बुधवार, १८ मार्च, २०१५

कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला ? - शेषराव मोरे


लेखक - शेषराव मोरे

पुस्तकाबद्दल अनेक परस्परविरोधी लेख निरनिराळ्या वृत्तपत्रात आणि इंटरनेटवर वाचनात आले आणि पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण झालं म्हणून पुस्तक घेतलं. पुस्तकात मांडलेली मतं चूक की बरोबर त्यावर इतिहासाचे किंवा समाजशास्त्राचे अभ्यासक चर्चा करत राहतील पण एक वाचक, एक भारतीय नागरिक म्हणून काही गोष्टींची नोंद घ्यावीशी वाटली.
१. १८५७चं बंड मुळात इस्लामी राज्यकर्त्यांनी पुरस्कृतकेलेलं बंड होतं.

२. ब्रिटीश राज्यसत्तेने ह्या बंडाचा सूड एवढा भयानक पद्धतीने घेतला ज्याची तुलना हिटलरने केलेल्या ज्यू हत्याकांडाशीच होऊ शकते. दिल्लीतल्या प्रसिद्ध जामा मशिदीचा वापर अनेक महिने घोड्यांच्या तबेल्यासाठी केला गेला. चौकाचौकात हजारो मुसलमानांना फाशी दिली गेली. मिर्झा गालिबने लिहिलेलं खरं मानायचं झालं तर एकट्या लखनौ मध्ये मुस्लिमांची संख्या अडीच लाखावरून एक हजारावर आली. मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना परागंदा होण्याची वेळ भारतीय इतिहासात पहिलीच असावी.

३. मोगल खानदानातील २९ पुरुषांना संपविण्यात आलं.

४. स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातसर अहमदयांनी प्रथम मांडली. जीना त्या वेळी बहुदा जन्मालाही आले नसावेत

५. राष्ट्रवादी मुस्लीमांना अखंड भारत हवा होता पण हिंदुच्या बरोबरीने सत्तेत भागीदारी ( ५०%) हवी होती ( जेमतेम १५% असूनही )

अतिशय विचारपूर्वक आणि मुद्देसूद केलेल्या मांडणीमुळे संपूर्ण पुस्तक वाचनीय आहे. फाळणीबाबत बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला विचार ह्या विषयावर पुरेसा बोलका आहे.
जर हिंदुस्थान अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते...
मुसलमान ही शासनकर्ती जमात बनली असती... जेव्हा फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्‍वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंध, महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मला एकच वाटतंआज पाकिस्तान आणि पाकिस्तानी मानसिकता सीमेच्या पलीकडे आहे, मधे पोलादी भारतीय लष्कर आहे तरीही आपल्याला एवढा उपद्रव आहे, हीच कीड सीमेच्या अलीकडे असती तर तुमचं आमचं आयुष्य १००% नरकच झालं असतं.


रविवार, १५ मार्च, २०१५

बकऱ्याची बॉडी - समर खडस



लेखक - समर खडस

अफाट पुस्तक, प्रत्येक कथा अफाट, हलवून टाकणारी. स्वतःची समाजवादी विचारसरणी न लपविता खडस स्वतःला समाजवादी म्हणविणाऱ्यांचे बुरखे सहज फाडून काढतात. so called "System" वर हल्ला चढवताना हल्लेखोरांच्या "मर्यादा" स्पष्ट करून दाखवायलाही खडस कचरत नाहीत.

बकऱ्याची बॉडी खेरीज "भायेरची", "नशीब", "असे हे विलक्षण जग", "बेगम", "रेताड", "त्या तिथे", "तवंग नाही तलावात" ह्या कथा असलेलं हे पुस्तक एकदा हातात घेतलं की सोडवत नाही.

भाऊ पाध्येंची आठवण होते प्रत्येक कथा वाचताना. खूप दिवसांनी एवढं "सकस" काही वाचायला मिळालं.

