बुधवार, ३० मार्च, २०१६

टी.आर.पी. साठी काय पण, कधी पण, कुठे पण ......



ह्या मिडीयाचं म्हणजे कसं झालंय माहितेय का ? आधी स्वतःच आग लावायची ................मग “सबसे पेहले” त्या आगीची “ब्रेकिंग न्यूज” द्यायची .....................मग आग विझवायला सरकारी यंत्रणा कशी चार मिनीटांऐवजी साडेपाच मिनिटात पोहोचली ह्यावर दिवसभर काथ्याकुट करायचा.............पुन्हा संध्याकाळी स्टुडिओत दोन चार “स्वयंघोषित” विद्वान जमा करायचे आणि..................... आग विझवायला दोनशे एकोणपन्नास लिटर पाण्याची आवश्यकता असताना फक्त दोनशे चाळीस लिटर पाणीच वापरून सरकारी यंत्रणेला मूर्ख ठरवायचं किंवा.................... आग विझवताना दोनशे बावन्न लिटर पाणी वापरून सरकारी यंत्रणेने पाण्याचा कसा अपव्यय केला ह्यावर AC स्टुडीओत वांझोटी चर्चा घडवून आणायची.

अगदी अलीकडची त्या कन्हैय्याची केस असेल किंवा त्या कुठल्या तरी साधू बाबाला पडलेलं जमिनीखालच्या खजिन्याचं स्वप्न असेल, काड्या घातल्या त्या मिडीयाने..................सरकारी यंत्रणा पण ह्यांच्या नादाला लागून मुर्खासारखी पावले उचलते आणि हसं करून घेते.

एका गोष्टीचा जरा विचार करून बघा ........ राजकारणी , गुंड किंवा अगदी काही वेळेला मोठे
Businessman सुद्धा उघड उघड एकमेकांच्या विरोधात उभे राहतात ...........आव्हान देतात ....................असं कधी कुठल्या न्यूज चानेलने केलंय का ? ................कधी झी न्यूज ने ए.बी.पी. न्यूजचं स्टिंग ओपेरेशन केलंय का ? कधी जय महाराष्ट्रवाल्यांनी ..........आय.बी.एन. लोकमतचं “भांडाफोड”वगैरे केलंय का ?..........जवळपास प्रत्येक राजकीय पक्षावर ............राजकारणातल्या व्यक्तींवर....................ह्या सुपारीबाज मिडीयाने वाट्टेल ते आरोप लावले.......... पोलिस किंवा इतर सरकारी अधिकारी कसे नालायक आहेत ते आपल्याला सांगितलं, पटवून दिलं ............वाट्टेल तशा बातम्या पसरवल्या पण आजवर कोणत्या तरी प्राईम टाईमच्या चर्चेच्या गुऱ्हाळात ह्या पत्रकारांना ...........आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय का ?

लोकशाहीचा चौथा स्तंभ ...........सशक्त लोकशाही साठी “स्वतंत्र” मिडीयाची कशी गरज आहे वगैरे सगळं मला मान्य आहे .................पण हा असला टी.आर.पी. साठी वाट्टेल त्या थराला जाणारा मिडीया असण्यापेक्षा ..........



उरलेल्या तीन स्तंभांवरच लोकशाही टिकलेली बरी. 

मंगळवार, २९ मार्च, २०१६

रिक्षावाल्या साहेबांचं सौजन्य

रोजच्या प्रमाणे त्या दिवशीही ऑफ़िसला जाण्यासाठी म्हणुन कॉम्प्लेक्स च्या गेटमधुन बाहेर पडलो, समोर बघितलं तर रस्त्याच्या पलीकडे चक्क ४/५ शेअर रिक्षावाले रांगेत उभे होते. कहर म्हणजे टोळकं करून बिड्या ओढत एकत्र न उभे राहता आपापल्या रिक्षात बसून होते.  मी रस्ता क्रॉस करणार तेवढ्यात माझ्यासमोर एक रिकामी रिक्षा थांबली.

