भाकड कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भाकड कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १८ एप्रिल, २०१६

“ट्रेन मे बाथरूम को कडी लगाने को भूलनेवाले............”


टिळक चौक, पारनाका हे भाग म्हणजे आमच्या कल्याणातले “सदाशिवपेठ” मानले जातात. ह्या भागाबद्दल एक दंतकथा सांगितली जाते. देव म्हणे अक्कल वाटायला निघाला तेव्हा त्याने पारनाक्यापासून सुरुवात केली. गांधी चौक कासारहाट उरकून टिळक चौकात अक्कल वाटल्यावर देवाकडची अक्कल संपली .........त्यामुळे बाकीचं कल्याण “तसंच” राहिलं.
.
ह्या अशा विद्वत्तापूर्ण वातावरणात आमचा एक मित्रही जन्माला आला...........आजच्यापुरतं तात्या म्हणू त्याला आपण. साधारण १९ / २० वर्षांपूर्वी आम्ही ८ /१० मित्र केरळला एका मित्राच्या लग्नाला निघालेलो. आम्ही सगळे तसे समवयस्क म्हणजे विशी बावीशीतले एकदम गब्रू जवान वगैरे. कल्याणला रेल्वेच्या डब्यात शिरल्या शिरल्या प्रत्येकाने नीट Scanning करून झालं.
.
संपूर्ण डब्यात............जरा गारवा वाटेल अशी ......... मोजून एकच “हिरवळ” ...........मग प्रत्येक वेळी जाता येताना ............”जरा हसली काय रे ?”............ “आयला बघत पण नाय जाम आखडू दिसतेय रे”............ “आईशप्पथ कौन सी चक्की का आटा खाती होगी याsssssर” ............”अशी पोरगी पटली तर आपण तर सिगरेट, गुटखा दारू बिरू असल्या गोष्टींना हात पण नाय लावणार” अशा “विधायक” गप्पा चालू झाल्या.
.
आमच्या मित्राला म्हणजे तात्याला मात्र हे सगळं अजिबात मान्य नव्हतं ........म्हणजे त्या हिरवळीचं “असाध्य” असणं पटतच नव्हतं त्याला. “अरे अशा पोरी उलट पटवायला एकदम सोप्प्या असतात” ह्या त्याच्या म्हणण्यावर आमचा तात्या ठाम होता. दरम्यान जेवायची वेळ झाली. बाहेरचं खायला नको म्हणून प्रत्येकाने काही तरी करून आणायचं ठरलेलं. तात्या त्याच्या घरून तिखट मिठाच्या पुऱ्या आणणार होता. सगळ्यांनी डबे उघडले ........... तात्याने पण डबा उघडला ...........पुऱ्याच होत्या पण शेवपुरीसाठी वापरतात तसल्या पुऱ्या...............बोंबला च्यायला आता ट्रेन कुठे थांबणार ? तिथे काय मिळणार ? कारण रात्रीचे ११ वाजलेले. जाम वैतागले सगळे ............पण तात्या ठाम होता ........मी ह्याच पुऱ्या आणतो सांगितलेलं............कसं बसं काही तरी पोटात ढकललं आणि आडवे झालो. पुन्हा हिरवळीचाच विषय चालू............तात्याचं .......”मनात आणलं तर दोन तासात पटवू शकतो ............ती कधीची मला स्माईल देतेय” वगैरे............विद्वत्ताप्रचुर प्रवचन ऐकत एकेकाला झोप लागली
.
सकाळी जसजसे उठलो तसतसे “हलके” होऊन .........ब्रश वगैरे करून पुन्हा एक डोळा “हिरवळीवर” ठेऊन पत्ते, गप्पा चालू झाल्या. तात्यासाहेब उठले आणि बाथरूम मध्ये गेले.......... २ मित्र बाथरूम जवळच्या दारात उभे राहून हवा खात होते .............खरं तर तिथून “हिरवळ” जवळून बघता येत होती म्हणून त्यांना हवा खायची होती.
.
नेमकी तेव्हाच “हिरवळ” उठली आणि घाईघाईने........... आमचे तात्यासाहेब गेलेले त्याच बाथरूमकडे वळली ............. दरवाजातले मित्र काही बोलणार तोवर हिरवळ ........दरवाजा उघडून आत ...........तात्या खाडकन उठून उभाच राहिला ..........
.
ज्या वेगाने ती बाथरूमकडे गेलेली त्याच्या चौपट वेगाने ती जागेवर परत गेली..........तिची काय चूक? .......... रेल्वेतल्या बाथरूमला दोन कड्या असतात एक जी आतून आणि बाहेरून दोन्हीकडून लावता येते ...........आणि दुसरी फक्त आतून लावता येते ती. तात्यासाहेबांनी एकच कडी लावली ती नेमकी बाहेरून उघडणारी .............१० मिनिटांनी मान खाली घालून तात्या आला ........त्या क्षणापासून तात्याचा जो काय band वाजवला सगळ्यांनी. पुढचे ६ दिवस तोंड पण नाही उघडलं तात्याने.
.
मधे बरीच वर्ष गेली तात्या परदेशात पण जाऊन आला नोकरीच्या निमित्ताने. एकदा ट्रेन्सचा प्रॉब्लेम होता खूप. एक एक करत पुन्हा मित्र भेटत गेले. platform वर एक गाडी उभी होती पण खच्चून भरलेली. नेमका आम्हाला तात्या दिसला. काय कसं काय वगैरे गप्पा चालू असताना एका मित्राने तात्याला विचारलं “काय तात्या परदेशात जाऊन आलास ...........मग जीवाची मुंबई केलीस की नाही ............पोरी एकदम free minded असतात ना रे तिकडे ? तात्याची कळी खुलली .........”अरे मग एकदम मज्जा असते तिकडे .........आपण तर फुल्ल्ल टू मज्जा केली” तात्याने त्याचं वाक्य संपवायच्या आत ..........शक्य तेवढा भाबडा चेहेरा करून एकदम प्रेमाने दुसऱ्या मित्राने तात्याला प्रश्न केला
.
.
...........तेव्हा तरी कडी नीट लावलेलीस ना रे ?
.
पेटलेला तात्या ......... .......वेडात मराठे वीर दौडले सात सारख्या आवेशाने .....समोरच्या खच्चून भरलेल्या लोकलमध्ये जीव तोडून घुसला .........लोकल निघून गेली ...........बरीच वर्ष झाली तात्या दिसला नाही ........बहुतेक आम्हाला बघून तात्या रस्ता बदलत असणार
म्हणून म्हणतो ................
.
“ट्रेन मे बाथरूम को कडी लगाने को भूलनेवाले............जगाला अक्कल सिखाया नहीं करते”

सोमवार, ४ एप्रिल, २०१६

Team Building and Knowledge Sharing


व्यवस्थापन शास्त्रात चांगली Team बनवता येणं आणि त्या Team ची Productivity सतत वाढवत नेणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. फक्त Corporate जगातच नाही पण Team Building चं महत्त्व राजकारण, समाजकारण, खेळ, मनोरंजन अशा प्रत्येक क्षेत्रात तेवढंच मानलं जातं. Team मधल्या आपल्या सहकाऱ्यांना आपण ज्या Project वर काम करतोय त्याची इत्यंभूत माहिती असणं गरजेचं असतं असंही मानलं जातं.



गावी म्हणजे कराडजवळ म्हासोलीला आमचं जुनं घर आहे, घर कसलं मस्त मोठाच्या मोठा वाडा आहे. काका तिथेच राहायचे पूर्वी पण आता नोकरीनिमित्त ते कराडला राहतात. लहानपणी सुट्टीत बऱ्याचदा आम्ही आठ दहा चुलत आणि आत्ते भावंडं, आमच्या गावच्या वाड्यात जमायचो. अख्खा दिवस वाडा डोक्यावर घ्यायचो. वाड्याच्या आतच एक विहीर म्हणजे आड होता, एका काकांचं किराणा सामानाचं दुकान होतं आणि आमचीच पिठाची गिरणी पण होती. कशासाठीच वाड्याच्या बाहेर पडायची गरज नसायची. हां पण त्यावेळी “घर घर मे शौचालय” वगैरे
concept एवढे कोणी seriously घेतलेले नव्हते त्यामुळे सकाळी सकाळी तांब्या घेऊन ...........बाहेर पडायलाच लागायचं.


मॉल्स, रेल्वे स्टेशन्स किंवा ऑफिसेस मध्ये पुरुष आणि महिला प्रसाधनगृह वेगळी असतात तशीच गावाकडे सकाळी “हलकं व्हायला जाण्याचे ठिकाणं पण स्त्रीया आणि पुरूषांसाठी वेगवेगळी असतात. तसे “बोर्ड” लावलेले नसले तरी ते तारतम्य तिथे सगळ्यांकडूनच पाळलं जातं.


आम्ही सगळे भाऊ सकाळी त्या “कार्यक्रमाला” एकत्रच निघायचो. सगळे लहानच असलो तरी त्यातही अगदीच दुसरी तिसरीतले भाऊ म्हणजे कच्चे लिंबू किंवा बच्चे कंपनी आणि आम्ही पाचवी सहावीतले म्हणजे “दादा कंपनी” असायचो. गावाकडे साप भरपूर असायचे आणि सगळ्यात जवळचं हॉस्पिटल साधारण ३० किलोमीटरवर ............रोज सकाळी आपापले तांबे घेऊन निघताना घरातली मोठी माणसं न चुकता दम द्यायची ...........”लांब जाऊ नका .........मस्ती करू नका” वगैरे वगैरे.


आम्ही सगळेच शहरात रहायचो ( कल्याण तेव्हाही म्हणजे ३० /३५ वर्षापूर्वीही शहरच मानलं जायचं )  त्यामुळे “त्या” अवस्थेत कोणी बघेल याची लाज वाटायची ...........मग आम्ही शक्य तेवढं गावापासून लांब जायचो .........मोठी झुडूपं असतील अशा जागा शोधायचो.


त्या दिवशी पण तसंच झालं........खूपच लांबवर गेलेलो आम्ही ........एकमेकांकडे पाठ करून कार्यक्रम उरकतच आला होता तेवढ्यात आमच्यापैकी एकाला साप दिसला ........त्याने “साप साप” म्हणून बोंबलायला सुरुवात केली ............चांगला ४/५ फुट लांबीचा काळाकुट्ट साप आमच्या जवळूनच सळसळत निघून गेला .........भीतीने काहींचा उरलेला “कार्यक्रम” पटकन उरकला .........तर काहींनी आवरता घेतला .........आणि घराकडे पळत सुटलो सगळे. घरी येऊन आम्ही साप बघितला हे सांगण्याची सोय नव्हती कारण मग कुठे बघितला हा प्रश्न आला असता.



इतक्या लांब का गेलात ह्याची विचारणा मोठ्यांकडून, तोडापेक्षा जास्त हाताने किंवा हातात लागेल त्या काठीने अगदीच वेळप्रसंगी पायाने पण झाली असती आणि उत्तरं देता देता पाठ आणि आणि बरंच “काय काय” सोलापटून निघालं असतं. आम्ही सगळ्यांनी घरी तोंडं बंद ठेवायचं ठरवलं........जे कच्चे लिंबू होते त्यांच्याकडून पण “आपण साप बघितला नाही, आपण लांब गेलो नव्हतो” असं दहा दहा वेळा वदवून घेतलं आणि चोरासारखे वाड्यात परतलो.


आम्ही सगळेच जरा गप्पगप्प आहोत हे घरातल्या मोठ्यांच्या लक्षात यायला वेळ नाही लागला .......आम्ही मोठे जेवढे होतो तेवढे बऱ्यापैकी बनेल होतो .........विचारलं गेलं तर मस्त गोल गोल फिरवलं सगळ्या मोठ्यांना ...............पण जसं जरा दमात घेऊन बच्चे कंपनीला विचारायला सुरुवात झाली तसं आमचं धाबं दणाणलं. पहिल्या एक दोन प्रश्नानंतरच त्यांनी बोंबलायला सुरुवात केली “आम्ही साप नाही बघितला ..........आम्ही लांब नव्हतो गेलो.......... “आम्ही साप नाही बघितला ..........आम्ही लांब नव्हतो गेलो” काय समजायचं ते सगळ्या घरात समजलं.


मग जे काय वरात निघाली आम्हा दादा कंपनीची .....................तासभर धुलाई चालू होती ..........सगळे आम्हाला बदडून दमले तेव्हा थांबलं सगळं ............. सालटी निघणं काय असतं ते तेव्हा नीट कळलं.

Team Building पण असंच असतं ना राव ............तुमचे सहकारी नीSSSSSSट विचार करून निवडावे लागतात ..........”कच्चे लिंबू” घ्यावेच लागणार असतील तर चालू Project मध्ये किती “साप” उरलेत ह्या बद्दलचं किती Knowledge Share करायचं हेही विचार करून ठरवावं लागतं नाही तर .........सालटी निघणार हे १००% निश्चित.


मंगळवार, २९ मार्च, २०१६

रिक्षावाल्या साहेबांचं सौजन्य

रोजच्या प्रमाणे त्या दिवशीही ऑफ़िसला जाण्यासाठी म्हणुन कॉम्प्लेक्स च्या गेटमधुन बाहेर पडलो, समोर बघितलं तर रस्त्याच्या पलीकडे चक्क ४/५ शेअर रिक्षावाले रांगेत उभे होते. कहर म्हणजे टोळकं करून बिड्या ओढत एकत्र न उभे राहता आपापल्या रिक्षात बसून होते.  मी रस्ता क्रॉस करणार तेवढ्यात माझ्यासमोर एक रिकामी रिक्षा थांबली.

रिक्षावाल्याने अदबीने विचारलं "साहेब कुठे जाणार" 
खरं तर आमच्या इथून रिक्षावाले ..........कधीच कुठेच जात नाहीत
मी चाचरत उत्तर दिलं "स्टेशन"
तो पुन्हा तेवढ्याच अदबीने म्हणाला "बसा साहेब"
"किती पैसे घेणार ?" महिनाअखेर होती ......... पुन्हा चाचरतच मी विचारलं
रिक्षावाला चक्क गोड हसला आणि म्हणाला "काय साहेब थट्टा करताय ? मिटर ने होतील तेवढेच दया "

मला चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं
, मी तसाच रिक्षात बसलो, त्याने मिटर टाकलं, मिटरचा आवाज ऐकुन दचकुन मी थोडा  भानावर आलो. गेल्या ४० वर्षात पहिल्यांदाच कल्याणातल्या रिक्षाच्या मिटरचा एवढा गोड आवाज ऐकला होता आणि चालु असलेलं मिटर पण बघितलं होतं.

रिक्षा चालवता चालवता रिक्षावाले साहेब सांगायला लागले
"आता आम्ही प्रवाशांशी सौजन्याने वागायचं ठरवलंय, प्रत्येक रिक्षामधे एक रजिस्टर ठेवलंय त्यात प्रवाशांनी आमची सेवा कशी वाटली त्याबद्दल लिहायचंय, सर्वात चांगली सेवा देणाऱ्या रिक्षाचालकाचा आमच्या युनियनतर्फ़े सत्कार केला जाणार आहे, आम्ही रिक्षा चालवताना शिव्या देणार नाही, गुटखा खाउन पचापचा थुंकणार नाही, फ़ालतु कारणांसाठी प्रवाशांना झोडणार नाही, कुठलंही भाडं नाकारणार नाही, रात्रीची वेळ बघुन प्रवाशांना लुटणार नाही"

रिक्षावाल्या साहेबांचं सौजन्य पाहुन माझ्या डोळ्यासमोर पुन्हा अंधारी यायला लागली तेवढ्यात एकही हादरा बसु न देता रिक्षा स्टेशनला पोचली.

"किती झाले ?" मी पुरता सावरलो नव्हतोच खरं तर
"सतरा रुपए पन्नास पैसे" मी विसची नोट दिली
त्याने अडीच रुपए परत केले, मला पुन्हा गरगरायला लागलं, आज ऑफ़िसमधे सगळ्यांना चहा पाजायचं ठरवुन मी स्टेशनकडे वळलो.

साला...................पुन्हा तेच.......... बायकोने पुन्हा तोंडावर पाणि ओतुन झोपेतुन उठवलं आणि कळायला लागल्यापासुन ( नक्की कितव्या वर्षापासुन कळायला लागलं त्याबद्दल वाद होवु शकतो म्हणुन वर्ष लिहीली नाहीत) उराशी जीवापाड जपलेलं एक स्वप्न पुन्हा मोडलं.

माझ्या स्वप्नाचा चक्काचुर होत असताना "खळ्ळ्ळ फ़टॅटॅटॅक" असा आवाजही आला मंडळी..........


गुरुवार, ३ मार्च, २०१६

व्यवहारज्ञान.........आणि समयसूचकता



गेली दहा वर्ष “पूर्णवेळ” व्यवसाय करूनही काही गोष्टी मला आत्मसात करता आलेल्या नाहीत. कदाचित “गाणं” जसं रक्तात असावं लागतं तशाच ह्या गोष्टी रक्तात असाव्या लागतात.
साधारण १० / १२ वर्षापुर्वीची गोष्ट आहे. मी नविनच मोटरसायकल घेतलेली. तेव्हा ऑफिस चर्नी रोडला  म्हणजे गिरगावात होतं. कल्याणपासून by road अंतर होतं ६० किलोमीटर. तरीही आठवड्यातून चार दिवस मी मोटरसायकल घेऊन ऑफिसला जायचो. कल्याणला राहणारे आणि माझ्यासारखेच किडे असणारे काही मित्र जाता येताना बरोबर असायचे.

इम्रान नावाचा माझा एक मित्र म्हणजे अस्सल नमुना.... बऱ्याचदा इम्रानच माझ्या बरोबर असायचा. त्याचं ऑफिस तेव्हा नरीमन पॉइंटला होतं. संध्याकाळी निघताना एकमेकांना फोन करायचा आणि मी त्याला सी.एस.टी. स्टेशनच्या समोरून pickup करायचं असं आमचं ठरलेलं असायचं.

त्या दिवशीही तसंच त्याला घेतलं आणि भायखळ्याला पोचलो तेव्हा आठवलं, एका मित्राच्या मुलाने क्रिकेट साठी जे सीझनचे बॉल  लागतात ते आणायला सांगितलेले. हे बॉल मिळतात अहमदाबाद स्पोर्ट्स नावाच्या दुकानात मेट्रोजवळ. म्हणजे पुन्हा ट्राफिक मधून रांगत भायखळा ते मेट्रो उलटं जावं लागणार होतं, साधारण ८ किलो मीटर. बॉल नेले नसते तर मित्राच्या लेकाने क्रिकेटची Bat डोक्यात घालायची खूप शक्यता होती.

परत फिरावं लागणार हे इम्रानला सांगितलं, त्याची काहीच हरकत नव्हती. तेवढ्यात समोर यु टर्न मारायला जागा दिसली पण........... तिथे यु टर्न चालणार नसल्याची पाटी होती. पुढे जायला लागणार होतं. मी विचार करत होतो, पुढे लवकर यु टर्न मारता येण्याची शक्यता कमी होती.

“भाई तू मार यु टर्न कूछ नहीं होगा” इम्रानने “ग्यारंटी” दिली. मी पटकन त्या पाटीकडे दुर्लक्ष करत यु टर्न मारला..........आणि .......रस्त्याकडेच्या झाडाआडून बरोबार .......पोलिसमामा दत्त म्हणून समोर अवतरले.

हो.... नाही .....पाटी दिसलीच नाही .......खूप अर्जंट काम आहे .......वगैरे वगैरे सांगून झालं ............शेवटी मामा शंभरवरून पन्नास रुपयात सोडायला तयार झाले. मी पैसे दिले मामा दुसरा बकरा शोधायला झाडामागे चाललेच होते.

