रविवार, १३ मार्च, २०१६

ब्रेकिंग न्यूज ............


दोन तीन दिवसांपूर्वी कल्याणात मध्यरात्री कधी तरी एक रिक्षा जाळण्यात आली ...........झालं ....लगेच ब्रेकिंग न्यूजला चटावलेले पत्रकार कामाला लागले आणि राजसाहेबांवर खापर फोडून मोकळे झाले. त्यातल्या त्यात जनाची नाही तर मनाची लाज बाळगून काहींनी बातमी देताना एक प्रश्नचिन्ह मात्र आठवणीने टाकलं.
मध्यरात्री गाड्या जाळण्याचे प्रकार ह्या पूर्वी झालेले नाहीत का ? कोणी तरी विकृत व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट हे प्रकार गेली अनेक वर्ष करतो आहे हे सगळ्यांनाच माहित आहे..........नशीब त्यामागे पण मनसेच आहे असा "सनसनीखेज" वगैरे खुलासा नाही केला ह्या विद्वान पत्रकारांनी.

मनसे असेल किंवा कोणतेही इतर राजकीय पक्ष असतील जी काही आंदोलने करायची ती उघडपणे करतात .......लपून छपून तुमची ती “स्टिंग ऑपरेशन” केली जातात आंदोलने नाहीत हे तुम्हाला समजायला काहीच हरकत नव्हती.

कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षांनी काय आदेश दिलाय आणि तो कधी पाळायचा आहे हे जेवढं त्यांच्या कार्यकर्त्यांना कळतं तेवढंच जनतेलाही कळतं .........उगाच ब्रेकिंग न्यूजच्या पुड्या सोडून आणि जनतेची दिशाभुल करून तुम्ही तुमची TRP ची पोळी कशाला भाजून घेताय ?

चला असं धरून चालू की राजसाहेबांनी केलेलं भाषण प्रक्षोभक होतं TRP खेचण्यासाठी होतं, पण त्याचा आणि एका निरपराध मराठी माणसाची रिक्षा जाळण्याचा संबंध कसा काय लावू शकता तुम्ही? त्या भाषणाबद्दल तुम्ही लिहा ..........तो तुमचा अधिकार आहे ........टीका करा तोही तुमचा अधिकार आहे........पण न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरू नका .......ते तुमच्या मर्यादेचं उल्लंघन आहे.

“नागरीकांकडून अमुक भावना व्यक्त होत आहे” किंवा “नागरिक रोष व्यक्त” करत आहेत अशी विधानं जेव्हा तुम्ही तुमच्या बातमीत छापता तेव्हा किती नागरीकांना खरंच विचारता ? त्यातले ते “नागरिक” म्हणजे निव्वळ तुमचे आश्रयदाते असतात हे आता सगळ्यांनाच कळायला लागलंय.

राज साहेब काय बोलले आणि बोलले ते बरोबर की चूक हा माझ्या ह्या लेखाचा विषय नाही. जी बातमी तुम्ही देताय ती बातमी फक्त द्या, त्याचा अर्थ लावायचं काम तुमचे वाचक करतील. अर्थ लावायची अक्कल त्यांना आहे असं गृहीत धरायला काय हरकत आहे?. त्या बातमीचा तुम्हाला लागलेला अर्थ पण छापा पण तो अर्थ नागरिकांच्या नावावर खपवू नका.

गेल्या पंचवीस वर्षात मी जेवढे राजकारणी जवळून बघितलेत तेवढेच पत्रकार देखील बघितलेत. ज्यांच्या वृत्तपत्राचं नाव पण कधी ऐकलेलं नसतं, जे अख्खा दिवस महापालिकेत पडीक असतात त्यांचा चरितार्थ त्या २/४ हजार खप असलेल्या वृत्तपत्राच्या नोकरीतून कसा भागतो हा प्रश्न सामान्य नागरीकांना पडू शकतो ........मला नाही.
नगरसेवकांच्या १५ / २० फुट लांबीच्या गटाराच्या कामाच्या भूमीपूजनाच्या बातमीसाठी पण रांगेत उभं राहून पाच पाचशे रुपयांची पाकिटं घेणारे पत्रकार बघितलेत मी. ज्याला त्याला नैतिकतेचे धडे देण्याचा अधिकार दिला कोणी ह्या पत्रकारांना ? राजकारणी देतात म्हणून आम्ही घेतो असं तुमचं म्हणणं असू शकेल पण तृम्ही घेता म्हणून राजकारणी देतात ही वस्तुस्थिती आहे.