रिक्षावाल्याने अदबीने विचारलं "साहेब कुठे जाणार" 
खरं तर आमच्या इथून रिक्षावाले ..........कधीच कुठेच जात नाहीत
मी चाचरत उत्तर दिलं "स्टेशन"
तो पुन्हा तेवढ्याच अदबीने म्हणाला "बसा साहेब"
"किती पैसे घेणार ?" महिनाअखेर होती ......... पुन्हा चाचरतच मी विचारलं
रिक्षावाला चक्क गोड हसला आणि म्हणाला "काय साहेब थट्टा करताय ? मिटर ने होतील तेवढेच दया "

मला चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं
, मी तसाच रिक्षात बसलो, त्याने मिटर टाकलं, मिटरचा आवाज ऐकुन दचकुन मी थोडा  भानावर आलो. गेल्या ४० वर्षात पहिल्यांदाच कल्याणातल्या रिक्षाच्या मिटरचा एवढा गोड आवाज ऐकला होता आणि चालु असलेलं मिटर पण बघितलं होतं.

रिक्षा चालवता चालवता रिक्षावाले साहेब सांगायला लागले
"आता आम्ही प्रवाशांशी सौजन्याने वागायचं ठरवलंय, प्रत्येक रिक्षामधे एक रजिस्टर ठेवलंय त्यात प्रवाशांनी आमची सेवा कशी वाटली त्याबद्दल लिहायचंय, सर्वात चांगली सेवा देणाऱ्या रिक्षाचालकाचा आमच्या युनियनतर्फ़े सत्कार केला जाणार आहे, आम्ही रिक्षा चालवताना शिव्या देणार नाही, गुटखा खाउन पचापचा थुंकणार नाही, फ़ालतु कारणांसाठी प्रवाशांना झोडणार नाही, कुठलंही भाडं नाकारणार नाही, रात्रीची वेळ बघुन प्रवाशांना लुटणार नाही"

रिक्षावाल्या साहेबांचं सौजन्य पाहुन माझ्या डोळ्यासमोर पुन्हा अंधारी यायला लागली तेवढ्यात एकही हादरा बसु न देता रिक्षा स्टेशनला पोचली.

"किती झाले ?" मी पुरता सावरलो नव्हतोच खरं तर
"सतरा रुपए पन्नास पैसे" मी विसची नोट दिली
त्याने अडीच रुपए परत केले, मला पुन्हा गरगरायला लागलं, आज ऑफ़िसमधे सगळ्यांना चहा पाजायचं ठरवुन मी स्टेशनकडे वळलो.

साला...................पुन्हा तेच.......... बायकोने पुन्हा तोंडावर पाणि ओतुन झोपेतुन उठवलं आणि कळायला लागल्यापासुन ( नक्की कितव्या वर्षापासुन कळायला लागलं त्याबद्दल वाद होवु शकतो म्हणुन वर्ष लिहीली नाहीत) उराशी जीवापाड जपलेलं एक स्वप्न पुन्हा मोडलं.

माझ्या स्वप्नाचा चक्काचुर होत असताना "खळ्ळ्ळ फ़टॅटॅटॅक" असा आवाजही आला मंडळी..........


शनिवार, २६ मार्च, २०१६

"TRP" साठी कुठल्याही थराला जाणारा मिडीया


भ्रष्टाचार, काळा पैसा, गुन्हेगारी ह्या समस्या जेवढ्या मोठ्या आहे तेवढीच मोठी समस्या आहे "TRP" साठी कुठल्याही थराला जाणारा मिडीया. त्या कसाबला पण ह्यांच्या समोर उभं केलं असतं तर नुसत्या प्रश्नांनी जीव घेतला असता ह्या लोकांनी त्याचा.............काय असू शकले असते ह्यांचे प्रश्न ?

१. कसाबजी सेंकडों लोगोंको मार कर आपको कैसा लग रहा है ?
२. तुम्हाला तुरुंगात देतात ती बीर्याणी तुम्हाला आवडते का ? बीर्याणी नंतर स्वीटडीश पण देतात का ?
३. पाकिस्तानमधे शाहरुख खान लोकप्रिय आहे की सलमान खान ?
४. तुम्हाला शुक्रवारी फ़ाशी जायला आवडेल की कोणताही दिवस चालेल ?
५. तुरुंगात डास फ़ार आहेत का ?
६. तुरुंगात तुमच्यासाठी शौचालय भारतीय आहे की पाश्चात्य पद्धतीच ? तुम्हाला कोणतं आवडतं
७. तुम्हाला वाटतं का की तुमचा नेमबाजीचा सराव थोडा कमी पडला ?
८. तुम्हाला परत संधी मिळाली तर कमीत कमी किती लोकांना मारु शकाल असं तुम्हाला वाटतं.
९. तुमच्यात पण टारगेट वगैरे असतं का ? तुमचं २००८ चं टारगेट पुर्ण झालं का ? इंसेटीव्ह कीती मिळणार ?

हे प्रश्न ऐकता ऐकता कसाब बेशुद्ध पडला असता  त्याला हॉस्पीटल मधे नेताना त्याने विचारलं असतं "तुमच्याकडे दयामरण देतात का ? असतील तर लगेच मला फ़ाशी दया आणि देत नसतील तर मला पुन्हा तुरुंगात टाका." वाट्टेल ते करा पण पुन्हा मला ह्या लोकांसमोर पुन्हा उभा करु नका."

मंगळवार, २२ मार्च, २०१६

Don’t try temporary solutions

प्रत्येक मोठ्या कंपनीत HR Department असतं. त्या कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक Employee ची productivity जास्तीत जास्त राहील ( कमीत कमी पैशात ) हे बघणं ह्या Department चं मुख्य काम असतं. ह्या HR Department कडून वेळोवेळी Training पण घेतली जातात.

मी काही कधी कुठल्या मोठ्या कंपनीत काम केलं नाही ( मला घेतलं नाही कोणी ) पण अशी
Training खिशातले पैसे भरून पण Attend करता येतात. मला सवय होती, अशा ट्रेनिंगला जाऊन आलो की त्याचं एक छोटसं presentation बनवून ठेवायचं. सहज जुनी presentations बघताना एक presentation पुन्हा बघितलं. ह्या ट्रेनिंग मध्ये शिकवलं गेलेलं की कोणत्याही प्रॉब्लेमच्या मुळाशी जा “Don’t try temporary solutions, go to the Root cause” .........अजून पण बरंच काही “तत्त्वज्ञान” शिकवलेलं.
माझं आजोळ सांगली जिल्ह्यातलं विटा. गोष्टीत असायची तशीच मामाची छान शेती, शेतातलं घर, बारमाही पाणी असलेल्या विहिरी आणि अतोनात जीव लावणारे मामा मामी. साधारण एकाच वयातल्या मावस बहिणी, मामे भाऊ, बहिणी सगळी मिळून आम्ही १२/१५ भावंडं सुट्टी लागली कि गावाला पळत सुटायचो. अख्खा दिवस नुसता धुडगूस असायचा.

पाणी मुबलक होतं त्यामुळे उन्हाळ्यात पण थोडी फार शेती व्हायची. आंबे, काकडी, बोरं, पेरू, भुईमुग अशा गोष्टींवर आमची आधाशी नजर जेवढी असायची तेवढीच पाखरांची आणि माकडांच्या टोळ्यांची पण असायची. शेतातलं घर त्यातल्या त्यात उंचावर होतं त्यामुळे शेतात माकडं शिरलेली घरातून पण दिसायचं.

माकडांची टोळी शेतात शिरलेली दिसली की आमच्या अंगात वारं शिरायचं. मोठ्या काठ्या नाचवत मोठ मोठ्याने पत्र्याचे डबे आणि तोंडं वाजवत आम्ही माकडांच्या दिशेने पळत सुटायचो. सोबतीला मामाने पाळलेली दांडगट आक्राळ विक्राळ कुत्री पण असायची. हाताला लागतील ते दगड, मातीची ढेकळं आम्ही माकडांवर भिरकावायचो.

१२ /१५ किंचाळणारी पोरं, हातातल्या काठ्या, कर्कश्य वाजणारे डबे आणि नुसत्या भुंकण्याने मळा दणाणून सोडणारी कुत्री. माकडं धूम पळत सुटायची. मळ्याच्या हद्दीपर्यत मग हा चोरपोलिस खेळ चालायचा ........आम्ही शिकार करून आल्याच्या आवेशात परत फिरायचो.


एके दिवशी संध्याकाळच्या वेळी अशीच माकडं शेतात घुसलेली दिसली. विचार करायची सवय तेव्हाही नव्हती. मी आणि माझ्या बरोबरचे माझे दोघे मामेभाऊ असे आम्ही तिघेच आरडा ओरडा करत पळत सुटलो. हे लक्षातच नव्हतं की त्या वेळी मळ्यात फक्त आम्ही तिघेच होतो. अगदी कुत्री पण घरातल्या बाकीच्यांच्या बरोबर लांबवर हिंडायला गेलेली. नेहेमीप्रमाणे आरडाओरडा करत दगड भिरकावायला सुरुवात केली. माकडं पटकन दाद देईनात. आम्ही खूपच आरडाओरडा करतोय हे बघून त्यांनी काढता पाय घेतला. आम्हाला अजून अवसान चढलं आणि आम्ही त्या नादात कोरड्या ओढ्यातून दगड मारत त्या टोळीच्या मागे पळत सुटलो. मळ्यापासून लांब आल्याचं आमच्या आधी माकडांना कळलं आणि त्यांच्या पाठोपाठ मला कळलं.

काही क्षणात बाजी पलटली ...........काही क्षणांपूर्वी माकडं पुढे आणि आम्ही मागे धावत होतो ........आता आम्ही पुढे आणि दात विचकत किंचाळणारी माकडं आमच्या मागे लागलेली. अर्थातच  बाकीच्या दोघांचं काय झालं ते बघायला सुचलंच नाही.

जीव खाऊन मळ्याकडे पळत सुटलो. प्रत्येकाला ठेचा लागल्या, गुढगे फुटले, कोपरं सोलपटली, माकडांनी “कुठे कुठे” बोचकारलं.........मळ्यात शिरून घराजवळ पोचलो तेव्हा कुठे माकडं परत फिरली. लागल्याचं दुःख होतं पण “जान बची तो लाखो पाये” हे तेव्हाही कळत होतं.

त्या AC हॉल मध्ये पैसे घेऊन Training द्यायला, “
Don’t try temporary solutions, go to the Root cause always” हे घोकून घ्यायला तुमचं काय जातंय राव “ज्याचं सोलापटतं त्याला कळतं”

माकडांसारख्या उपद्रवी प्रॉब्लेम्सच्या मागे जरूर लागा पण त्या आधी उपलब्ध साधनसामुग्री नीट तपासून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची “हद्द” सोडू नका कारण तुम्हीच खाजवून ओढवून घेतलेला “प्रॉब्लेम” जर का तुमच्या मागे लागला तर ...........
.
.
कायम मळ्यात परतायला वेळ मिळेलच असं नाही. 

बुधवार, १६ मार्च, २०१६

लस्ट फॉर लालबाग - विश्वास पाटील



मुळात मी विश्वास पाटलांच्या लिहीण्याचा कट्टर भक्त, सर्वात पहिली कादंबरी वाचली ती झाडाझडती. मग व्यसनच लागलं पाटलांच्या लिहीण्याचं. चंद्रमुखी, पानिपत, पांगिरा, महानायक , संभाजी, नाना पाटलांवरचं क्रांतीसुर्य, रणांगण अशी जवळपास सगळीच पुस्तकं आधाशासारखी वाचून काढली.
बरेच दिवस येणार येणार ऐकलेलं लस्ट फॉर लालबाग हातात पडेपर्यंत जीव वरखाली होत होता. पुस्तक वाचायला घेतलं...... जसजसं पुस्तक वाचून होत गेलं तसतसा मी मात्र पुस्तकापासून Disconnect होत गेलो. काही तरी चुकतंय असं वाटत राहिलं. इच्छा होत नव्हती तरीही शेवटपर्यंत वाचून काढलं.


Normally चांगल्या कादंबरीवरून चित्रपट काढला जातो पण पुस्तक वाचताना सतत कुठे तरी असं वाटत राहिलं की कुठल्या तरी “मसाला” चित्रपटावरून ही कादंबरी लिहीली आहे. गिरणी कामगार .......बंद पडत चाललेल्या गिरण्या .......दत्ता सामंतांनी कामागारांसाठी दिलेली झुंज .......त्याच वेळी गुन्हेगारी विश्वाचा मुंबापुरीवर वाढत चाललेला प्रभाव ............आणि चोरावर मोर असलेले राजकारणी........त्यातच नायकाची प्रेमकथा ........तत्त्वासाठी झगडणारा त्याचा बाप .............आणि मग कलाटणी देणारा ........अनपेक्षित शेवट.... हे सगळं सगळं आहे कादंबरीत

वास्तव चित्रपटातला संजय दत्त सापडला कादंबरीत, जागोजागी दिवार मधला अमिताभ सापडला,“अपहरण” चित्रपटातला अजय देवगणचा बाप सापडला कादंबरीत, वास्तव मधलीच रिमा लागू पण सापडली .........फक्त माझ्यासाठी “ग्रेट” असलेले विश्वास पाटील मात्र शेवटपर्यंत नाही सापडले मला कादंबरीत.

त्यांच्या आधीच्या लिखाणामुळे माझ्याच अपेक्षा मी खूप वाढवून ठेवलेल्या असतील किंवा असंही असेल की मला कादंबरी कळलीच नाहीये. 

मंगळवार, १५ मार्च, २०१६

जाट - पटेल - मराठा आरक्षण


अलिकडे जाट समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी उग्र आंदोलन केलं. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर प्रचंड परिणाम तर झालाच पण जाळपोळ आणि लुटमारीसारख्या प्रकारांबरोबरच बलात्कारासारखे हीन प्रकार पण झाले. मुळात जाट समाज असेल, गुजराथ मधला पटेल समाज असेल किंवा महाराष्ट्रातला मराठा समाज असेल, यांना आरक्षण देताना “राजकीय अपरिहार्यता” हा एकच निकष लागू होतो. रस्त्यावर उतरून, जाळपोळ करून आरक्षण मागणारे पण तेच आणि मंत्रालयातल्या गुबगुबीत खुर्चीत बसून “देणारे” पण तेच.फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाबद्दल बोलायचं झालं तर ही आकडेवारी खूप बोलकी आहे
  1. महाराष्ट्रातल्या ५०% पेक्षा जास्त जमिनीची मालकी मराठा समाजाकडे आहे.
  2. महत्त्वाच्या १०५ पैकी ८६ साखर कारखाने मराठा समाजाच्या ताब्यात आहेत. साखर कारखाने ताब्यात असणं म्हणजे किती ताकद असते हे शेतकरीच जास्त चांगलं सांगू शकतील. 
  3. महाराष्ट्रातल्या ५४% शैक्षणिक संस्था मराठा समाजाच्या ताब्यात आहेत. 
  4. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून म्हणजे साधारण १९६२ पासून आजवर सातत्याने ५५% आमदार विधानसभेत बसले आहेत.
  5. आजवर १७ पैकी १२ मुख्यमंत्री मराठा समाजातले होते.
कोणाच्या दबावाला किती बळी पडायचं हे जरी सरकारच्या हातात असलं तरी शेवटी त्यात नुकसान खुर्च्या उबवत बसलेल्या राजकारण्यांचं नाही. ज्या गोष्टीची ह्या राजकारण्यांच्या पुढच्या १५/२० पिढ्यांना गरज पडायची गरज नाही ते देऊन टाकायला ह्यांचं काय जातंय.दुःख म्हातारी मेल्याचं पण आहे आणि काळ सोकावातोय त्याचं पण आहे.

http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/3415/12/12_chapter%207.pdf





रविवार, १३ मार्च, २०१६

ब्रेकिंग न्यूज ............


दोन तीन दिवसांपूर्वी कल्याणात मध्यरात्री कधी तरी एक रिक्षा जाळण्यात आली ...........झालं ....लगेच ब्रेकिंग न्यूजला चटावलेले पत्रकार कामाला लागले आणि राजसाहेबांवर खापर फोडून मोकळे झाले. त्यातल्या त्यात जनाची नाही तर मनाची लाज बाळगून काहींनी बातमी देताना एक प्रश्नचिन्ह मात्र आठवणीने टाकलं.
मध्यरात्री गाड्या जाळण्याचे प्रकार ह्या पूर्वी झालेले नाहीत का ? कोणी तरी विकृत व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट हे प्रकार गेली अनेक वर्ष करतो आहे हे सगळ्यांनाच माहित आहे..........नशीब त्यामागे पण मनसेच आहे असा "सनसनीखेज" वगैरे खुलासा नाही केला ह्या विद्वान पत्रकारांनी.

मनसे असेल किंवा कोणतेही इतर राजकीय पक्ष असतील जी काही आंदोलने करायची ती उघडपणे करतात .......लपून छपून तुमची ती “स्टिंग ऑपरेशन” केली जातात आंदोलने नाहीत हे तुम्हाला समजायला काहीच हरकत नव्हती.

कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षांनी काय आदेश दिलाय आणि तो कधी पाळायचा आहे हे जेवढं त्यांच्या कार्यकर्त्यांना कळतं तेवढंच जनतेलाही कळतं .........उगाच ब्रेकिंग न्यूजच्या पुड्या सोडून आणि जनतेची दिशाभुल करून तुम्ही तुमची TRP ची पोळी कशाला भाजून घेताय ?

चला असं धरून चालू की राजसाहेबांनी केलेलं भाषण प्रक्षोभक होतं TRP खेचण्यासाठी होतं, पण त्याचा आणि एका निरपराध मराठी माणसाची रिक्षा जाळण्याचा संबंध कसा काय लावू शकता तुम्ही? त्या भाषणाबद्दल तुम्ही लिहा ..........तो तुमचा अधिकार आहे ........टीका करा तोही तुमचा अधिकार आहे........पण न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरू नका .......ते तुमच्या मर्यादेचं उल्लंघन आहे.

“नागरीकांकडून अमुक भावना व्यक्त होत आहे” किंवा “नागरिक रोष व्यक्त” करत आहेत अशी विधानं जेव्हा तुम्ही तुमच्या बातमीत छापता तेव्हा किती नागरीकांना खरंच विचारता ? त्यातले ते “नागरिक” म्हणजे निव्वळ तुमचे आश्रयदाते असतात हे आता सगळ्यांनाच कळायला लागलंय.

राज साहेब काय बोलले आणि बोलले ते बरोबर की चूक हा माझ्या ह्या लेखाचा विषय नाही. जी बातमी तुम्ही देताय ती बातमी फक्त द्या, त्याचा अर्थ लावायचं काम तुमचे वाचक करतील. अर्थ लावायची अक्कल त्यांना आहे असं गृहीत धरायला काय हरकत आहे?. त्या बातमीचा तुम्हाला लागलेला अर्थ पण छापा पण तो अर्थ नागरिकांच्या नावावर खपवू नका.

गेल्या पंचवीस वर्षात मी जेवढे राजकारणी जवळून बघितलेत तेवढेच पत्रकार देखील बघितलेत. ज्यांच्या वृत्तपत्राचं नाव पण कधी ऐकलेलं नसतं, जे अख्खा दिवस महापालिकेत पडीक असतात त्यांचा चरितार्थ त्या २/४ हजार खप असलेल्या वृत्तपत्राच्या नोकरीतून कसा भागतो हा प्रश्न सामान्य नागरीकांना पडू शकतो ........मला नाही.
नगरसेवकांच्या १५ / २० फुट लांबीच्या गटाराच्या कामाच्या भूमीपूजनाच्या बातमीसाठी पण रांगेत उभं राहून पाच पाचशे रुपयांची पाकिटं घेणारे पत्रकार बघितलेत मी. ज्याला त्याला नैतिकतेचे धडे देण्याचा अधिकार दिला कोणी ह्या पत्रकारांना ? राजकारणी देतात म्हणून आम्ही घेतो असं तुमचं म्हणणं असू शकेल पण तृम्ही घेता म्हणून राजकारणी देतात ही वस्तुस्थिती आहे.

मुळात हल्ली पत्रकारांनी राजकारण्याना तत्त्वनिष्ठा वगैरे शिकवणं म्हणजे मल्लिका शेरावतने सनी लीओनी ला पावित्र्यावर प्रवचन देण्यासारखं वाटतं मला.

हे मी जे काही लिहीलंय त्यातून मला कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला योग्य ठरवायचं नाहीये...... पण हो .....ब्रेकिंग न्यूजला चटावलेल्या पत्रकारांच्या बुद्धीमत्तेबदल आणि नीतीमत्तेबद्दल निश्चित प्रश्नचिन्ह उभं करायचं आहे.