“ओ साब एक मिनिट इधर आओ” इम्रानने हाक मारली ....माझ्या पोटात गोळा आला, आता हा बाबा वाद घालतो की काय म्हणून. तोवर मामा जवळ आले
“मेरेको बीस रुपये दो वो पचास मे से” इम्रानने मामांना सांगितलं. मामांच्या आणि माझ्याही चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं इम्रानच पुढे बोलला......
“मैने इसको बोला यु टर्न मारनेको इस के लिये इसने यु टर्न मारा............मेरी वजह से आप को पचास मिला तो उसमेसे मेरेको भी मिलना चाहिये ना साब” शक्य तेवढ्या निरागस आवाजात इम्रान बोलला............मी गाडी stand वर लावून हसत सुटलो ...........मामांना काय बोलावं तेच सुचलं नाही ...........हसत हसत त्यांनी माझी ५० ची नोट इम्रानच्या हातावर ठेवली आणि हसत हसतच जायची खूण केली (मनातल्या मनात साष्टांग नमस्कार पण घातला असणार)

आम्ही अहमदाबाद स्पोर्ट्स मधे गेलो मग कल्याण कडे निघालो. आता हा माझे माझे पन्नास परत करणार की स्वतःकडेच ठेवणार ह्याचा विचार करत आम्ही कल्याणला पोचलो. इम्रानच्या घराजवळ सोडल्यावर पठ्ठ्या सरळ चालू पडला. म्हटलं च्यायला गेले पन्नास.....जाऊ दे गेलेलेच होते. पण मग थोडा विचार करून इम्रानला आवाज दिला

“इम्रान यार इधर आ.........साले तेरेको शरम नहीं आती ? सी.एस.टी. से यहां तक मेरे गाडी पे आरामसे बैठ के आया ....पेट्रोल का आधा पैसा तो दे” त्याच्या कडून जे व्यवहारज्ञान शिकलो ते मी त्याच्यावरच वापरलं.

“भाई देने के लिये तो मै आधा क्युं पुरा पैसा दे दु .....लेकीन अगर किसी को येह समझा तो तेरी क्या इज्जत रहेगी ? लोग सोचेंगे तू मेरे लिये रिक्षा चला रहा है .......यार तू इतना बडा आदमी .....येह अच्छा दिखेगा क्या ?
मगासच्याच निरागस आवाजात ......चेहेऱ्यावर तेवढीच निरागसता ओतून इम्रानने उत्तर दिलं
च्यायला आला का “इज्जत का सवाल” त्यात आणि “बडा आदमी” वालं चोकलेट.............मी काही विचार करून उत्तर देईपर्यंत “इम्रान भाईनी” त्यांच्या बिल्डींगच्या पायऱ्या चढायला सुरुवात पण केली.

आजतागायत ना ते पन्नास रुपये आणि पेट्रोलचे अर्धे पैसे त्याने मला देऊ केले ना मी मागायच्या फंदात पडलो .........ज्या गुरुकडून जे शिकतो ते त्याच्यावर वापरायचं नाही एवढं मात्र शिकलो.

म्हणून मला मनापासून वाटतं व्यवहारज्ञान .........आणि समयसूचकता ह्या गोष्टी रक्तातच असाव्या लागतात कोणी तरी शिकवून त्या येत नाहीत.


रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

मी पुरस्कार परत करणार.....



निषेध - पुरस्कार परत करणार.....

काल एक किलो तुरडाळ आणायला बायकोने वाण्याकड़े पिटाळलं ...... रुबाबात शंभराची नोट काढून वाण्याला दिली आणि एक किलो तुरडाळ मागितली.

माझ्याकड़े दयाभावाने बघत वाण्याने सांगितलं "इतने में तो आधा किलो आयेगा"
मी म्हटलं "अरे बाबा राज्य सरकारने तसं जाहिर केलंय"
"तो जाके सरकारसे ले लो" असं म्हणून तो दुसऱ्या customer कड़े वळला
त्या वाण्याने आणि पर्यायाने सरकारने एका मराठी मध्यमवर्गीय माणसाला दाखवलेली "असहिष्णुता" बघुन माझ्यातला "सहिष्णु" माणूस जागा झालेला आहे.

साहित्यिक नसलो म्हणून काय झालं मलाही पुरस्कार मिळालेला आहे. त्या वाण्याचा आणि पर्यायाने सरकारचा निषेध म्हणून तो पुरस्कार मी परत करायचं ठरवलं आहे.

१९८३ साली ओक बाग़ गणेशोत्सव मंडळातर्फे घेण्यात आलेल्या चमचा लिम्बु शर्यतीत भाग घेतल्याबद्दल मिळालेला हा पुरस्कार मी परत करतो आहे. राज्य सरकारने आपला प्रतिनिधी पाठवून तो घेऊन जावा.

टीप - पुरस्कार म्हणून मिळालेली ही ताटली आम्ही गेली 32 वर्ष वापरली असली तरी मी स्वतः ती घासुन ठेवलेली आहे.

मंगळवार, १९ मे, २०१५

Programming Language


आमच्या ऑफिस मध्ये PHP Developers साठी Interviews चालू आहेत .....

.मी उगाच तिथे लुडबुड करायला गेलो .....
.
आमच्या टीम लीडरने समोरच्या मुलीला प्रश्न विचारला .........तू कोणत्या Programming Language मध्ये तुझं Final Year चं प्रोजेक्ट केलं आहेस ?
...........English..........तिने शांतपणे उत्तर दिलं ........

.बिचारा टीम लीडर अजून शुद्धीत यायचाय ...........मी निट कलटी मारून बाहेर आलोय .........

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१३

महागडा डॉलर - घसरता रुपाया - एक उपाय



परवा आमचा एक मित्र सकाळी सकाळी आरडा ओरडा करत घरी पोचला. वेळ सकाळची होती आणि “श्रावण” महिना चालू आहे त्यामुळे इतर काही शंका घ्यायला जागाच नव्हती. घसरलेला रुपाया हे त्याच्या चिंतेचं कारण होतं. जागतिक बाजारपेठेत घसरत चाललेली भारताची पत हे त्याच्या रागाचं कारण होतं.

