालय भारतीय आहे की पाश्चात्य पद्धतीच ? तुम्हाला कोणतं आवडतं
७. तुम्हाला वाटतं का की तुमचा नेमबाजीचा सराव थोडा कमी पडला ?
८. तुम्हाला परत संधी मिळाली तर कमीत कमी किती लोकांना मारु शकाल असं तुम्हाला वाटतं.
९. तुमच्यात पण टारगेट वगैरे असतं का ? तुमचं २००८ चं टारगेट पुर्ण झालं का ? इंसेटीव्ह कीती मिळणार ?

हे प्रश्न ऐकता ऐकता कसाब बेशुद्ध पडला असता  त्याला हॉस्पीटल मधे नेताना त्याने विचारलं असतं "तुमच्याकडे दयामरण देतात का ? असतील तर लगेच मला फ़ाशी दया आणि देत नसतील तर मला पुन्हा तुरुंगात टाका." वाट्टेल ते करा पण पुन्हा मला ह्या लोकांसमोर पुन्हा उभा करु नका."

मंगळवार, १५ मार्च, २०१६

जाट - पटेल - मराठा आरक्षण


अलिकडे जाट समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी उग्र आंदोलन केलं. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर प्रचंड परिणाम तर झालाच पण जाळपोळ आणि लुटमारीसारख्या प्रकारांबरोबरच बलात्कारासारखे हीन प्रकार पण झाले. मुळात जाट समाज असेल, गुजराथ मधला पटेल समाज असेल किंवा महाराष्ट्रातला मराठा समाज असेल, यांना आरक्षण देताना “राजकीय अपरिहार्यता” हा एकच निकष लागू होतो. रस्त्यावर उतरून, जाळपोळ करून आरक्षण मागणारे पण तेच आणि मंत्रालयातल्या गुबगुबीत खुर्चीत बसून “देणारे” पण तेच.फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाबद्दल बोलायचं झालं तर ही आकडेवारी खूप बोलकी आहे
  1. महाराष्ट्रातल्या ५०% पेक्षा जास्त जमिनीची मालकी मराठा समाजाकडे आहे.
  2. महत्त्वाच्या १०५ पैकी ८६ साखर कारखाने मराठा समाजाच्या ताब्यात आहेत. साखर कारखाने ताब्यात असणं म्हणजे किती ताकद असते हे शेतकरीच जास्त चांगलं सांगू शकतील. 
  3. महाराष्ट्रातल्या ५४% शैक्षणिक संस्था मराठा समाजाच्या ताब्यात आहेत. 
  4. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून म्हणजे साधारण १९६२ पासून आजवर सातत्याने ५५% आमदार विधानसभेत बसले आहेत.
  5. आजवर १७ पैकी १२ मुख्यमंत्री मराठा समाजातले होते.
कोणाच्या दबावाला किती बळी पडायचं हे जरी सरकारच्या हातात असलं तरी शेवटी त्यात नुकसान खुर्च्या उबवत बसलेल्या राजकारण्यांचं नाही. ज्या गोष्टीची ह्या राजकारण्यांच्या पुढच्या १५/२० पिढ्यांना गरज पडायची गरज नाही ते देऊन टाकायला ह्यांचं काय जातंय.दुःख म्हातारी मेल्याचं पण आहे आणि काळ सोकावातोय त्याचं पण आहे.

http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/3415/12/12_chapter%207.pdf





रविवार, १३ मार्च, २०१६

ब्रेकिंग न्यूज ............


दोन तीन दिवसांपूर्वी कल्याणात मध्यरात्री कधी तरी एक रिक्षा जाळण्यात आली ...........झालं ....लगेच ब्रेकिंग न्यूजला चटावलेले पत्रकार कामाला लागले आणि राजसाहेबांवर खापर फोडून मोकळे झाले. त्यातल्या त्यात जनाची नाही तर मनाची लाज बाळगून काहींनी बातमी देताना एक प्रश्नचिन्ह मात्र आठवणीने टाकलं.
मध्यरात्री गाड्या जाळण्याचे प्रकार ह्या पूर्वी झालेले नाहीत का ? कोणी तरी विकृत व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट हे प्रकार गेली अनेक वर्ष करतो आहे हे सगळ्यांनाच माहित आहे..........नशीब त्यामागे पण मनसेच आहे असा "सनसनीखेज" वगैरे खुलासा नाही केला ह्या विद्वान पत्रकारांनी.

मनसे असेल किंवा कोणतेही इतर राजकीय पक्ष असतील जी काही आंदोलने करायची ती उघडपणे करतात .......लपून छपून तुमची ती “स्टिंग ऑपरेशन” केली जातात आंदोलने नाहीत हे तुम्हाला समजायला काहीच हरकत नव्हती.

कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षांनी काय आदेश दिलाय आणि तो कधी पाळायचा आहे हे जेवढं त्यांच्या कार्यकर्त्यांना कळतं तेवढंच जनतेलाही कळतं .........उगाच ब्रेकिंग न्यूजच्या पुड्या सोडून आणि जनतेची दिशाभुल करून तुम्ही तुमची TRP ची पोळी कशाला भाजून घेताय ?

चला असं धरून चालू की राजसाहेबांनी केलेलं भाषण प्रक्षोभक होतं TRP खेचण्यासाठी होतं, पण त्याचा आणि एका निरपराध मराठी माणसाची रिक्षा जाळण्याचा संबंध कसा काय लावू शकता तुम्ही? त्या भाषणाबद्दल तुम्ही लिहा ..........तो तुमचा अधिकार आहे ........टीका करा तोही तुमचा अधिकार आहे........पण न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरू नका .......ते तुमच्या मर्यादेचं उल्लंघन आहे.

“नागरीकांकडून अमुक भावना व्यक्त होत आहे” किंवा “नागरिक रोष व्यक्त” करत आहेत अशी विधानं जेव्हा तुम्ही तुमच्या बातमीत छापता तेव्हा किती नागरीकांना खरंच विचारता ? त्यातले ते “नागरिक” म्हणजे निव्वळ तुमचे आश्रयदाते असतात हे आता सगळ्यांनाच कळायला लागलंय.

राज साहेब काय बोलले आणि बोलले ते बरोबर की चूक हा माझ्या ह्या लेखाचा विषय नाही. जी बातमी तुम्ही देताय ती बातमी फक्त द्या, त्याचा अर्थ लावायचं काम तुमचे वाचक करतील. अर्थ लावायची अक्कल त्यांना आहे असं गृहीत धरायला काय हरकत आहे?. त्या बातमीचा तुम्हाला लागलेला अर्थ पण छापा पण तो अर्थ नागरिकांच्या नावावर खपवू नका.

गेल्या पंचवीस वर्षात मी जेवढे राजकारणी जवळून बघितलेत तेवढेच पत्रकार देखील बघितलेत. ज्यांच्या वृत्तपत्राचं नाव पण कधी ऐकलेलं नसतं, जे अख्खा दिवस महापालिकेत पडीक असतात त्यांचा चरितार्थ त्या २/४ हजार खप असलेल्या वृत्तपत्राच्या नोकरीतून कसा भागतो हा प्रश्न सामान्य नागरीकांना पडू शकतो ........मला नाही.
नगरसेवकांच्या १५ / २० फुट लांबीच्या गटाराच्या कामाच्या भूमीपूजनाच्या बातमीसाठी पण रांगेत उभं राहून पाच पाचशे रुपयांची पाकिटं घेणारे पत्रकार बघितलेत मी. ज्याला त्याला नैतिकतेचे धडे देण्याचा अधिकार दिला कोणी ह्या पत्रकारांना ? राजकारणी देतात म्हणून आम्ही घेतो असं तुमचं म्हणणं असू शकेल पण तृम्ही घेता म्हणून राजकारणी देतात ही वस्तुस्थिती आहे.

मुळात हल्ली पत्रकारांनी राजकारण्याना तत्त्वनिष्ठा वगैरे शिकवणं म्हणजे मल्लिका शेरावतने सनी लीओनी ला पावित्र्यावर प्रवचन देण्यासारखं वाटतं मला.