मुळात हल्ली पत्रकारांनी राजकारण्याना तत्त्वनिष्ठा वगैरे शिकवणं म्हणजे मल्लिका शेरावतने सनी लीओनी ला पावित्र्यावर प्रवचन देण्यासारखं वाटतं मला.

हे मी जे काही लिहीलंय त्यातून मला कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला योग्य ठरवायचं नाहीये...... पण हो .....ब्रेकिंग न्यूजला चटावलेल्या पत्रकारांच्या बुद्धीमत्तेबदल आणि नीतीमत्तेबद्दल निश्चित प्रश्नचिन्ह उभं करायचं आहे.

मंगळवार, ८ मार्च, २०१६

जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिनाचं औचित्य साधुन मी जाहिर करतो की ......माझ्या परिचयातल्या बहुतांश बायका / मूली ह्या.......अत्यंत .........शिष्ठ........ भांडकुदळ...…....पैशाला चिकट........मारकुट्या...... .मठ्ठ....... .आळशी.......दिवसभर सेल्फ़ी काढत T P करणाऱ्या........ किंवा WA आणि फेसबुकवर पडिक असणाऱ्या ......कुचकट ........ वगैरे नाहीत हे मला (आजच्यापुरतं तरी) मान्य आहे.

एक जात सगळ्यां सुस्वभावी ....... बुद्धिमान ......समजुतदार.......प्रेमळ..........मितभाषी.......समजुतदार आहेत अशी मला ...........शंका आहे

इथे जर "चुकून" कोणाच्या अवगुणांचा उल्लेख झाला असेल तर निव्वळ योगायोग समजावा ही विनंती

साधासुधा
महेंद्र कुलकर्णी

शनिवार, ५ मार्च, २०१६

मोबाइलकुमार आणि मोबाइलकुमारी

आज संध्याकाळी कल्याण रेलवे स्टेशनच्या बाहेर बसलेल्या फेरीवाल्यांचं सामानसुमान जप्त करून महानगरपालिकेच्या गाडीत भरुन नेते होते......

थोडंसं पुढे एस टी स्टॅंड च्या समोर चार चार रांगा करून ....80% रस्ता अडवून रिक्षा उभ्या केल्या जातात ...... ह्या रिक्षा आणि टोळकी करून बिड्या ओढ़त आजुबाजूला उभे असलेले रिक्षा चालक पण त्याच गाडीत भरून नेता नाहीत का येणार ? रहदारीची कोंडी तरी कमी होईल

जाता जाता रस्त्याच्या माधोमध चालताना मोबाइलवर बोलत किंवा कानात बुचं घालून गाणी ऐकत बागडणारे दहा पंधरा मोबाइलकुमार आणि मोबाइलकुमारी पण त्याच गाडीत भरून न्यायला हरकत नाही

गुरुवार, ३ मार्च, २०१६

व्यवहारज्ञान.........आणि समयसूचकता



गेली दहा वर्ष “पूर्णवेळ” व्यवसाय करूनही काही गोष्टी मला आत्मसात करता आलेल्या नाहीत. कदाचित “गाणं” जसं रक्तात असावं लागतं तशाच ह्या गोष्टी रक्तात असाव्या लागतात.
साधारण १० / १२ वर्षापुर्वीची गोष्ट आहे. मी नविनच मोटरसायकल घेतलेली. तेव्हा ऑफिस चर्नी रोडला  म्हणजे गिरगावात होतं. कल्याणपासून by road अंतर होतं ६० किलोमीटर. तरीही आठवड्यातून चार दिवस मी मोटरसायकल घेऊन ऑफिसला जायचो. कल्याणला राहणारे आणि माझ्यासारखेच किडे असणारे काही मित्र जाता येताना बरोबर असायचे.

इम्रान नावाचा माझा एक मित्र म्हणजे अस्सल नमुना.... बऱ्याचदा इम्रानच माझ्या बरोबर असायचा. त्याचं ऑफिस तेव्हा नरीमन पॉइंटला होतं. संध्याकाळी निघताना एकमेकांना फोन करायचा आणि मी त्याला सी.एस.टी. स्टेशनच्या समोरून pickup करायचं असं आमचं ठरलेलं असायचं.

त्या दिवशीही तसंच त्याला घेतलं आणि भायखळ्याला पोचलो तेव्हा आठवलं, एका मित्राच्या मुलाने क्रिकेट साठी जे सीझनचे बॉल  लागतात ते आणायला सांगितलेले. हे बॉल मिळतात अहमदाबाद स्पोर्ट्स नावाच्या दुकानात मेट्रोजवळ. म्हणजे पुन्हा ट्राफिक मधून रांगत भायखळा ते मेट्रो उलटं जावं लागणार होतं, साधारण ८ किलो मीटर. बॉल नेले नसते तर मित्राच्या लेकाने क्रिकेटची Bat डोक्यात घालायची खूप शक्यता होती.

परत फिरावं लागणार हे इम्रानला सांगितलं, त्याची काहीच हरकत नव्हती. तेवढ्यात समोर यु टर्न मारायला जागा दिसली पण........... तिथे यु टर्न चालणार नसल्याची पाटी होती. पुढे जायला लागणार होतं. मी विचार करत होतो, पुढे लवकर यु टर्न मारता येण्याची शक्यता कमी होती.

“भाई तू मार यु टर्न कूछ नहीं होगा” इम्रानने “ग्यारंटी” दिली. मी पटकन त्या पाटीकडे दुर्लक्ष करत यु टर्न मारला..........आणि .......रस्त्याकडेच्या झाडाआडून बरोबार .......पोलिसमामा दत्त म्हणून समोर अवतरले.

हो.... नाही .....पाटी दिसलीच नाही .......खूप अर्जंट काम आहे .......वगैरे वगैरे सांगून झालं ............शेवटी मामा शंभरवरून पन्नास रुपयात सोडायला तयार झाले. मी पैसे दिले मामा दुसरा बकरा शोधायला झाडामागे चाललेच होते.

“ओ साब एक मिनिट इधर आओ” इम्रानने हाक मारली ....माझ्या पोटात गोळा आला, आता हा बाबा वाद घालतो की काय म्हणून. तोवर मामा जवळ आले
“मेरेको बीस रुपये दो वो पचास मे से” इम्रानने मामांना सांगितलं. मामांच्या आणि माझ्याही चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं इम्रानच पुढे बोलला......
“मैने इसको बोला यु टर्न मारनेको इस के लिये इसने यु टर्न मारा............मेरी वजह से आप को पचास मिला तो उसमेसे मेरेको भी मिलना चाहिये ना साब” शक्य तेवढ्या निरागस आवाजात इम्रान बोलला............मी गाडी stand वर लावून हसत सुटलो ...........मामांना काय बोलावं तेच सुचलं नाही ...........हसत हसत त्यांनी माझी ५० ची नोट इम्रानच्या हातावर ठेवली आणि हसत हसतच जायची खूण केली (मनातल्या मनात साष्टांग नमस्कार पण घातला असणार)

आम्ही अहमदाबाद स्पोर्ट्स मधे गेलो मग कल्याण कडे निघालो. आता हा माझे माझे पन्नास परत करणार की स्वतःकडेच ठेवणार ह्याचा विचार करत आम्ही कल्याणला पोचलो. इम्रानच्या घराजवळ सोडल्यावर पठ्ठ्या सरळ चालू पडला. म्हटलं च्यायला गेले पन्नास.....जाऊ दे गेलेलेच होते. पण मग थोडा विचार करून इम्रानला आवाज दिला

“इम्रान यार इधर आ.........साले तेरेको शरम नहीं आती ? सी.एस.टी. से यहां तक मेरे गाडी पे आरामसे बैठ के आया ....पेट्रोल का आधा पैसा तो दे” त्याच्या कडून जे व्यवहारज्ञान शिकलो ते मी त्याच्यावरच वापरलं.

“भाई देने के लिये तो मै आधा क्युं पुरा पैसा दे दु .....लेकीन अगर किसी को येह समझा तो तेरी क्या इज्जत रहेगी ? लोग सोचेंगे तू मेरे लिये रिक्षा चला रहा है .......यार तू इतना बडा आदमी .....येह अच्छा दिखेगा क्या ?
मगासच्याच निरागस आवाजात ......चेहेऱ्यावर तेवढीच निरागसता ओतून इम्रानने उत्तर दिलं
च्यायला आला का “इज्जत का सवाल” त्यात आणि “बडा आदमी” वालं चोकलेट.............मी काही विचार करून उत्तर देईपर्यंत “इम्रान भाईनी” त्यांच्या बिल्डींगच्या पायऱ्या चढायला सुरुवात पण केली.

आजतागायत ना ते पन्नास रुपये आणि पेट्रोलचे अर्धे पैसे त्याने मला देऊ केले ना मी मागायच्या फंदात पडलो .........ज्या गुरुकडून जे शिकतो ते त्याच्यावर वापरायचं नाही एवढं मात्र शिकलो.

म्हणून मला मनापासून वाटतं व्यवहारज्ञान .........आणि समयसूचकता ह्या गोष्टी रक्तातच असाव्या लागतात कोणी तरी शिकवून त्या येत नाहीत.