मंगळवार, ८ मार्च, २०१६

जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिनाचं औचित्य साधुन मी जाहिर करतो की ......माझ्या परिचयातल्या बहुतांश बायका / मूली ह्या.......अत्यंत .........शिष्ठ........ भांडकुदळ...…....पैशाला चिकट........मारकुट्या...... .मठ्ठ....... .आळशी.......दिवसभर सेल्फ़ी काढत T P करणाऱ्या........ किंवा WA आणि फेसबुकवर पडिक असणाऱ्या ......कुचकट ........ वगैरे नाहीत हे मला (आजच्यापुरतं तरी) मान्य आहे.

एक जात सगळ्यां सुस्वभावी ....... बुद्धिमान ......समजुतदार.......प्रेमळ..........मितभाषी.......समजुतदार आहेत अशी मला ...........शंका आहे

इथे जर "चुकून" कोणाच्या अवगुणांचा उल्लेख झाला असेल तर निव्वळ योगायोग समजावा ही विनंती

साधासुधा
महेंद्र कुलकर्णी

शनिवार, ५ मार्च, २०१६

मोबाइलकुमार आणि मोबाइलकुमारी

आज संध्याकाळी कल्याण रेलवे स्टेशनच्या बाहेर बसलेल्या फेरीवाल्यांचं सामानसुमान जप्त करून महानगरपालिकेच्या गाडीत भरुन नेते होते......

थोडंसं पुढे एस टी स्टॅंड च्या समोर चार चार रांगा करून ....80% रस्ता अडवून रिक्षा उभ्या केल्या जातात ...... ह्या रिक्षा आणि टोळकी करून बिड्या ओढ़त आजुबाजूला उभे असलेले रिक्षा चालक पण त्याच गाडीत भरून नेता नाहीत का येणार ? रहदारीची कोंडी तरी कमी होईल

जाता जाता रस्त्याच्या माधोमध चालताना मोबाइलवर बोलत किंवा कानात बुचं घालून गाणी ऐकत बागडणारे दहा पंधरा मोबाइलकुमार आणि मोबाइलकुमारी पण त्याच गाडीत भरून न्यायला हरकत नाही

गुरुवार, ३ मार्च, २०१६

व्यवहारज्ञान.........आणि समयसूचकता



गेली दहा वर्ष “पूर्णवेळ” व्यवसाय करूनही काही गोष्टी मला आत्मसात करता आलेल्या नाहीत. कदाचित “गाणं” जसं रक्तात असावं लागतं तशाच ह्या गोष्टी रक्तात असाव्या लागतात.
साधारण १० / १२ वर्षापुर्वीची गोष्ट आहे. मी नविनच मोटरसायकल घेतलेली. तेव्हा ऑफिस चर्नी रोडला  म्हणजे गिरगावात होतं. कल्याणपासून by road अंतर होतं ६० किलोमीटर. तरीही आठवड्यातून चार दिवस मी मोटरसायकल घेऊन ऑफिसला जायचो. कल्याणला राहणारे आणि माझ्यासारखेच किडे असणारे काही मित्र जाता येताना बरोबर असायचे.

इम्रान नावाचा माझा एक मित्र म्हणजे अस्सल नमुना.... बऱ्याचदा इम्रानच माझ्या बरोबर असायचा. त्याचं ऑफिस तेव्हा नरीमन पॉइंटला होतं. संध्याकाळी निघताना एकमेकांना फोन करायचा आणि मी त्याला सी.एस.टी. स्टेशनच्या समोरून pickup करायचं असं आमचं ठरलेलं असायचं.

त्या दिवशीही तसंच त्याला घेतलं आणि भायखळ्याला पोचलो तेव्हा आठवलं, एका मित्राच्या मुलाने क्रिकेट साठी जे सीझनचे बॉल  लागतात ते आणायला सांगितलेले. हे बॉल मिळतात अहमदाबाद स्पोर्ट्स नावाच्या दुकानात मेट्रोजवळ. म्हणजे पुन्हा ट्राफिक मधून रांगत भायखळा ते मेट्रो उलटं जावं लागणार होतं, साधारण ८ किलो मीटर. बॉल नेले नसते तर मित्राच्या लेकाने क्रिकेटची Bat डोक्यात घालायची खूप शक्यता होती.

परत फिरावं लागणार हे इम्रानला सांगितलं, त्याची काहीच हरकत नव्हती. तेवढ्यात समोर यु टर्न मारायला जागा दिसली पण........... तिथे यु टर्न चालणार नसल्याची पाटी होती. पुढे जायला लागणार होतं. मी विचार करत होतो, पुढे लवकर यु टर्न मारता येण्याची शक्यता कमी होती.

“भाई तू मार यु टर्न कूछ नहीं होगा” इम्रानने “ग्यारंटी” दिली. मी पटकन त्या पाटीकडे दुर्लक्ष करत यु टर्न मारला..........आणि .......रस्त्याकडेच्या झाडाआडून बरोबार .......पोलिसमामा दत्त म्हणून समोर अवतरले.

हो.... नाही .....पाटी दिसलीच नाही .......खूप अर्जंट काम आहे .......वगैरे वगैरे सांगून झालं ............शेवटी मामा शंभरवरून पन्नास रुपयात सोडायला तयार झाले. मी पैसे दिले मामा दुसरा बकरा शोधायला झाडामागे चाललेच होते.

“ओ साब एक मिनिट इधर आओ” इम्रानने हाक मारली ....माझ्या पोटात गोळा आला, आता हा बाबा वाद घालतो की काय म्हणून. तोवर मामा जवळ आले
“मेरेको बीस रुपये दो वो पचास मे से” इम्रानने मामांना सांगितलं. मामांच्या आणि माझ्याही चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं इम्रानच पुढे बोलला......
“मैने इसको बोला यु टर्न मारनेको इस के लिये इसने यु टर्न मारा............मेरी वजह से आप को पचास मिला तो उसमेसे मेरेको भी मिलना चाहिये ना साब” शक्य तेवढ्या निरागस आवाजात इम्रान बोलला............मी गाडी stand वर लावून हसत सुटलो ...........मामांना काय बोलावं तेच सुचलं नाही ...........हसत हसत त्यांनी माझी ५० ची नोट इम्रानच्या हातावर ठेवली आणि हसत हसतच जायची खूण केली (मनातल्या मनात साष्टांग नमस्कार पण घातला असणार)

आम्ही अहमदाबाद स्पोर्ट्स मधे गेलो मग कल्याण कडे निघालो. आता हा माझे माझे पन्नास परत करणार की स्वतःकडेच ठेवणार ह्याचा विचार करत आम्ही कल्याणला पोचलो. इम्रानच्या घराजवळ सोडल्यावर पठ्ठ्या सरळ चालू पडला. म्हटलं च्यायला गेले पन्नास.....जाऊ दे गेलेलेच होते. पण मग थोडा विचार करून इम्रानला आवाज दिला

“इम्रान यार इधर आ.........साले तेरेको शरम नहीं आती ? सी.एस.टी. से यहां तक मेरे गाडी पे आरामसे बैठ के आया ....पेट्रोल का आधा पैसा तो दे” त्याच्या कडून जे व्यवहारज्ञान शिकलो ते मी त्याच्यावरच वापरलं.

“भाई देने के लिये तो मै आधा क्युं पुरा पैसा दे दु .....लेकीन अगर किसी को येह समझा तो तेरी क्या इज्जत रहेगी ? लोग सोचेंगे तू मेरे लिये रिक्षा चला रहा है .......यार तू इतना बडा आदमी .....येह अच्छा दिखेगा क्या ?
मगासच्याच निरागस आवाजात ......चेहेऱ्यावर तेवढीच निरागसता ओतून इम्रानने उत्तर दिलं
च्यायला आला का “इज्जत का सवाल” त्यात आणि “बडा आदमी” वालं चोकलेट.............मी काही विचार करून उत्तर देईपर्यंत “इम्रान भाईनी” त्यांच्या बिल्डींगच्या पायऱ्या चढायला सुरुवात पण केली.

आजतागायत ना ते पन्नास रुपये आणि पेट्रोलचे अर्धे पैसे त्याने मला देऊ केले ना मी मागायच्या फंदात पडलो .........ज्या गुरुकडून जे शिकतो ते त्याच्यावर वापरायचं नाही एवढं मात्र शिकलो.

म्हणून मला मनापासून वाटतं व्यवहारज्ञान .........आणि समयसूचकता ह्या गोष्टी रक्तातच असाव्या लागतात कोणी तरी शिकवून त्या येत नाहीत.