हे मी जे काही लिहीलंय त्यातून मला कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला योग्य ठरवायचं नाहीये...... पण हो .....ब्रेकिंग न्यूजला चटावलेल्या पत्रकारांच्या बुद्धीमत्तेबदल आणि नीतीमत्तेबद्दल निश्चित प्रश्नचिन्ह उभं करायचं आहे.

शनिवार, ५ मार्च, २०१६

मोबाइलकुमार आणि मोबाइलकुमारी

आज संध्याकाळी कल्याण रेलवे स्टेशनच्या बाहेर बसलेल्या फेरीवाल्यांचं सामानसुमान जप्त करून महानगरपालिकेच्या गाडीत भरुन नेते होते......

थोडंसं पुढे एस टी स्टॅंड च्या समोर चार चार रांगा करून ....80% रस्ता अडवून रिक्षा उभ्या केल्या जातात ...... ह्या रिक्षा आणि टोळकी करून बिड्या ओढ़त आजुबाजूला उभे असलेले रिक्षा चालक पण त्याच गाडीत भरून नेता नाहीत का येणार ? रहदारीची कोंडी तरी कमी होईल

जाता जाता रस्त्याच्या माधोमध चालताना मोबाइलवर बोलत किंवा कानात बुचं घालून गाणी ऐकत बागडणारे दहा पंधरा मोबाइलकुमार आणि मोबाइलकुमारी पण त्याच गाडीत भरून न्यायला हरकत नाही

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

डेव्हिड हेडली........इशरत जहां........मुंब्रा हृदयसम्राट




डेव्हिड हेडली जे सांगतोय ते खरं मानून आपण जर पाकिस्तानला आणि आय एस आय ला २६/११ साठी जबाबदार धरणार असू तर त्या इशरत जहां साठी गळे काढणाऱ्या तमाम "धर्मनिरपेक्ष" वगैरे महात्म्याना "देशद्रोही" ठरवून त्यांच्यावर पण खटले भरायला हवेत

सगळ्यात आधी तर इशरतला शहीद ठरवून तिचं वकीलपत्र घेतलेल्या त्या "मुंब्रा हृदयसम्राटाला" उचलून जेल मध्ये टाकायला हवं .........पाच लाख दिलेले ना तिच्या कुटुंबाला ?
एका ठराविक धर्माच्या बदनामी साठी भाजपच हे सगळं त्या हेडली कडून वदवून घेतंय असंही एका "विद्वानाने" म्हटलंय ......

बरं झालं ते दिग्बीजय सिंग अजून "हनिमून" मध्ये व्यस्त आहेत नाही तर म्हणाले असते ....... "हेडली अतिरेकी नव्हताच तो तर "संघाचा" माणूस आहे .....आणि अमेरिकेतून नाही .........संघाच्या नागपूरच्या मुख्यालयात बसून तो साक्ष देतोय .........."

येड्याचा आणि बाजार साला

रविवार, ३१ जानेवारी, २०१६

पुणं बदललंय ?

पुणं हल्ली खुप बदललंय .... कालपासून बघतोय ..... काल हॉटेल मध्ये जेवायला गेलो तर वेटर अदबींने बोलत होते

सकाळी 8 वाजता खाली उतरलो तर चक्क वाण्याचं दूकान उघडलेलं होतं

मला जाम चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं

सकाळी मिसळ खायची होती AvanTea Mehta ला विचारल, तिने काटा किरर् म्हणून एक ठिकाण सुचवलं ... आणि आत गेल्या गेल्या ही पाटी बघुन जीव भांड्यात पडला.

एक मिसळ दोघात खायची असेल तर 20 रूपए Extra भरावे लागतील ही धमकीवजा सूचना वाचून आपण पुण्यातच असल्याची खात्री पटली

मिसळ पण पाटी वरच्या धमकीपेक्षा तिखट ...पण तितकीच "सही"

रविवार, १० जानेवारी, २०१६

मुख्यमंत्री साहेब ........






प्रति.
मा.श्री देवेंद्रजी फडणविस,
मुख्यमंत्री – महाराष्ट्र
महोदय,
विषय – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात होत असलेल्या रस्ता रुंदीकरणाबाबत
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या दरम्यान आपण ह्या महानगरपालिका क्षेत्राच्या विकासासाठी हजारो कोटींचे “Package” जाहीर केलेले आहे. दिलेल्या शब्दाला आपण जागाल ह्या बद्दल आम्हा नागरीकांच्या मनात कोणताही संशय नाही.

कल्याणकर नागरिक म्हणून मला अभिमान वाटतो की आपल्याला व आम्हालाही अपेक्षित असलेल्या “स्मार्टसिटीच्या” दिशेने आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त श्री ई. रविंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाने पावले टाकण्यास सुरुवात केलेली आहे. ह्याच पद्धतीने जर वाटचाल चालू राहिली असती तर कदाचित राज्यातील पहिल्या स्मार्टसिटीचा मान आमच्या शहराला मिळाल्याशिवाय राहिला नसता.

ह्या शहराच्या दुर्दैवाने आपल्याच पक्षाचे आमदार, खासदार तसेच आपल्या मंत्री मंडळातील आपले सहकारी संपूर्ण ताकदीनिशी स्थानिक प्रशासनाच्या आणि पर्यायाने सार्वत्रिक जनहिताच्या विरोधात जाऊन मुठभर व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसत आहेत. सदर प्रकारात संबधितांकडून आपलेही नाव घेण्यात येत आहे.
.
कारवाईच्या विरोधात दबाव निर्माण करण्यासाठी आयुक्तांच्या बदलीच्या बातम्या जाणून बुजून “गुजराती” वृत्तपत्रांच्या आणि आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून पसरविल्या जात आहेत.

गेल्या अनेक महिन्यात आयुक्त श्री ई. रविंद्रन यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. प्रशासनातील अनेक बेशिस्त अधिकारी व कर्मचारी आज घरी बसवलेले आहेत. आमच्या हितासाठी सकाळी ६ वाजल्यापासून कल्याण डोंबिवली शहरांच्या गल्लीबोळात स्वतः फिरणारे आयुक्त ह्या शहराने आजवर पाहिलेले नाहीत. पूर्वी ३६५ दिवस आणि २४ तास भरून वाहणाऱ्या कचरा कुंड्या आयुक्तांच्या भितीने वाहायच्या थांबलेल्या आहेत.

असं असताना जर खरोखरच मुठभर व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडून आयुक्तांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला किंवा त्यांनी सुरु केलेल्या मोहिमेवर गदा आणली गेली तर ह्या शहरातील नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत ह्याची आपण नोंद घ्यावी ही विनंती.

सदर प्रकरणात लक्ष घालून आपल्या पक्षातील स्थानिक आमदार खासदार व आपल्या मंत्र्यांना योग्य ती “समज” देऊन आपण स्थानिक प्रशासन व आम्हा कल्याणकरांच्या पाठीशी उभे रहावे ही विनंती.

आपला

जबाबदार कल्याणकर
कल्याण पश्चिम - ४२१३०१
.
वर लिहिलेलं पत्र मी मा. मुख्यमंत्री साहेबांना मेलवर माझ्या वैयक्तिक नाव व पत्त्यासह पाठवलेले आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्हीही पाठवा
cm@maharashtra.gov.in आणि chiefminister@maharashtra.gov.in

शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

निषेध नक्की कोणाचा करायचा ?


सकाळी ८.२३ ला कल्याणहून दादरला जाणारी स्लो लोकल, ही गाडी कारशेड मधून येत असल्याने कल्याणला सहज जागा मिळते. ठाकुर्ली, डोंबिवलीला आणि मग मुंब्र्यापर्यंत बऱ्यापैकी गर्दी होते. ठाण्यात मात्र गर्दी बरीच कमी होऊन जाते.


आजही तसंच झालं मुंम्र्याला खूपच गर्दी झाली बराच आरडाओरडा चालू होता, प्रत्येक डब्यात आत शिरण्यासाठी जीव तोडून ढकला ढकली सुरु असतानाच गाडी सुटली. गाडीने वेग घेतला. सुसाट निघालेली गाडी कळव्याजवळ आली आणि मागच्या कोणत्यातरी दारातून एक जोरदार किंकाळी ऐकू आली. किंकाळी बाईची की पुरुषाची हेही कळलं नाही. “क्या हुवा ?” जो तो एकमेकांना विचारू लागला “अरे यार कुछ नहीं... कोई तो गाडीसे गिर गया” कोणी तरी माहिती पुरवली. “अरेरे बेचारा” दोन चार जणांना वाईट वाटलं.

