बुधवार, २२ एप्रिल, २०१५

उचल्या - लक्ष्मण गायकवाड


लेखक - लक्ष्मण गायकवाड


१९८७ मधे प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकाच्या जवळपास ६/७ आवृत्ती निघाल्या. स्वातंत्र्याचा अर्थही पुरेसा न कळलेल्या, मुख्य प्रवाहापासुन जाणुन बुजुन लांब ठेवल्या गेलेल्या एका समाजाची ही कहाणी.

लेखकाने मनोगतात सांगितल्याप्रमाणे सदर पुस्तकाचे साहित्यीक मुल्य काय आहे ? पुस्तकातुन सामान्य माणसाला काय मिळालं ? असले वांझोटे प्रश्न पुस्तक वाचल्यावर पडत नाहीत. जे आहे ते गावाबाहेरचं खरकटं वास्तव.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच पोलिस "आजीच्या थानाला धरु धरु मारत होते " असं वाक्य येतं आणि माझ्यातल्या पांढरपेशा मध्यमवर्गीय हादरतो. आमच्या पिढीजात शहरी चौकटीतुन आम्हाला असलं हिडीस कधी काही दिसलंच नाही. संपुर्ण पुस्तक वाचताना आपण त्या किळसवाण्या जगाचा भाग होवुच शकत नाही. लांब बसुन एखादया डबक्यातल्या किडयांची वळवळ पहावी तितक्या अलिप्तपणे मी हे पुस्तक वाचलं.

उंदीर भाजुन खाणं, मांजर खाणं नुसत्या कल्पनेनीही आपल्याला मळमळल्यासारखं होतं पण कुठे तरी आपल्या स्वच्छ, हायजीनीक वगैरे जीवनशैलीवर घणाचे घाव घातल्यासारखं वाटतं. चोरीचं शिक्षण देताना मार खायचं पण शिक्षण दीलं जातं. ह्या शिक्षणात "नागडं करुन गांडीत मिरचु भरलं" तरी तोंड बंद ठेवायला शिकवलं जातं. पोलिसांचा खबरी म्हणुन लेखकाच्या आजोबाला राजरोस पणे कु-हाडीचे घालुन मारलं जातं तरीही कुठेही तक्रार न करता प्रकरण दाबलं जातं. एकुणच मुख्य प्रवाहातील कायदा व न्याय व्यवस्थेवरचा अविश्वासच ह्यातुन प्रतिबींबीत होतो.

पुढे एका प्रकरणात बापानेच मुलीला बायकोप्रमाणे "वापरल्याचा" उल्लेख येतो, जातपंचायतीकडुन त्याला शिक्षाही ठोठावली जाते. अशिक्षीत, असुनही किमान नितीमत्तेचं भान ह्या समाजाला असल्याची ही खुण वाटते.

ह्या जमातीवर चोर जातीचा शिक्का ब्रिटीशांनी मारला, व्ही. टी. ( आताचं छत्रपती शिवाजी टर्मिनस ) च्या इमारतींसारखाच आपण हा शिक्काही अभिमानाने जपला.

शिक्षणाशी दुरान्वयेही संबंध नाही, चोर म्हणुन नोकरी नाही, शेतीवाडी नाही अशा परिस्थीतीत पोलिस आणि इतर उच्च्वर्णीयांकडुन केली गेलेली पिळवणुक, लेखकाचा तक्रारीचा सुर कुठेच दिसत नाही जे आहे जसं आहे तसंच्या समोर ठेवलं गेलंय.

पुस्तकाच्या शेवटच्या भागात लेखकाने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणुन केलेले प्रयत्न दिसतात. दलितांचा वापर आजही फ़क्त "व्होटबॅंक" म्हणुनच केला जातो हे वास्तव समोर येतं. राजकारण्यांना दलित मतं हवी असतात पण सत्तेच्या सारीपाटात बरोबरीचं स्थान देण्यात आजही कमीपणा मानला जातो.

पुस्तक वाचुन झाल्यावरही मला सावरायला बराच वेळ लागला. आपणच आपल्याला प्रश्न विचारत राहतो आणि निरुत्तर होवुन आपलीच कीव करत राहतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: