अण्णा हजारेंचं आंदोलन यशस्वी झालं. मी घरात आणि ऑफ़िसमधे बसुन अण्णांना जी "भरघोस" मदत केली, त्याबद्दल ऐकुन अण्णा खुप खुष झाले. उपोषण सोडल्याबरोबर अण्णांनी मला फ़ोन केला आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मला भेटायला येत असल्याचं सांगितलं पण अण्णांच्या तब्बेतीचा विचार करुन मीच राळेगणसिद्धिला जायचं ठरवलं..
मी अण्णांना भेटायला जाणार आहे असं कळल्याबरोबर पंतप्रधान कार्यालयातुन मला फ़ोन आला आणि कोणीतरी माझ्याशी बोललं ( बहुदा समोर असलेलं वाचुन दाखवलं ) मला सांगण्यात आलेलं मला पटलं ( एक अक्षरही कळलं नव्हतं तरीही ) शेवटी सुशिलकुमार शिंदेंनी मराठीत सांगितलं तेव्हा कळलं. आता सगळ्या जगासाठी मी अण्णांचं अभिनंदन करण्यासाठी राळेगणसिद्धिला जात होतो पण खरं तर केंद्र सरकारने आखलेल्या एका योजनेसंबंधी चर्चा करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात काही भागात रस्ते असतात पण गुप्त असतात, लोकांना दिसत नाहीत म्हणुन वापरुन खराबही होत नाहीत तशीच ही योजना गुप्त स्वरुपाची होती.
शाहीद बलवाला तिहार मधे फोन करुन माझ्यासाठी एक हेलीकॉप्टर पाठवायला सांगितलं. त्याने लेगेच ऐकलं, शरद पवारांचं बुकींग रद्द करुन त्याने माझ्यासाठी व्यवस्था केली. माझं राळेगणसिद्धिला जंगी स्वागत करण्यात आलं. किरण बेदींनी ट्विटर वर लगेच मी आल्याचं जाहिर केलं..
केंद्र सरकारची योजना मी अण्णांना थोडक्यात समजावुन सांगितली. केंद्र सरकारला मदत करायचं अण्णांनी लगेच मान्य केलं. य़ोजना अशी होती की, ए. राजा, कलमाडी कणीमोळी, मधु कोडा अशा राजकीय नेत्यांपसुन ते अगदी कल्याण महापालिकेच्या सुनिल जोशी आणि परवा रंगेहाथ पकडल्या गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तापर्यंत सगळ्यां भ्रष्टाचाऱ्यांना ( फ़क्त सापडलेल्या ) केंद्र सरकारने एका नविन तुरुंगात हलवायचे ठरवले होतं.
जयप्रकाश नारायणांनी जसं चंबळच्या खोऱ्यात डाकुंना मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन केलं होतं त्याच स्टाइल मधे कॉंग्रेसचे युवराज ह्या भ्रष्टाचाऱ्यांना भ्रष्टाचार सोडण्याचं आवाहन करणार होते. केंद्र सरकारला हेही माहित होतं की ह्या आवाहनाचा काडीइतकाही उपयोग होणार नाही कारण दारुडयाला दारु सोडायला दारुडयाने सांगुन उपयोग नसतो.
अण्णांनी ह्या सगळ्या भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या महाभागांचे "संस्कारवर्ग" घ्यावेत म्हणजे कदाचित त्यांचं ह्र्दयपरिवर्तन वगैरे होइल अशी केंद्र सरकारला आशा होती. नंतर त्या सर्वांना सरकारी नोकऱ्या देउन त्यांचं पुनर्वसन करण्याचाही सरकार विचार करत होतं.
इतर वेळी अण्णांनी सरकारवर विश्वास ठेवला नसता पण मला नकार देणं त्यांना अवघड गेलं. अण्णा तयार झाले. आम्ही लगेच केंद्र सरकारला तसं कळवलं. ताबडतोब खास विमानाने मी आणि अण्णा तिहारला रवाना झालो. तिहारला जय्यत तयारी होतीच. कलमाडींच्याच ए.सी. दालनात सर्व भक्त गण जमा झाला होते. अण्णांसाठी जयललितांचां खास सोन्याचं सिंहासन मागविण्यात आलं होत. मला मात्र बाहेरच थांबायला सांगण्यात आल.
दोन तासात अण्णा हसतमुखाने बाहेर आले. अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी सारखे फ़ोन करत असल्याचं मी अण्णांना सांगितलं. अण्णांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि सहज बोलत बोलत मला बाजुला घेउन गेले. अण्णांना काही तरी सांगायचं होतं पण शब्द सुचत नव्हते. शेवटी त्यांना सुचलं. अण्णा म्हणाले "राळेगणसिद्धिला फ़ोन लाव आणि केजरीवाल आणि बेदींना विचार पुढच्या उपोषणाचे किती पैसे देणार ?"
दोन तासांच्या "सत्संगाचा" परिणाम बघुन मी जाम दचकलो तेवढ्यात बायकोने तोंडावर ग्लासभर गार पाणि ओतलं आणि माझ्या झोपेचा पार सत्यानाश केला.........
...........................राजकारण्यांनी देशाचा केलाय अगदी तस्साच.
