मंगळवार, ४ मार्च, २०१४

"सौ नवनीत कौर राणा”



"सौ नवनीत कौर राणा”
नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि अमरावती साठी “सौ नवनीत कौर राणा” ह्या महिलेचं नाव बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या. आजवर राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी अपक्ष आमदार श्री रवी राणा यांच्या त्या पत्नी.
नवनीत कौर राणा यांच्याबद्दल जुजबी माहिती असलेले लोक लगेच कामाला लागले, आणि मग नवनीत यांचे जुने पाने फोटो फेसबुक आणि Whatsapp वर फिरू लागले. नवनीत यांना उमेदवारी मिळण्याचं खरं कारण मा. श्री शरद पवार साहेबच सांगू शकतील पण एक सामान्य नागरिक म्हणून विचार केल्यावर मला काही कारणं दिसतात ते अशी ...
1. मुळात आता सुशिक्षित वर्ग राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस ह्या दोन्ही पक्षांपासून दुरावत चाललाय. सुशिक्षित मतदारांप्रमाणेच सुशिक्षित उमेदवार मिळणंही त्यांना अवघड झालेलं असणार मग त्यातल्या त्यात १२वी शिकलेल्या नवनीत ताई दुसरी किंवा तिसरी शिकलेल्या उमेदवारांपेक्षा ग्रेटच.
2. वर्षानुवर्ष तेच तेच चेहेरे बघून लोक कंटाळतात. एक नवा आणि “बघणेबल” चेहेरा लोकांसमोर आणून एकूणच “राष्ट्रवादी कॉंग्रेस” बघणेबल व्हावी असं पवार साहेबांचं गणित असणार. निदान अशा बघणेबल चेहेऱ्याकडे बघून तरी जनता अजितदादा पवारांची “मुक्ताफळं”, सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, भुजबळांची रोज उघडकीला येणारी नविन प्रकरणं हे सगळं विसरेल अशी साहेबांची खात्री असणार.

3. लोकसभेत आरडाओरडा करणारे, निरर्थक घोषणाबाजी करणारे खासदार जनतेचं पुरेसं मनोरंजन करू शकत नाहीत. पवार साहेबांनी आय.पी.एल वाल्यांची कल्पना वापरली असणार. आय.पी. एल मध्ये कसं क्रिकेटचा थरार वाढविण्यासाठी विकेट पडल्यावर किंवा चौकार षटकार मारल्यावर मनोरंजन असतं. नवनीतताईना लोकसभेत बसवून लोकसभेची शोभा वाढविण्याचा पवार साहेबांचा “उदात्त हेतू” असणार. त्या निमित्ताने लोकसभेचं “Live” प्रक्षेपण करणाऱ्या channels चं पण टी.आर.पी. वाढेल.

नवनीत ताईना उमेदवारी का दिली हे एक तर साहेब जाणोत आणि ताई जाणोत. मतदार काय गोविंदालाही निवडून देतात. तुम्हीही हा लेख केवळ त्यांचा फोटो बघून उत्सुकता वाढली म्हणूनच वाचलात की नाही ? त्या निवडून आल्याच तर डोक्यावर पदर घेऊन संसदेच्या पायऱ्या चढतानाचे त्यांचे फोटो पण असेच बघा आणि शेअर करा म्हणजे झालं.

एक
मनोरंजनोत्सुक ( “निखळ” मनोरंजनासाठी उत्सुक असलेला )

ता.क. – नवनीत ताईना उमेदवारी मिळाल्यापासून कु. राखी सावंत देखील निरनिराळ्या पक्षांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत अशी बातमी आहे.

शनिवार, १ मार्च, २०१४

नाही म्हटलेलं, मला हल्ली चालतं

कशालाही नाही म्हटलेलं, मला हल्ली चालतं
नकारांची सवय लागलीये पण मौन सालं टोचतं
पाठ असतात “सगळेच” पाढे, गणित नेमकं चुकतं
भविष्याचं भूत माझ्या “आज” चा गळा घोटतं
झेपत नाहीत माणसं फारशी, जंगलात मन रमतं
शांत निवांत तळ्यात एकटंच, पाय सोडून बसतं
तिऱ्हाईतासारखं आरशात बघायला, हल्ली खूप आवडतं
रोज मरून हसत जगायला, मला छान जमतं

रविवार, १९ जानेवारी, २०१४

प्रति, श्री आर. आर. पाटील, गृहमंत्री – महाराष्ट्र राज्य



प्रति,
श्री आर. आर. पाटील
गृहमंत्री – महाराष्ट्र राज्य

साहेब,
नुकतीच तुम्ही मा. राजसाहेबांची संपत्ती जप्त करायची वल्गना केलीत आणि तुमचा “कर्तव्यकठोर बाणा” बघून तुमचा खूप अभिमान वाटला. अशा प्रकारची “धडाडीची” कारवाई तुम्ही सातत्याने करत आलात पण “नजरचुकीने” काही प्रकरणे तुमच्या नजरेतून सुटून गेली. त्या प्रकरणांची आठवण करून देण्यासाठी हा पत्रप्रपंच.

साहेब .......

१ ) काही वर्षांपूर्वी तुम्ही डान्स बार “बंद म्हणजे बंद” ची घोषणा केलीत पण दुर्दैवाने आजही तेवढेच डान्स बार तेवढ्याच दिमाखात चालू आहेत. अधून मधून वृत्तपत्रांमध्ये धाडी पडल्याच्या, काहींना अटक झाल्याच्या बातम्या येतात पण एवढं मात्र खरं की परिस्थिती “जैसे थे” आहे. तुमच्या अधिकारात असलेल्या पोलिस दलावर तुमचा वचक राहिला नाही की लोक म्हणतात त्याप्रमाणे खरंच तुम्हालाही ह्या धंद्यातून काही “मिठाई” पोचतेय म्हणून दुर्लक्ष करताय ?

२ ) ११ ऑगस्ट २०१२ रोजी आझाद मैदानात आणि सी.एस.टी. परिसरात थैमान घातलं गेलं. ५८ पोलीस जखमी झाले, ६० / ७० गाड्या फोडल्या गेल्या, पत्रकारांना मारहाण झाली आणि महिला पोलिसांशी देखील गैरवर्तन करण्यात आले. कोट्यावधींच्या सरकारी आणि खाजगी मालमत्तेचं नुकसान झालं. अमर जवान स्मारकाचं देखील नुकसान केलं गेलं. साहेब .........किती नुकसान भरपाई वसूल केलीत आजवर ?

३ ) मागच्या वर्षी सांगली महापालिकेची निवडणूक झाली. त्यापूर्वी सांगली आणि मिरजेत ज्यांच्यावर दंगल भडकविण्याचा आरोप होता त्या अज्जू पटेल, मैनुद्दीन बागवान सारख्या महाभागांना उमेदवारी देऊनच तुम्ही थांबला नाहीत तर चक्क त्यांच्यासाठी प्रचारसभा पण घेतलीत. त्यांच्याकडून किती नुकसान भरपाई वसूल केलीत ? नक्की काय संदेश देताय मतदारांना ?

४ ) तुमच्या जितेंद्र आव्हाडांकडून आजवर किती नुकसान भरपाई वसूल केलीत ? त्यांचं तर स्वतःच घर पण नाही महाराष्ट्रात कशी वसूल कराल नुकसान भरपाई ?
आदर्श घोटाळा असू दे किंवा हजारो कोटीचा सिंचन घोटाळा असू दे काही प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पण ठपका असलेल्या तुमच्या आणि तुमच्या मित्रपक्षातल्या नेत्यांचं काय वाकडं केलंत साहेब आजवर ?
कशाला उगाच सच्चेपणाचा आणि कर्तव्यकठोर वगैरे असल्याचा आव आणताय. ही असली “राज”कारणं तुम्हाला झेपणारी नाहीत.

परवा एकाशी बोलता बोलता सहज बोलून गेलो बघा पटतंय का ..........

“राजकारण करावं तर शरद पवारांनीच
बोलबच्चन तर काय आर. आर. पाटील पण आहेत”

आपला
एक बोलबच्चन
तुमच्याकडून “नजरचुकीने” काही घटना दुर्लक्षित झाल्या असाव्यात, कदाचित इथे दिलेल्या लिंक्स बघून तुम्हाला त्या कळतील