कळवा आलं मग ठाणा ...मग मुलुंड. गर्दी चढत राहिली उतरत राहिली. लोक पुन्हा आपल्या गप्पा आणि मोबाईल मधे बिझी झाले. ज्यांना उतरायचं होतं ते हळू हळू दरवाजाकडे सरकू लागले.

नाहूर आलं, पडलेल्या माणसाचा विचार करत मी उतरलो. डोक्यात चालू होतं फेसबुकवर सणकून काही तरी लिहायचं रेल्वे प्रशासनाला, सरकारला अगदी पंतप्रधानांना पण जाम हाणायचं. बाकीच्यांचं मरू दे पण निदान मी तरी फार संवेदनाशील आहे हे अख्ख्या जगाला ओरडून सांगायचं, पटवून द्यायचं.
.
इतक्यात मी ज्या गाडीतून उतरलो त्याच गाडीच्या लेडीज डब्यातून एक तरुणी धाडदिशी Platform वर पडली. आजूबाजूचे लोक तिला उचलायला धावले. नशिबाने तिला फार लागलं नव्हतं .........मी लांबच होतो. नकळत घड्याळाकडे लक्ष गेलं. मी वळलो आणि ऑफिसकडे चालायला सुरुवात केली.

हे असंच चालत आलंय आणि असंच चालणार ..............निषेध नक्की कोणाचा करायचा ?

सरकारचा ? रेल्वे प्रशासनाचा ? त्याच गाडीत जीवाच्या आकांताने घुसू पाहणाऱ्या त्या माणसाच्या अपरिहार्यतेचा ? पोटापाण्यासाठी मुंबईत कुत्र्या मांजराचं जीणं जगणाऱ्या गर्दीचा ? खिडकीत बसून फक्त बघ्याची भूमिका वठवणाऱ्या माझ्यासारख्या लाखो “हतबल” माणसांचा ?
.
त्या पडलेल्या माणसाचं काय झालं माहित नाही .....जर वाचला नसेल तर मेणबत्त्या वगैरे घेऊन मूकमोर्चा निघेल. त्या मोर्चाला मात्र मी आवर्जून जाईन. त्याच्या कुटुंबाच्या दुःखात मी पण सहभागी आहे हे सांगायला आणि कोणाचा तरी निषेध पण तोही “मुक्याने” नोंदवायला. फेसबुकवर टाकायला एक सेल्फी पण काढेन.
.
कधी तरी मीही असाच .....लोकलच्या दारातून जीवाच्या आकांताने आत शिरायचा प्रयत्न करत असेन .......गाडी वेग पकडेल ......त्या माणसासारखा माझाही हात सुटेल ............

निदान तोवर तरी मी खूप संवेदनाशील आहे गर्दीपेक्षा वेगळा आहे हे ओरडून सांगत राहीन ...

सोमवार, ४ जानेवारी, २०१६

एलपीजी सबसिडी


१० लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न असणाऱ्याची एलपीजी सबसिडी बंद होणार**
.
काल परवा कुठे तरी वाचलं की १० लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न असणाऱ्याची एलपीजी सबसिडी बंद होणार ...........खरोखर चांगला निर्णय 
.
ह्याच १० लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न असलेल्यांच्या मुलांना मिळणारा आरक्षणाचा लाभ का नाही बंद होत ? आरक्षणाचे फायदे किती पिढ्यांना द्यायचे ह्यासाठी काही मर्यादा नाहीच घालता येणार का ?
.
माझ्यासमोर अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्या आईवडलांनी सरकारी नोकरीत आरक्षणाचे फायदे घेतले आता चिरंजीव स्वतः फायदे घेत आहेत आणि त्यांच्या पुढच्या पिढीसाठीदेखील हेच फायदे उपटण्याच्या तयारीत आहेत.
.
ह्या स्पर्धेच्या युगात सर्वांचा “Starting Point” सारखाच असला पाहिजे वगैरे सगळं मान्य आहे पण न्याय द्यायचा म्हणून अजून किती वर्ष “Finish Point” च्या पुढे नेऊन सोडायचंय ?

शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

मुकुंदराव देवभानकर


मुकुंदराव देवभानकर...

नात्याने माझ्या सासऱ्यांचे मामा........म्हणजे आमच्या सौ.चे आजोबा वय वर्ष ७४ पण आजतागायत एवढा तरुण माणूस मी बघितलेला नाही.

मागच्या आठवड्यात एका लग्नाच्या निमित्ताने अहमदाबादला गेलेलो. अनायसे जातोच आहोत तर दोन ठिकाणं आवर्जून बघायचीच असं ठरवलेलं. एक म्हणजे अक्षरधाम मंदिर आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं गुजरातचं मुख्यालय असलेलं “हेडगेवार सदन”. काही कारणाने अक्षरधाम मंदिर बघायचं राहून गेलं पण मुकुंद आजोबांना भेटणं आणि तेही संघाच्या गुजरातच्या मुख्यालयात, नशिबात होतं.

गेली ४७ वर्ष मुकुंद आजोबांनी पूर्णवेळ संघकार्यासाठी वाहून घेतलंय. आता देशभर भ्रमंती चालू असते त्यांची. मला थोडाफार राजकारणात रस असल्याचं ( अक्कल असल्याचं असं नाही म्हणालेलो मी ) लक्षात आल्यावर छान गप्पा रंगल्या. आजोबांसारखेच संघकार्याला वाहून घेतलेले अजूनही काही सहकारी मग आमच्यात सहभागी झाले. सुरुवातीला मी अक्कल पाजळली पण मग जाणवलं की मी लहान तोंडी मोठा घास घेतोय. गंमत म्हणजे त्या लोकांना त्याचं काहीच वाटत नव्हतं एखाद्या बरोबरीच्या माणसाशी चर्चा करावी तशीच चर्चा चालू होती. बोलता बोलता राजकारणाबद्दलचे माझ्या डोक्यातले बरेच किडे कधी निघून गेले ते कळलंही नाही.

आजोबांच्या खोलीतली असंख्य पण खूप नीटनेटक्या पद्धतीने रचून ठेवलेली पुस्तकं नक्की मला हसत असणार
.अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन वर्षानुवर्ष निव्वळ फ्लेक्सवर दिसणारे “कार्यसम्राट” वगैरे राजकारणी किंवा स्वतःच्या वाढदिवसाला कुठल्या तरी अनाथाश्रमात जाऊन काही तरी वाटून फोटो काढून घेणारे “ज्येष्ठ” वगैरे समाजसेवक आजवर खूप बघितले पण एकाच ध्येयासाठी ......समाजासाठी अख्ख आयुष्य वाहून घेऊनही त्याबद्दल चकार शब्द काढायला तयार नसणारी मुकंदआजोबांसारखी माणसं माझ्या माहितीत तर फारशी नाहीत

......May be he "IS NOT THE” greatest but yessss he is great

आता ह्या वयात पण आजोबांना सामान्य लोकांसाठी देशपातळीवर काही नविन काम उभं करण्याची स्वप्न पडताहेत.

एरवी बायकोने ढोसलल्याशिवाय निघताना मोठ्या माणसांना नमस्कार करायची मला आठवण होत नाही पण त्या दिवशी मात्र कोणी आठवण करून न देताही मनापासून मुकुंदआजोबांना नमस्कार केला

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

संजय भंसाळीचा "बाजीराव मस्तानी"

























संजय भंसाळीचा "बाजीराव मस्तानी" येतोय. काल त्यातलं एक गाणं whatsapp वर पाठवलं कोणी तरी ....... चक्क बाजीरावांच्या पत्नी काशीबाई, मस्तानी बरोबर नाचताना दाखवल्या आहेत.


सिनेमा म्हटल्यावर थोडाफार मसाला घालावा लागतो वगैरे ठीक आहे पण इतका ? पैसे कमवण्यासाठी इतिहासाची इतकी मोडतोड़ ?

आधीच थोर ब्राह्मणद्वेष्टया इतिहासकारांनी बाजीराव ही व्यक्तीरेखा कधी "मस्तानी" पासून वेगळी करुन एक अपराजित सेनानी म्हणून मांडलीच नाही त्यात आता ह्या गल्लाभरु सिनेमाची भर.