मंगळवार, १० मार्च, २०१५

एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर



लेखिका – वीणा गवाणकर

आजपासून साधारण दीडशे वर्षांपूर्वी कापसावर अवलंबून असणाऱ्या दक्षिण अमेरिकेतील शेतकऱ्यांसाठी “देवदूत” ठरलेला एक कृष्णवर्णीय संशोधक म्हणजे  “कार्व्हर” आयुष्यभर फक्त कष्ट आणि कष्टच उपसत, सरळ संपन्न आयुष्य नाकारून समाजासाठी, सामान्य शेतकऱ्यांसाठी राबलेला एक “संत” असंच त्याच्या बाबतीत म्हणावं लागेल. वर्णभेदाच्या झळा सोसूनही कोणताही द्वेष मनात न ठेवता सर्वांसाठीच आयुष्यभर झटला हा प्राणी.
अफाट बुद्धिमत्ता, कमालीचा सोशिक स्वभाव स्वीकारलेल्या कामावरची निष्ठा अशा गुणांचं अनोखं रसायन असणारा कार्व्हर वीणा गवाणकरांनी खूप ताकतीने मांडलाय.

१००% संग्रही असावं असं पुस्तक 

गुरुवार, ५ मार्च, २०१५

चंद्रमुखी - विश्वास पाटील

लेखक - - विश्वास पाटील

विश्वास पाटलांची जवळपास सर्व पुस्तकं मी वाचलेली आहेत साधी सरळ भाषा, प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याची अफ़ाट ताकद.

ग्रामिण जीवनाचं दर्शन घडवतानाच राजकारणातल्या खाचाखोचा सहज आपल्यासमोर उलगडत जातात. कादंबरीतली कुठलीच व्यक्तीरेखा "माणुसपणाच्या" सीमा सोडत नाही. आपल्या आजुबाजुलाच कादंबरी घडत जातेय असं वाटत रहातं

राजकारण, सत्ता अशा दगडी किना-यांवरुन वाहतानाच कादंबरीचा प्रवाह स्त्रीमन उलगडुन दाखवताना मात्र वरुन कितीही आक्रस्ताळा वाटला तरी आतुन खुप हळुवार होतो. विश्वास पाटलांची हीच खरी ताकद.

एका तरुण तडफ़दार राजकारण्याला पडलेलं रांगडं स्वप्न म्हणजे................... चंद्रमुखी,

प्रियकरासाठी अवघं आयुष्य एका क्षणात उधळायला तयार होणं काय असतं ते जी सांगते ती................... चंद्रमुखी

पैशांसाठी कला, शरीर आत्मा सगळं विकुनही माणुसपण टिकवते ती................ चंद्रमुखी

पोकळ समाजनियम लाथेने  उडवुन लावते, प्रसंगी वाघिणीसारखी तुटुन पडते ती............... चंद्रमुखी.

संपुर्ण कादंबरी नायिकेभोवती फ़िरते, तिच्या भावभावना उलगडुन दाखवते, तिच्यावरचा अन्याय मांडते तरीही कुठेही रडकथा न होता उलट चंद्रमुखी अंगावरच येते.

एक तरुण राजकारणी एका कलावंतीणीच्या प्रेमात पडतो, तीही काही काळ वाहवत जाते, दोघांना जाग येते तेव्हा त्याला जाणवतं त्याची संपुर्ण कारकीर्द पणाला लागलेली आहे. जिच्यावरच्या प्रेमामुळे ही वेळ आली तीच शेवटी त्याला सगळ्यातुन बाहेर काढते. एखादया स्वप्नातुन जागी व्हावी तशी आपल्या आयुष्यात परतते. जणु भीक म्हणुन त्याला त्याचं आयुष्यच देउन टाकते.


एवढी साधी सोपी कथा पण वाचताना आपणही त्या कथेतीलच एक व्यक्तीरेखा आहोत असं वाटू लागतं. कादंबारीचा शेवट मात्र आपल्या डोळ्यात थोडं तरी पाणी आणल्याशिवाय रहात नाही.