मी म्हटलं “बाबा रे आपले पंतप्रधान अर्थतज्ञ पण आहेत आपण थोडा धीर धरूया, त्यांना थोडा वेळ देऊया, निघेल काही तरी मार्ग”
“पण तोवर आपण भिकेला लागलेलो असू” मित्र त्याचा मुद्दा न सोडता म्हणाला. हा आता असाच वाद घालत बसणार आणि फुकटचा नाश्ता गिळल्याशिवाय मुद्दा पण सोडणार नाही आणि खुर्ची पण सोडणार नाही हे एव्हाना मला जाणवलं होतं. मुठी वळून सशस्त्र क्रांतीच सर्व समस्यांवर कसा पर्याय आहे ते तो मला पटवून द्यायला लागला.

खूप प्रकारे समजावून सांगितलं पण ऐकायलाच तयार होईना. शेवटी मी त्याला एक पर्याय सांगितला त्याला म्हटलं “आपण एक काम करू “Reserve Bank of India” ला पत्र पाठवू आणि आपल्या चलनातले “पैसे” रद्द करून टाकायची विनंती करू”
“त्याने काय होईल ?” कपाळावर आठी चढवत मित्राने विचारलं
अट्टल बुद्धीवाद्याचा आव आणत मी पुढे सांगितलं
“ अरे आत्ताचे “पैसे” चलनातून बाद करायचे आणि आज आपण ज्याला १ रुपाया म्हणतो त्याला १ पैसा म्हणायचं म्हणजे १०० रुपयांचा एक रुपाया होईल की नाही ?
बहुतेक त्याच्या डोक्यावरून गेलेलं तरीही त्याने मान डोलावली मला त्याची दया आली मी माझा मुद्दा अजून स्पष्ट केला,
“ तुझ्याकडे आत्ता किती पैसे आहेत ? त्याने मान खाली घालून त्याचं पाकीट माझ्या समोर ठेवलं पाकिटात फक्त ७५ रुपए आणि साडेबारा रुपयांची चिल्लर होती. साडेबारा रुपए खिशात टाकून मी म्हटलं आता चिल्लर बाद होणार ह्याचा तुला उपयोग नाही. नवीन चलनाप्रमाणे तुझ्याकडे आता ७५ पैसे आहेत.

त्याने पुन्हा मान डोलावली मी मग माझा मुद्दा अजून आत्मविश्वासाने पुढे रेटला.
“तुझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो डॉलर च्या तुलनेत घसरणाऱ्या रुपायाचा आता ह्या नवीन चलना प्रमाणे एका डॉलर साठी पूर्वीचे ६३ रुपए म्हणजे आताचे फक्त ६३ पैसे मोजावे लागतील” ही Theory ऐकून मित्राचा चेहेरा एकदम उजळला. ताबडतोब सशस्त्र क्रांतीची कल्पना बाजूला ठेऊन “Reserve Bank of India” ला पत्र पाठवायला तो उठून चालू पडला.

आता ह्या हिशोबाने सहज येता येता बायको २००० रुपयांची नाही फक्त २० रुपयांचीच साडी घेईल हे ऐकायला किती छान वाटेल असा विचार करत मी जाम खुश झालो.

अशा हिशोबाने आता तुमचा पगार किती होणार हा विचार करत बसा आणि दुःखी व्हा.......... मी मात्र नाश्ता वाचल्याच्या खुशीत एक प्लेट पोहे अजून खाल्ले आणि खिशात साडेबारा रुपयांची चिल्लर खूळखूळवत कामाला लागलोय.

मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१२

चष्म्याची गोष्ट



माझा एक मित्र आहे, त्याला राजाकारणातलं फार कळतं ( असं तोच सांगत हिंडतो ). परवा तो तणतणत घरी आला, म्हणाला .......

“ह्या देशाचं काही तरी केलं पाहीजे”
मी म्हटलं “छान तर चाललंय तुझ्या का पोटात दुखतंय ?”
तो तेवढ्याच तावातावाने म्हणाला “तू मुर्ख आहेस” ( बायकोला त्याचं म्हणणं पटलं तिने लगेच चहा ठेवला ) पुढे म्हणाला “तुला जर सगळं छान चाललंय असं वाटत असेल तर त्याचा अर्थ तुझा चष्मा बदलायची

वेळ आलीये, नीट दिसत नाहीये तुला ..........तू मुर्ख आहेस”

पुन्हा पुन्हा मला माझ्या समोरच मुर्खात काढलेलं आवडत नाही
मी म्हटलं “चष्मा बदलून काही होत नाही संपूर्ण व्यवस्थाच बदलायला पाहिजे”
लगेच आव्हान देत तो म्हणाला “चल सिद्ध कर तुझं म्हणणं”

म्हटलं “चल बाहेर जाउया मी आत्ताच सिद्ध करतो” ........ फुकटच्या चहावर पाणी सोडणं त्याच्या जीवावर आलं होतं पण प्रश्न तत्त्वाचा होता नाईलाजाने तो तयार झाला. आम्ही रस्त्यावरून एक लाल, एक निळ्या काचांचा, एक हिरव्या काचांचा आणि एक भगव्या काचांचा चष्मा असे एकूण चार चष्मे विकत घेतले. पैसे अर्थात मीच दिले.

मी त्याला घेऊन राजकारण्यांच्या एका “अड्ड्यावर” ( अड्ड्याला काय म्हणतात ते सांगत नाही कारण मग लगेच “देशद्रोहाचा” गुन्हा दाखल होतो ) गेलो आणि त्याला म्हटलं हिरवा चष्मा घाल आणि डोळे नीट उघडून बघ ह्या लोकांकडे.

त्याने हिरवा चष्मा घातला आणि राजकारण्यांकडे बघितलं आणि म्हणाला “ सगळे चोर तर हिरवे दिसताहेत एकजात, सगळे साले मुस्लीम धार्जिणे आहेत. एकेकाला गोळ्या घातल्या पाहिजेत”

मी त्याला हिरवा चष्मा काढून लाल चष्मा घालायला दिला, त्याने लाल चष्मा घातला आणि म्हणाला “ आयला हे पण चोरच तर दिसताहेत, लाल रंगात माखलेत, कम्युनिस्ट आहेत सगळेच. कशी होणार प्रगती ?”

मी मग त्याला भगवा चष्मा दिला एव्हाना तो हैराण होत चालला होता त्याने चष्मा घातला “ आईच्चा घो हे पण चोर दिसताहेत, आणि कट्टर हिंदूत्ववादी धर्मांध पण आहेत. धर्माभिमानाच्या नावाखाली दंगली माजवणारे हेच आहेत”

मी तोही चष्मा काढून घेतला आणि आता शेवटचा निळा चष्मा त्याला दिला तो सात्त्विक संतापाने धुमसत होता पण त्याच्या समोरही दुसरा पर्याय नव्हता .........प्रश्न तत्त्वाचा होता “ आई शप्पथ हे पण साले चोरच दिसताहेत यार, हे तर सगळे ब्राह्मण विरोधी आहेत”

चष्मे संपले होते त्याने सुटकेचा श्वास सोडला.

“बाबा रे तुला नक्की काय म्हणायचंय ते सांगशील का ? त्याने काकुळतीला येत विचारलं

मी म्हटलं थांब अजुन माझं “Demonstration” संपलं नाहीये त्याच्या पोटात गोळा आला. मी त्याला फरफटत प्राणीसंग्रहालयात घेऊन गेलो. माकडांच्या पिंजऱ्यासमोर त्याला उभं केलं. माकडांनी थोडा निषेध व्यक्त केला पण बहुदा त्यांना आमची फारशी दाखल घ्यावीशी वाटली नाही.

सगळं झाल्यावर मी जेवायला घालायचं वचन दिलं त्याला. मग जरा उत्साह वाढला त्याचा
मग पुन्हा आधीसारखेच एक एक करून सगळ्या रंगांचे चष्मे घालून त्याला माकडांकडे बघायला सांगितलं. तो गप्प होता. त्याने मी सांगितल्याप्रमाणे चष्मे बदलून बदलून माकडांकडे बघितलं.

आता मला जरा चेव चढला मी विचारलं “काय फरक वाटला चष्मा बदलल्यावर ?”
तो म्हणाला “चष्मा बदलल्यावर माकडांचे रंग बदलले फक्त”

” E...X....A.....C...T.....L....Y....”..मी जोरात ओरडलो, पिंजऱ्यातली माकडं पण दचकून ऐकायला लागली आता नीट आठव.... राजकारण्यांकडे बघताना प्रत्येक वेळी चष्मा बदलल्यावर तुला त्यांचे रंग बदललेले दिसले पण ते प्रत्येक रंगात तुला चोरच दिसले right ?“

त्याने होकारार्थी मान हलवली.

“कोणत्याही रंगाच्या, सकारात्मक किंवा नकारात्मक चष्म्यातून, कोणत्याही कोनातून राजकारणी चोरच दिसतील कारण ते चोरच आहेत. आणि म्हणून जर काही चांगलं घडावं असं वाटत असेल तर वेळच्या वेळी “diaper” बदलणं जसं गरजेचं असतं तसेच “राजकारणी” बदलणं गरजेचं असतं” मी प्रवचन चालू केलं.

मला अजुन बरंच काही सुचत होतं पण फुकटच्या जेवणावर पाणी सोडून माझा मित्र निमूट मान खाली घालून चालू पडला.

जेवणाचे पैसे वाचले म्हणून खुष होऊन मी टाळीसाठी पिंजऱ्यातल्या माकडासमोर हात धरला. माझ्या प्रखर बुद्धीवादी, तेजस्वी आणि जाज्वल्य वगैरे विचारांनी भारावून जाऊन माकडाने एका हाताने त्याचं “शोषित” ढुंगण खाजवत दुसऱ्या हाताने मला जोरदार टाळी दिली.

घरी आलो आणि सकाळचा वाचलेला चहा पुन्हा गरम करायची ऑर्डर सोडून निवांत लोळत पडलो.

तुमच्यापैकी कोणाला हवेत का ते चष्मे ? बघा हवं तर तुम्ही पण चेक करा ...............


अण्णांचे संस्कारवर्ग


अण्णा हजारेंचं आंदोलन यशस्वी झालं. मी घरात आणि ऑफ़िसमधे बसुन अण्णांना जी "भरघोस" मदत केली, त्याबद्दल ऐकुन अण्णा खुप खुष झाले. उपोषण सोडल्याबरोबर अण्णांनी मला फ़ोन केला आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मला भेटायला येत असल्याचं सांगितलं पण अण्णांच्या तब्बेतीचा विचार करुन मीच राळेगणसिद्धिला जायचं ठरवलं..

मी अण्णांना भेटायला जाणार आहे असं कळल्याबरोबर पंतप्रधान कार्यालयातुन मला फ़ोन आला आणि कोणीतरी माझ्याशी बोललं ( बहुदा समोर असलेलं वाचुन दाखवलं ) मला सांगण्यात आलेलं मला पटलं ( एक अक्षरही कळलं नव्हतं तरीही ) शेवटी सुशिलकुमार शिंदेंनी मराठीत सांगितलं तेव्हा कळलं. आता सगळ्या जगासाठी मी अण्णांचं अभिनंदन करण्यासाठी राळेगणसिद्धिला जात होतो पण खरं तर केंद्र सरकारने आखलेल्या एका योजनेसंबंधी चर्चा करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात काही भागात रस्ते असतात पण गुप्त असतात, लोकांना दिसत नाहीत म्हणुन वापरुन खराबही होत नाहीत तशीच ही योजना गुप्त स्वरुपाची होती.

शाहीद बलवाला तिहार मधे फोन करुन माझ्यासाठी एक हेलीकॉप्टर पाठवायला सांगितलं. त्याने लेगेच ऐकलं, शरद पवारांचं बुकींग रद्द करुन त्याने माझ्यासाठी व्यवस्था केली. माझं राळेगणसिद्धिला जंगी स्वागत करण्यात आलं. किरण बेदींनी ट्विटर वर लगेच मी आल्याचं जाहिर केलं..


केंद्र सरकारची योजना मी अण्णांना थोडक्यात समजावुन सांगितली. केंद्र सरकारला मदत करायचं अण्णांनी लगेच मान्य केलं. य़ोजना अशी होती की, ए. राजा, कलमाडी कणीमोळी, मधु कोडा अशा राजकीय नेत्यांपसुन ते अगदी कल्याण महापालिकेच्या सुनिल जोशी आणि परवा रंगेहाथ पकडल्या गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तापर्यंत सगळ्यां भ्रष्टाचाऱ्यांना ( फ़क्त सापडलेल्या ) केंद्र सरकारने एका नविन तुरुंगात हलवायचे ठरवले होतं.

जयप्रकाश नारायणांनी जसं चंबळच्या खोऱ्यात डाकुंना मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन केलं होतं त्याच स्टाइल मधे कॉंग्रेसचे युवराज ह्या भ्रष्टाचाऱ्यांना भ्रष्टाचार सोडण्याचं आवाहन करणार होते. केंद्र सरकारला हेही माहित होतं की ह्या आवाहनाचा काडीइतकाही उपयोग होणार नाही कारण दारुडयाला दारु सोडायला दारुडयाने सांगुन उपयोग नसतो.

अण्णांनी ह्या सगळ्या भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या महाभागांचे "संस्कारवर्ग" घ्यावेत म्हणजे कदाचित त्यांचं ह्र्दयपरिवर्तन वगैरे  होइल अशी केंद्र सरकारला आशा होती. नंतर त्या सर्वांना सरकारी नोकऱ्या देउन त्यांचं पुनर्वसन करण्याचाही सरकार विचार करत होतं.

इतर वेळी अण्णांनी सरकारवर विश्वास ठेवला नसता पण मला नकार देणं त्यांना अवघड गेलं. अण्णा तयार झाले. आम्ही लगेच केंद्र सरकारला तसं कळवलं. ताबडतोब खास विमानाने मी आणि अण्णा तिहारला रवाना झालो. तिहारला जय्यत तयारी होतीच. कलमाडींच्याच ए.सी. दालनात सर्व भक्त गण जमा झाला होते. अण्णांसाठी जयललितांचां खास सोन्याचं सिंहासन मागविण्यात आलं होत. मला मात्र बाहेरच थांबायला सांगण्यात आल.

दोन तासात अण्णा हसतमुखाने बाहेर आले. अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी सारखे फ़ोन करत असल्याचं मी अण्णांना सांगितलं. अण्णांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि सहज बोलत बोलत मला बाजुला घेउन गेले. अण्णांना काही तरी सांगायचं होतं पण शब्द सुचत नव्हते. शेवटी त्यांना सुचलं. अण्णा म्हणाले "राळेगणसिद्धिला फ़ोन लाव आणि केजरीवाल आणि बेदींना विचार पुढच्या उपोषणाचे किती पैसे देणार ?"

दोन तासांच्या "सत्संगाचा" परिणाम बघुन मी जाम दचकलो तेवढ्यात बायकोने तोंडावर ग्लासभर गार पाणि ओतलं आणि माझ्या झोपेचा पार सत्यानाश केला.........

...........................राजकारण्यांनी देशाचा केलाय अगदी तस्साच.