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

बिहार विधानसभेचे निकाल

बिहार विधानसभेचे निकाल यायला सुरुवात झाली तसे भाजपचे सोशल मीडियावरचे विद्वान वाचाळवीर भलतेच कार्यरत झाले.
"दिल्लीत सुशीक्षीतांनी आप ला निवडून आणले मग पाणीपूरीवाल्यांकडून काय अपेक्षा ठेवणार" अशा आशयाची बेताल वक्तव्य भाजप कार्यकर्त्यांच्या फेसबुक वॉल वर झळकायला लागली.

खरं तर "पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला फसवणं सोपं होतं पण पाणीपुरीवाल्यांना फसवणं भाजपला अवघड गेलं" असंही म्हणता येईल की.

दीड वर्षापूर्वी मिळालेला विजय भाजपला अजुन पचवता आलेला नाही त्यात हा असा पराभव कुठून पचणार ?

उन्माद ....पक्षाच्या विरोधातले ते सगळे मुर्खच ही भूमिका ....वाचाळवीरता ...... हे सगळे गुण भाजपच्या पक्षशिस्तीचा भाग झालेत का ?

रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

कोणत्या दिशेने चाललाय हा प्रवास ?

एक थोर चीनी विचारवंत म्हणायचे "जोवर मांजर उंदीर खातंय तोवर ते पांढरं आहे की काळे याने काही फरक नाही पडत "
वरवर बघितलं तर हा व्यवहारवाद सहज पटण्यासारखा आहे.
.
सरकार बाबत पण मला तसंच वाटायचं .....काम करतंय ना ? मग ते "भगवं" "हिरवं" किंवा निळे असलं तरी चालेल.
अनेक अडचणीचे उंदीर सरकारने मारलेत हे मान्य आहे पण....
.
मी काय बघायचं नाही हे सरकार ठरवणार
मी काय बोलायचं नाही हे सरकार ठरवणार
मी काय खायचं नाही हे सरकार ठरवणार
कोणत्या दिशेने चाललाय हा प्रवास ?

सोमवार, ७ सप्टेंबर, २०१५

"लग्न" भल्या भल्यांना सरळ करतं

"लग्न" भल्या भल्यांना सरळ करतं. बायको हा प्राणीच असा असतो की तिथे सगळेच "शेर" ढेर होतात. पूर्वी बिघडलेल्या मुलाना सुधारण्यासाठी त्यांचं लग्न लावून द्यायचे म्हणतात.
आता कळलं दिग्बीजय सिंग इतके दिवस शांत का आहेत ? त्यांनी शेवटचं बेताल वक्तव्य कधी केलं होतं ते तरी आठवतंय का ? बसलेच ना गप्प लग्न ठरल्यापासून ?

पप्पुला सुधारण्यासाठी हा उपाय ट्राय करायला हरकत नाही त्यांच्या "मम्माने"


शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

भेंडी आणि शेपु


कोणी कधी काय खायचं नाही हे इतक्या खोलात जाउन सरकार ठरवतंय तर मग .....

भेंडी आणि शेपुच्या भाजीवर वर्षातले फक्त 365 दिवस सरकारने बंदी घालावी अशी माझी मागणी आहे.

माझा मावसभाऊ म्हणतो मुळात भेंडी ही भाजीच नाही ..... बायका तिला मारून मारून तिची भाजी करतात आणि नवऱ्यावर सुड उगवायला त्याच्या ताटात वाढतात 

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०१५

बाबासाहेब पुरंदरे
























बरं झालं शिवाजी महाराज ब्राह्मण नव्हते नाही तर “साहेबांच्या” जाती पातीच्या राजकारणात महाराज पण भरडले गेले असते.
पूर्वी कधी तरी काका विधातेच्या “संताजी” कादंबरीत एक उल्लेख होता. संताजी घोरपडे लहान असताना त्यांना शिकवणाऱ्या केशव भटांना त्यांनी विचारलं “स्वाभिमान आणि स्वामीनिष्ठा यात फरक काय “ केशव भटांनी दिलेल्या उत्तराचे नेमके शब्द मला आठवत नाहीत पण त्याचा अर्थ असा होता “स्वत:चा आणि स्वकीयांचा मान राखण्यासाठी जीवाची बाजी लावणं हा स्वाभिमान आणि स्वत:च्या स्वामीसाठी आप्त स्वकीयांच्या जीवावर उठायला तयार असणं ही स्वामीनिष्ठा”

“साहेबांच्या” श्वानपथकातल्या स्वयंघोषित इतिहासाचार्यांना ह्या पुढेही “साहेबांच्या धोरणानुसारच” नवीन नवीन शोध लागत राहतील आणि स्वामीनिष्ठेचं प्रदर्शन करण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखे शिव चरित्राचे कीर्तनकार त्यात भरडले जातील.... या सगळ्यात वेगळं किंवा आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.

मी इतिहासाचा अभ्यासक वगैरे नाही पण वाचक नक्की आहे. बाबासाहेब पुरंदरेनी महाराजांवर लिहायला बोलायला सुरुवात केली त्या आधी देखील महाराजांवर लिहीलं जात होतंच की, पण ती भाषा माझ्यासारख्या “मध्यमवर्गीय” अक्कल असणाऱ्याला न झेपणारी होती. तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी भगवत गीता साध्या सोप्या....त्या वेळच्या सर्वसामान्यांच्या भाषेत आणली....मला तुलना नाही करायची पण माझ्यासाठी ऋषीतुल्य बाबासाहेब पुरंदरेनी तसंच काहीसं केलं.

“साहेबांच्या” श्वानपथकात स्वेच्छेने भरती झालेल्यात मुंब्र्याच्या अनधिकृत वस्तीचा पुळका असणाऱ्या गावगुंडांपासून आयुष्यभर कुसुमाग्रजांवर भूंकून निर्लज्जपणे त्यांच्याच नावाचा पुरस्कार स्वीकारणारे पण आहेत याचं वाईट वाटतं.

काल तर ऐकलं की उदयनराजे भोसले पण आता बाबासाहेबांच्या विरोधात बोलताहेत .......हा विरोध त्यांनी सकाळी नोंदवला की संध्याकाळी हेही तपासून बघावं लागेल.

नकाच देऊ बाबासाहेबांना पुरस्कार काही फरक नाही पडत ...........महाराष्ट्राच्या घराघरात बाबासाहेबांनी लिहिलेलं शिवाजी महाराजांचं चरित्र आज भगवत गीता आणि ज्ञानेश्वरीच्या बरोबरीने जपलं जातं हाच खरा पुरस्कार आहे.

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०१४

..................मन:पूर्वक अभिनंदन ............



















कल्याण महापालिकेतील, लाचखोरीच्या आरोपासाठी निलंबित असलेल्या लाचखोर अधिकाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात येत आहे.
****आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी
****रुजू करून घेण्यासाठी प्रयत्न केलेल्या नगरसेवक
****ह्या निर्णयाविरोधात तोंड न उघडता मुग गिळून बसलेल्या सर्व नगरसेवक
****महापालिका क्षेत्रातून निवडून आलेले पण ह्या निर्णयाविरोधात तोंड न उघडलेल्या सर्व खासदार, आमदार


या ज्ञात आणि अज्ञात सर्व मान्यवरांचे ***
****आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील माझ्या सकट सर्व नागरीकांचे देखील ....
..................मन:पूर्वक अभिनंदन .............

माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलंय ..........

सगळे लाचखोरीचे आरोप असलेले अधिकारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उभे आहेत ...........विजयी वीरांच्या थाटात त्यांना ओवाळलं जातंय..............तुतारी, ढोल ताशे अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात हे अधिकारी आपापल्या दालनांकडे रवाना होताहेत ..............एरवी भकास दिसणारी महापालिका फुलांनी सजवलीये ..........त्यांच्या वाटेत फुलं उधळली जाताहेत ........महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी एकेका लाचखोराला हाताला धारून त्याच्या त्याच्या खुर्चीवर बसवताहेत ............अहाहा ...........

"काय वर्णावा तो सोहळा"
बहुतेक .........अच्छे दिन आ गये