शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

निषेध नक्की कोणाचा करायचा ?


सकाळी ८.२३ ला कल्याणहून दादरला जाणारी स्लो लोकल, ही गाडी कारशेड मधून येत असल्याने कल्याणला सहज जागा मिळते. ठाकुर्ली, डोंबिवलीला आणि मग मुंब्र्यापर्यंत बऱ्यापैकी गर्दी होते. ठाण्यात मात्र गर्दी बरीच कमी होऊन जाते.


आजही तसंच झालं मुंम्र्याला खूपच गर्दी झाली बराच आरडाओरडा चालू होता, प्रत्येक डब्यात आत शिरण्यासाठी जीव तोडून ढकला ढकली सुरु असतानाच गाडी सुटली. गाडीने वेग घेतला. सुसाट निघालेली गाडी कळव्याजवळ आली आणि मागच्या कोणत्यातरी दारातून एक जोरदार किंकाळी ऐकू आली. किंकाळी बाईची की पुरुषाची हेही कळलं नाही. “क्या हुवा ?” जो तो एकमेकांना विचारू लागला “अरे यार कुछ नहीं... कोई तो गाडीसे गिर गया” कोणी तरी माहिती पुरवली. “अरेरे बेचारा” दोन चार जणांना वाईट वाटलं.

कळवा आलं मग ठाणा ...मग मुलुंड. गर्दी चढत राहिली उतरत राहिली. लोक पुन्हा आपल्या गप्पा आणि मोबाईल मधे बिझी झाले. ज्यांना उतरायचं होतं ते हळू हळू दरवाजाकडे सरकू लागले.

नाहूर आलं, पडलेल्या माणसाचा विचार करत मी उतरलो. डोक्यात चालू होतं फेसबुकवर सणकून काही तरी लिहायचं रेल्वे प्रशासनाला, सरकारला अगदी पंतप्रधानांना पण जाम हाणायचं. बाकीच्यांचं मरू दे पण निदान मी तरी फार संवेदनाशील आहे हे अख्ख्या जगाला ओरडून सांगायचं, पटवून द्यायचं.
.
इतक्यात मी ज्या गाडीतून उतरलो त्याच गाडीच्या लेडीज डब्यातून एक तरुणी धाडदिशी Platform वर पडली. आजूबाजूचे लोक तिला उचलायला धावले. नशिबाने तिला फार लागलं नव्हतं .........मी लांबच होतो. नकळत घड्याळाकडे लक्ष गेलं. मी वळलो आणि ऑफिसकडे चालायला सुरुवात केली.

हे असंच चालत आलंय आणि असंच चालणार ..............निषेध नक्की कोणाचा करायचा ?

सरकारचा ? रेल्वे प्रशासनाचा ? त्याच गाडीत जीवाच्या आकांताने घुसू पाहणाऱ्या त्या माणसाच्या अपरिहार्यतेचा ? पोटापाण्यासाठी मुंबईत कुत्र्या मांजराचं जीणं जगणाऱ्या गर्दीचा ? खिडकीत बसून फक्त बघ्याची भूमिका वठवणाऱ्या माझ्यासारख्या लाखो “हतबल” माणसांचा ?
.
त्या पडलेल्या माणसाचं काय झालं माहित नाही .....जर वाचला नसेल तर मेणबत्त्या वगैरे घेऊन मूकमोर्चा निघेल. त्या मोर्चाला मात्र मी आवर्जून जाईन. त्याच्या कुटुंबाच्या दुःखात मी पण सहभागी आहे हे सांगायला आणि कोणाचा तरी निषेध पण तोही “मुक्याने” नोंदवायला. फेसबुकवर टाकायला एक सेल्फी पण काढेन.
.
कधी तरी मीही असाच .....लोकलच्या दारातून जीवाच्या आकांताने आत शिरायचा प्रयत्न करत असेन .......गाडी वेग पकडेल ......त्या माणसासारखा माझाही हात सुटेल ............

निदान तोवर तरी मी खूप संवेदनाशील आहे गर्दीपेक्षा वेगळा आहे हे ओरडून सांगत राहीन ...

सोमवार, ४ जानेवारी, २०१६

एलपीजी सबसिडी


१० लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न असणाऱ्याची एलपीजी सबसिडी बंद होणार**
.
काल परवा कुठे तरी वाचलं की १० लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न असणाऱ्याची एलपीजी सबसिडी बंद होणार ...........खरोखर चांगला निर्णय 
.
ह्याच १० लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न असलेल्यांच्या मुलांना मिळणारा आरक्षणाचा लाभ का नाही बंद होत ? आरक्षणाचे फायदे किती पिढ्यांना द्यायचे ह्यासाठी काही मर्यादा नाहीच घालता येणार का ?
.
माझ्यासमोर अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्या आईवडलांनी सरकारी नोकरीत आरक्षणाचे फायदे घेतले आता चिरंजीव स्वतः फायदे घेत आहेत आणि त्यांच्या पुढच्या पिढीसाठीदेखील हेच फायदे उपटण्याच्या तयारीत आहेत.
.
ह्या स्पर्धेच्या युगात सर्वांचा “Starting Point” सारखाच असला पाहिजे वगैरे सगळं मान्य आहे पण न्याय द्यायचा म्हणून अजून किती वर्ष “Finish Point” च्या पुढे नेऊन सोडायचंय ?

शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

मुकुंदराव देवभानकर


मुकुंदराव देवभानकर...

नात्याने माझ्या सासऱ्यांचे मामा........म्हणजे आमच्या सौ.चे आजोबा वय वर्ष ७४ पण आजतागायत एवढा तरुण माणूस मी बघितलेला नाही.

मागच्या आठवड्यात एका लग्नाच्या निमित्ताने अहमदाबादला गेलेलो. अनायसे जातोच आहोत तर दोन ठिकाणं आवर्जून बघायचीच असं ठरवलेलं. एक म्हणजे अक्षरधाम मंदिर आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं गुजरातचं मुख्यालय असलेलं “हेडगेवार सदन”. काही कारणाने अक्षरधाम मंदिर बघायचं राहून गेलं पण मुकुंद आजोबांना भेटणं आणि तेही संघाच्या गुजरातच्या मुख्यालयात, नशिबात होतं.

गेली ४७ वर्ष मुकुंद आजोबांनी पूर्णवेळ संघकार्यासाठी वाहून घेतलंय. आता देशभर भ्रमंती चालू असते त्यांची. मला थोडाफार राजकारणात रस असल्याचं ( अक्कल असल्याचं असं नाही म्हणालेलो मी ) लक्षात आल्यावर छान गप्पा रंगल्या. आजोबांसारखेच संघकार्याला वाहून घेतलेले अजूनही काही सहकारी मग आमच्यात सहभागी झाले. सुरुवातीला मी अक्कल पाजळली पण मग जाणवलं की मी लहान तोंडी मोठा घास घेतोय. गंमत म्हणजे त्या लोकांना त्याचं काहीच वाटत नव्हतं एखाद्या बरोबरीच्या माणसाशी चर्चा करावी तशीच चर्चा चालू होती. बोलता बोलता राजकारणाबद्दलचे माझ्या डोक्यातले बरेच किडे कधी निघून गेले ते कळलंही नाही.

आजोबांच्या खोलीतली असंख्य पण खूप नीटनेटक्या पद्धतीने रचून ठेवलेली पुस्तकं नक्की मला हसत असणार
.अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन वर्षानुवर्ष निव्वळ फ्लेक्सवर दिसणारे “कार्यसम्राट” वगैरे राजकारणी किंवा स्वतःच्या वाढदिवसाला कुठल्या तरी अनाथाश्रमात जाऊन काही तरी वाटून फोटो काढून घेणारे “ज्येष्ठ” वगैरे समाजसेवक आजवर खूप बघितले पण एकाच ध्येयासाठी ......समाजासाठी अख्ख आयुष्य वाहून घेऊनही त्याबद्दल चकार शब्द काढायला तयार नसणारी मुकंदआजोबांसारखी माणसं माझ्या माहितीत तर फारशी नाहीत

......May be he "IS NOT THE” greatest but yessss he is great

आता ह्या वयात पण आजोबांना सामान्य लोकांसाठी देशपातळीवर काही नविन काम उभं करण्याची स्वप्न पडताहेत.

एरवी बायकोने ढोसलल्याशिवाय निघताना मोठ्या माणसांना नमस्कार करायची मला आठवण होत नाही पण त्या दिवशी मात्र कोणी आठवण करून न देताही मनापासून मुकुंदआजोबांना नमस्कार केला

रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

मी पुरस्कार परत करणार.....



निषेध - पुरस्कार परत करणार.....

काल एक किलो तुरडाळ आणायला बायकोने वाण्याकड़े पिटाळलं ...... रुबाबात शंभराची नोट काढून वाण्याला दिली आणि एक किलो तुरडाळ मागितली.

माझ्याकड़े दयाभावाने बघत वाण्याने सांगितलं "इतने में तो आधा किलो आयेगा"
मी म्हटलं "अरे बाबा राज्य सरकारने तसं जाहिर केलंय"
"तो जाके सरकारसे ले लो" असं म्हणून तो दुसऱ्या customer कड़े वळला
त्या वाण्याने आणि पर्यायाने सरकारने एका मराठी मध्यमवर्गीय माणसाला दाखवलेली "असहिष्णुता" बघुन माझ्यातला "सहिष्णु" माणूस जागा झालेला आहे.

साहित्यिक नसलो म्हणून काय झालं मलाही पुरस्कार मिळालेला आहे. त्या वाण्याचा आणि पर्यायाने सरकारचा निषेध म्हणून तो पुरस्कार मी परत करायचं ठरवलं आहे.

१९८३ साली ओक बाग़ गणेशोत्सव मंडळातर्फे घेण्यात आलेल्या चमचा लिम्बु शर्यतीत भाग घेतल्याबद्दल मिळालेला हा पुरस्कार मी परत करतो आहे. राज्य सरकारने आपला प्रतिनिधी पाठवून तो घेऊन जावा.

टीप - पुरस्कार म्हणून मिळालेली ही ताटली आम्ही गेली 32 वर्ष वापरली असली तरी मी स्वतः ती घासुन ठेवलेली आहे.