सोमवार, ४ एप्रिल, २०१६

Team Building and Knowledge Sharing


व्यवस्थापन शास्त्रात चांगली Team बनवता येणं आणि त्या Team ची Productivity सतत वाढवत नेणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. फक्त Corporate जगातच नाही पण Team Building चं महत्त्व राजकारण, समाजकारण, खेळ, मनोरंजन अशा प्रत्येक क्षेत्रात तेवढंच मानलं जातं. Team मधल्या आपल्या सहकाऱ्यांना आपण ज्या Project वर काम करतोय त्याची इत्यंभूत माहिती असणं गरजेचं असतं असंही मानलं जातं.



गावी म्हणजे कराडजवळ म्हासोलीला आमचं जुनं घर आहे, घर कसलं मस्त मोठाच्या मोठा वाडा आहे. काका तिथेच राहायचे पूर्वी पण आता नोकरीनिमित्त ते कराडला राहतात. लहानपणी सुट्टीत बऱ्याचदा आम्ही आठ दहा चुलत आणि आत्ते भावंडं, आमच्या गावच्या वाड्यात जमायचो. अख्खा दिवस वाडा डोक्यावर घ्यायचो. वाड्याच्या आतच एक विहीर म्हणजे आड होता, एका काकांचं किराणा सामानाचं दुकान होतं आणि आमचीच पिठाची गिरणी पण होती. कशासाठीच वाड्याच्या बाहेर पडायची गरज नसायची. हां पण त्यावेळी “घर घर मे शौचालय” वगैरे
concept एवढे कोणी seriously घेतलेले नव्हते त्यामुळे सकाळी सकाळी तांब्या घेऊन ...........बाहेर पडायलाच लागायचं.


मॉल्स, रेल्वे स्टेशन्स किंवा ऑफिसेस मध्ये पुरुष आणि महिला प्रसाधनगृह वेगळी असतात तशीच गावाकडे सकाळी “हलकं व्हायला जाण्याचे ठिकाणं पण स्त्रीया आणि पुरूषांसाठी वेगवेगळी असतात. तसे “बोर्ड” लावलेले नसले तरी ते तारतम्य तिथे सगळ्यांकडूनच पाळलं जातं.


आम्ही सगळे भाऊ सकाळी त्या “कार्यक्रमाला” एकत्रच निघायचो. सगळे लहानच असलो तरी त्यातही अगदीच दुसरी तिसरीतले भाऊ म्हणजे कच्चे लिंबू किंवा बच्चे कंपनी आणि आम्ही पाचवी सहावीतले म्हणजे “दादा कंपनी” असायचो. गावाकडे साप भरपूर असायचे आणि सगळ्यात जवळचं हॉस्पिटल साधारण ३० किलोमीटरवर ............रोज सकाळी आपापले तांबे घेऊन निघताना घरातली मोठी माणसं न चुकता दम द्यायची ...........”लांब जाऊ नका .........मस्ती करू नका” वगैरे वगैरे.


आम्ही सगळेच शहरात रहायचो ( कल्याण तेव्हाही म्हणजे ३० /३५ वर्षापूर्वीही शहरच मानलं जायचं )  त्यामुळे “त्या” अवस्थेत कोणी बघेल याची लाज वाटायची ...........मग आम्ही शक्य तेवढं गावापासून लांब जायचो .........मोठी झुडूपं असतील अशा जागा शोधायचो.


त्या दिवशी पण तसंच झालं........खूपच लांबवर गेलेलो आम्ही ........एकमेकांकडे पाठ करून कार्यक्रम उरकतच आला होता तेवढ्यात आमच्यापैकी एकाला साप दिसला ........त्याने “साप साप” म्हणून बोंबलायला सुरुवात केली ............चांगला ४/५ फुट लांबीचा काळाकुट्ट साप आमच्या जवळूनच सळसळत निघून गेला .........भीतीने काहींचा उरलेला “कार्यक्रम” पटकन उरकला .........तर काहींनी आवरता घेतला .........आणि घराकडे पळत सुटलो सगळे. घरी येऊन आम्ही साप बघितला हे सांगण्याची सोय नव्हती कारण मग कुठे बघितला हा प्रश्न आला असता.



इतक्या लांब का गेलात ह्याची विचारणा मोठ्यांकडून, तोडापेक्षा जास्त हाताने किंवा हातात लागेल त्या काठीने अगदीच वेळप्रसंगी पायाने पण झाली असती आणि उत्तरं देता देता पाठ आणि आणि बरंच “काय काय” सोलापटून निघालं असतं. आम्ही सगळ्यांनी घरी तोंडं बंद ठेवायचं ठरवलं........जे कच्चे लिंबू होते त्यांच्याकडून पण “आपण साप बघितला नाही, आपण लांब गेलो नव्हतो” असं दहा दहा वेळा वदवून घेतलं आणि चोरासारखे वाड्यात परतलो.


आम्ही सगळेच जरा गप्पगप्प आहोत हे घरातल्या मोठ्यांच्या लक्षात यायला वेळ नाही लागला .......आम्ही मोठे जेवढे होतो तेवढे बऱ्यापैकी बनेल होतो .........विचारलं गेलं तर मस्त गोल गोल फिरवलं सगळ्या मोठ्यांना ...............पण जसं जरा दमात घेऊन बच्चे कंपनीला विचारायला सुरुवात झाली तसं आमचं धाबं दणाणलं. पहिल्या एक दोन प्रश्नानंतरच त्यांनी बोंबलायला सुरुवात केली “आम्ही साप नाही बघितला ..........आम्ही लांब नव्हतो गेलो.......... “आम्ही साप नाही बघितला ..........आम्ही लांब नव्हतो गेलो” काय समजायचं ते सगळ्या घरात समजलं.


मग जे काय वरात निघाली आम्हा दादा कंपनीची .....................तासभर धुलाई चालू होती ..........सगळे आम्हाला बदडून दमले तेव्हा थांबलं सगळं ............. सालटी निघणं काय असतं ते तेव्हा नीट कळलं.

Team Building पण असंच असतं ना राव ............तुमचे सहकारी नीSSSSSSट विचार करून निवडावे लागतात ..........”कच्चे लिंबू” घ्यावेच लागणार असतील तर चालू Project मध्ये किती “साप” उरलेत ह्या बद्दलचं किती Knowledge Share करायचं हेही विचार करून ठरवावं लागतं नाही तर .........सालटी निघणार हे १००% निश्चित.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: