रविवार, ३१ जानेवारी, २०१६

पुणं बदललंय ?

पुणं हल्ली खुप बदललंय .... कालपासून बघतोय ..... काल हॉटेल मध्ये जेवायला गेलो तर वेटर अदबींने बोलत होते

सकाळी 8 वाजता खाली उतरलो तर चक्क वाण्याचं दूकान उघडलेलं होतं

मला जाम चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं

सकाळी मिसळ खायची होती AvanTea Mehta ला विचारल, तिने काटा किरर् म्हणून एक ठिकाण सुचवलं ... आणि आत गेल्या गेल्या ही पाटी बघुन जीव भांड्यात पडला.

एक मिसळ दोघात खायची असेल तर 20 रूपए Extra भरावे लागतील ही धमकीवजा सूचना वाचून आपण पुण्यातच असल्याची खात्री पटली

मिसळ पण पाटी वरच्या धमकीपेक्षा तिखट ...पण तितकीच "सही"

रविवार, १० जानेवारी, २०१६

मुख्यमंत्री साहेब ........






प्रति.
मा.श्री देवेंद्रजी फडणविस,
मुख्यमंत्री – महाराष्ट्र
महोदय,
विषय – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात होत असलेल्या रस्ता रुंदीकरणाबाबत
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या दरम्यान आपण ह्या महानगरपालिका क्षेत्राच्या विकासासाठी हजारो कोटींचे “Package” जाहीर केलेले आहे. दिलेल्या शब्दाला आपण जागाल ह्या बद्दल आम्हा नागरीकांच्या मनात कोणताही संशय नाही.

कल्याणकर नागरिक म्हणून मला अभिमान वाटतो की आपल्याला व आम्हालाही अपेक्षित असलेल्या “स्मार्टसिटीच्या” दिशेने आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त श्री ई. रविंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाने पावले टाकण्यास सुरुवात केलेली आहे. ह्याच पद्धतीने जर वाटचाल चालू राहिली असती तर कदाचित राज्यातील पहिल्या स्मार्टसिटीचा मान आमच्या शहराला मिळाल्याशिवाय राहिला नसता.

ह्या शहराच्या दुर्दैवाने आपल्याच पक्षाचे आमदार, खासदार तसेच आपल्या मंत्री मंडळातील आपले सहकारी संपूर्ण ताकदीनिशी स्थानिक प्रशासनाच्या आणि पर्यायाने सार्वत्रिक जनहिताच्या विरोधात जाऊन मुठभर व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसत आहेत. सदर प्रकारात संबधितांकडून आपलेही नाव घेण्यात येत आहे.
.
कारवाईच्या विरोधात दबाव निर्माण करण्यासाठी आयुक्तांच्या बदलीच्या बातम्या जाणून बुजून “गुजराती” वृत्तपत्रांच्या आणि आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून पसरविल्या जात आहेत.

गेल्या अनेक महिन्यात आयुक्त श्री ई. रविंद्रन यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. प्रशासनातील अनेक बेशिस्त अधिकारी व कर्मचारी आज घरी बसवलेले आहेत. आमच्या हितासाठी सकाळी ६ वाजल्यापासून कल्याण डोंबिवली शहरांच्या गल्लीबोळात स्वतः फिरणारे आयुक्त ह्या शहराने आजवर पाहिलेले नाहीत. पूर्वी ३६५ दिवस आणि २४ तास भरून वाहणाऱ्या कचरा कुंड्या आयुक्तांच्या भितीने वाहायच्या थांबलेल्या आहेत.

असं असताना जर खरोखरच मुठभर व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडून आयुक्तांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला किंवा त्यांनी सुरु केलेल्या मोहिमेवर गदा आणली गेली तर ह्या शहरातील नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत ह्याची आपण नोंद घ्यावी ही विनंती.

सदर प्रकरणात लक्ष घालून आपल्या पक्षातील स्थानिक आमदार खासदार व आपल्या मंत्र्यांना योग्य ती “समज” देऊन आपण स्थानिक प्रशासन व आम्हा कल्याणकरांच्या पाठीशी उभे रहावे ही विनंती.

आपला

जबाबदार कल्याणकर
कल्याण पश्चिम - ४२१३०१
.
वर लिहिलेलं पत्र मी मा. मुख्यमंत्री साहेबांना मेलवर माझ्या वैयक्तिक नाव व पत्त्यासह पाठवलेले आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्हीही पाठवा
cm@maharashtra.gov.in आणि chiefminister@maharashtra.gov.in

शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

निषेध नक्की कोणाचा करायचा ?


सकाळी ८.२३ ला कल्याणहून दादरला जाणारी स्लो लोकल, ही गाडी कारशेड मधून येत असल्याने कल्याणला सहज जागा मिळते. ठाकुर्ली, डोंबिवलीला आणि मग मुंब्र्यापर्यंत बऱ्यापैकी गर्दी होते. ठाण्यात मात्र गर्दी बरीच कमी होऊन जाते.


आजही तसंच झालं मुंम्र्याला खूपच गर्दी झाली बराच आरडाओरडा चालू होता, प्रत्येक डब्यात आत शिरण्यासाठी जीव तोडून ढकला ढकली सुरु असतानाच गाडी सुटली. गाडीने वेग घेतला. सुसाट निघालेली गाडी कळव्याजवळ आली आणि मागच्या कोणत्यातरी दारातून एक जोरदार किंकाळी ऐकू आली. किंकाळी बाईची की पुरुषाची हेही कळलं नाही. “क्या हुवा ?” जो तो एकमेकांना विचारू लागला “अरे यार कुछ नहीं... कोई तो गाडीसे गिर गया” कोणी तरी माहिती पुरवली. “अरेरे बेचारा” दोन चार जणांना वाईट वाटलं.

कळवा आलं मग ठाणा ...मग मुलुंड. गर्दी चढत राहिली उतरत राहिली. लोक पुन्हा आपल्या गप्पा आणि मोबाईल मधे बिझी झाले. ज्यांना उतरायचं होतं ते हळू हळू दरवाजाकडे सरकू लागले.

नाहूर आलं, पडलेल्या माणसाचा विचार करत मी उतरलो. डोक्यात चालू होतं फेसबुकवर सणकून काही तरी लिहायचं रेल्वे प्रशासनाला, सरकारला अगदी पंतप्रधानांना पण जाम हाणायचं. बाकीच्यांचं मरू दे पण निदान मी तरी फार संवेदनाशील आहे हे अख्ख्या जगाला ओरडून सांगायचं, पटवून द्यायचं.
.
इतक्यात मी ज्या गाडीतून उतरलो त्याच गाडीच्या लेडीज डब्यातून एक तरुणी धाडदिशी Platform वर पडली. आजूबाजूचे लोक तिला उचलायला धावले. नशिबाने तिला फार लागलं नव्हतं .........मी लांबच होतो. नकळत घड्याळाकडे लक्ष गेलं. मी वळलो आणि ऑफिसकडे चालायला सुरुवात केली.

हे असंच चालत आलंय आणि असंच चालणार ..............निषेध नक्की कोणाचा करायचा ?

सरकारचा ? रेल्वे प्रशासनाचा ? त्याच गाडीत जीवाच्या आकांताने घुसू पाहणाऱ्या त्या माणसाच्या अपरिहार्यतेचा ? पोटापाण्यासाठी मुंबईत कुत्र्या मांजराचं जीणं जगणाऱ्या गर्दीचा ? खिडकीत बसून फक्त बघ्याची भूमिका वठवणाऱ्या माझ्यासारख्या लाखो “हतबल” माणसांचा ?
.
त्या पडलेल्या माणसाचं काय झालं माहित नाही .....जर वाचला नसेल तर मेणबत्त्या वगैरे घेऊन मूकमोर्चा निघेल. त्या मोर्चाला मात्र मी आवर्जून जाईन. त्याच्या कुटुंबाच्या दुःखात मी पण सहभागी आहे हे सांगायला आणि कोणाचा तरी निषेध पण तोही “मुक्याने” नोंदवायला. फेसबुकवर टाकायला एक सेल्फी पण काढेन.
.
कधी तरी मीही असाच .....लोकलच्या दारातून जीवाच्या आकांताने आत शिरायचा प्रयत्न करत असेन .......गाडी वेग पकडेल ......त्या माणसासारखा माझाही हात सुटेल ............

निदान तोवर तरी मी खूप संवेदनाशील आहे गर्दीपेक्षा वेगळा आहे हे ओरडून सांगत राहीन ...

सोमवार, ४ जानेवारी, २०१६

एलपीजी सबसिडी


१० लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न असणाऱ्याची एलपीजी सबसिडी बंद होणार**
.
काल परवा कुठे तरी वाचलं की १० लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न असणाऱ्याची एलपीजी सबसिडी बंद होणार ...........खरोखर चांगला निर्णय 
.
ह्याच १० लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न असलेल्यांच्या मुलांना मिळणारा आरक्षणाचा लाभ का नाही बंद होत ? आरक्षणाचे फायदे किती पिढ्यांना द्यायचे ह्यासाठी काही मर्यादा नाहीच घालता येणार का ?
.
माझ्यासमोर अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्या आईवडलांनी सरकारी नोकरीत आरक्षणाचे फायदे घेतले आता चिरंजीव स्वतः फायदे घेत आहेत आणि त्यांच्या पुढच्या पिढीसाठीदेखील हेच फायदे उपटण्याच्या तयारीत आहेत.
.
ह्या स्पर्धेच्या युगात सर्वांचा “Starting Point” सारखाच असला पाहिजे वगैरे सगळं मान्य आहे पण न्याय द्यायचा म्हणून अजून किती वर्ष “Finish Point” च्या पुढे नेऊन सोडायचंय ?