रविवार, ३ एप्रिल, २०१६

“देऊळ बंद”



मगाशी झी सिनेमावर “देऊळ बंद” सिनेमा बघत होतो .......छान आहे सिनेमा म्हणून ........मोहन जोशीचं काम तर अप्रतिमच आहे. बाकी काही फारसं मला पटलं नाही पण “सध्या” त्यावर बोलून लगेच ज्वलंत, धर्माभिमानी, धर्मरक्षक लोकांच्या भावना वगैरे खाजवायच्या नाहीयेत.

ह्या सिनेमातलं मला एक कळलं नाही .......स्वामी आधी म्हणतात की “देव जन्म आणि मृत्यूत ढवळाढवळ करू शकत नाही” आणि सिनेमाच्या शेवटी राघववर झाडलेली गोळी स्वतःवर घेतात ......रक्त सांडत सांडत जातात ....... राघवचा जीव वाचवतात .........असं कसं ?

Cinematic Liberty वगैरे थोडंफार मला मान्य आहे पण ही केवळ निर्मात्याच्या किंवा लेखकाच्या Logic मधली चूक आहे की देवाचं महात्म्य ज्यांना कळतं (असं त्यांचं म्हणणं आहे) त्यांच्याही डोक्यात असं काहे confusion आहे?

जाऊ दे मला काय ह्यातलं फारसं कळत नाही तसंही  मी “छोटा भीम” बघणंच जास्त चांगलं..............


बुधवार, ३० मार्च, २०१६

टी.आर.पी. साठी काय पण, कधी पण, कुठे पण ......



ह्या मिडीयाचं म्हणजे कसं झालंय माहितेय का ? आधी स्वतःच आग लावायची ................मग “सबसे पेहले” त्या आगीची “ब्रेकिंग न्यूज” द्यायची .....................मग आग विझवायला सरकारी यंत्रणा कशी चार मिनीटांऐवजी साडेपाच मिनिटात पोहोचली ह्यावर दिवसभर काथ्याकुट करायचा.............पुन्हा संध्याकाळी स्टुडिओत दोन चार “स्वयंघोषित” विद्वान जमा करायचे आणि..................... आग विझवायला दोनशे एकोणपन्नास लिटर पाण्याची आवश्यकता असताना फक्त दोनशे चाळीस लिटर पाणीच वापरून सरकारी यंत्रणेला मूर्ख ठरवायचं किंवा.................... आग विझवताना दोनशे बावन्न लिटर पाणी वापरून सरकारी यंत्रणेने पाण्याचा कसा अपव्यय केला ह्यावर AC स्टुडीओत वांझोटी चर्चा घडवून आणायची.

अगदी अलीकडची त्या कन्हैय्याची केस असेल किंवा त्या कुठल्या तरी साधू बाबाला पडलेलं जमिनीखालच्या खजिन्याचं स्वप्न असेल, काड्या घातल्या त्या मिडीयाने..................सरकारी यंत्रणा पण ह्यांच्या नादाला लागून मुर्खासारखी पावले उचलते आणि हसं करून घेते.

एका गोष्टीचा जरा विचार करून बघा ........ राजकारणी , गुंड किंवा अगदी काही वेळेला मोठे
Businessman सुद्धा उघड उघड एकमेकांच्या विरोधात उभे राहतात ...........आव्हान देतात ....................असं कधी कुठल्या न्यूज चानेलने केलंय का ? ................कधी झी न्यूज ने ए.बी.पी. न्यूजचं स्टिंग ओपेरेशन केलंय का ? कधी जय महाराष्ट्रवाल्यांनी ..........आय.बी.एन. लोकमतचं “भांडाफोड”वगैरे केलंय का ?..........जवळपास प्रत्येक राजकीय पक्षावर ............राजकारणातल्या व्यक्तींवर....................ह्या सुपारीबाज मिडीयाने वाट्टेल ते आरोप लावले.......... पोलिस किंवा इतर सरकारी अधिकारी कसे नालायक आहेत ते आपल्याला सांगितलं, पटवून दिलं ............वाट्टेल तशा बातम्या पसरवल्या पण आजवर कोणत्या तरी प्राईम टाईमच्या चर्चेच्या गुऱ्हाळात ह्या पत्रकारांना ...........आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय का ?

लोकशाहीचा चौथा स्तंभ ...........सशक्त लोकशाही साठी “स्वतंत्र” मिडीयाची कशी गरज आहे वगैरे सगळं मला मान्य आहे .................पण हा असला टी.आर.पी. साठी वाट्टेल त्या थराला जाणारा मिडीया असण्यापेक्षा ..........



उरलेल्या तीन स्तंभांवरच लोकशाही टिकलेली बरी. 

मंगळवार, २९ मार्च, २०१६

रिक्षावाल्या साहेबांचं सौजन्य

रोजच्या प्रमाणे त्या दिवशीही ऑफ़िसला जाण्यासाठी म्हणुन कॉम्प्लेक्स च्या गेटमधुन बाहेर पडलो, समोर बघितलं तर रस्त्याच्या पलीकडे चक्क ४/५ शेअर रिक्षावाले रांगेत उभे होते. कहर म्हणजे टोळकं करून बिड्या ओढत एकत्र न उभे राहता आपापल्या रिक्षात बसून होते.  मी रस्ता क्रॉस करणार तेवढ्यात माझ्यासमोर एक रिकामी रिक्षा थांबली.

रिक्षावाल्याने अदबीने विचारलं "साहेब कुठे जाणार" 
खरं तर आमच्या इथून रिक्षावाले ..........कधीच कुठेच जात नाहीत
मी चाचरत उत्तर दिलं "स्टेशन"
तो पुन्हा तेवढ्याच अदबीने म्हणाला "बसा साहेब"
"किती पैसे घेणार ?" महिनाअखेर होती ......... पुन्हा चाचरतच मी विचारलं
रिक्षावाला चक्क गोड हसला आणि म्हणाला "काय साहेब थट्टा करताय ? मिटर ने होतील तेवढेच दया "

मला चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं
, मी तसाच रिक्षात बसलो, त्याने मिटर टाकलं, मिटरचा आवाज ऐकुन दचकुन मी थोडा  भानावर आलो. गेल्या ४० वर्षात पहिल्यांदाच कल्याणातल्या रिक्षाच्या मिटरचा एवढा गोड आवाज ऐकला होता आणि चालु असलेलं मिटर पण बघितलं होतं.

रिक्षा चालवता चालवता रिक्षावाले साहेब सांगायला लागले
"आता आम्ही प्रवाशांशी सौजन्याने वागायचं ठरवलंय, प्रत्येक रिक्षामधे एक रजिस्टर ठेवलंय त्यात प्रवाशांनी आमची सेवा कशी वाटली त्याबद्दल लिहायचंय, सर्वात चांगली सेवा देणाऱ्या रिक्षाचालकाचा आमच्या युनियनतर्फ़े सत्कार केला जाणार आहे, आम्ही रिक्षा चालवताना शिव्या देणार नाही, गुटखा खाउन पचापचा थुंकणार नाही, फ़ालतु कारणांसाठी प्रवाशांना झोडणार नाही, कुठलंही भाडं नाकारणार नाही, रात्रीची वेळ बघुन प्रवाशांना लुटणार नाही"

रिक्षावाल्या साहेबांचं सौजन्य पाहुन माझ्या डोळ्यासमोर पुन्हा अंधारी यायला लागली तेवढ्यात एकही हादरा बसु न देता रिक्षा स्टेशनला पोचली.

"किती झाले ?" मी पुरता सावरलो नव्हतोच खरं तर
"सतरा रुपए पन्नास पैसे" मी विसची नोट दिली
त्याने अडीच रुपए परत केले, मला पुन्हा गरगरायला लागलं, आज ऑफ़िसमधे सगळ्यांना चहा पाजायचं ठरवुन मी स्टेशनकडे वळलो.

साला...................पुन्हा तेच.......... बायकोने पुन्हा तोंडावर पाणि ओतुन झोपेतुन उठवलं आणि कळायला लागल्यापासुन ( नक्की कितव्या वर्षापासुन कळायला लागलं त्याबद्दल वाद होवु शकतो म्हणुन वर्ष लिहीली नाहीत) उराशी जीवापाड जपलेलं एक स्वप्न पुन्हा मोडलं.

माझ्या स्वप्नाचा चक्काचुर होत असताना "खळ्ळ्ळ फ़टॅटॅटॅक" असा आवाजही आला मंडळी..........


शनिवार, २६ मार्च, २०१६

"TRP" साठी कुठल्याही थराला जाणारा मिडीया


भ्रष्टाचार, काळा पैसा, गुन्हेगारी ह्या समस्या जेवढ्या मोठ्या आहे तेवढीच मोठी समस्या आहे "TRP" साठी कुठल्याही थराला जाणारा मिडीया. त्या कसाबला पण ह्यांच्या समोर उभं केलं असतं तर नुसत्या प्रश्नांनी जीव घेतला असता ह्या लोकांनी त्याचा.............काय असू शकले असते ह्यांचे प्रश्न ?

१. कसाबजी सेंकडों लोगोंको मार कर आपको कैसा लग रहा है ?
२. तुम्हाला तुरुंगात देतात ती बीर्याणी तुम्हाला आवडते का ? बीर्याणी नंतर स्वीटडीश पण देतात का ?
३. पाकिस्तानमधे शाहरुख खान लोकप्रिय आहे की सलमान खान ?
४. तुम्हाला शुक्रवारी फ़ाशी जायला आवडेल की कोणताही दिवस चालेल ?
५. तुरुंगात डास फ़ार आहेत का ?
६. तुरुंगात तुमच्यासाठी शौचालय भारतीय आहे की पाश्चात्य पद्धतीच ? तुम्हाला कोणतं आवडतं
७. तुम्हाला वाटतं का की तुमचा नेमबाजीचा सराव थोडा कमी पडला ?
८. तुम्हाला परत संधी मिळाली तर कमीत कमी किती लोकांना मारु शकाल असं तुम्हाला वाटतं.
९. तुमच्यात पण टारगेट वगैरे असतं का ? तुमचं २००८ चं टारगेट पुर्ण झालं का ? इंसेटीव्ह कीती मिळणार ?

हे प्रश्न ऐकता ऐकता कसाब बेशुद्ध पडला असता  त्याला हॉस्पीटल मधे नेताना त्याने विचारलं असतं "तुमच्याकडे दयामरण देतात का ? असतील तर लगेच मला फ़ाशी दया आणि देत नसतील तर मला पुन्हा तुरुंगात टाका." वाट्टेल ते करा पण पुन्हा मला ह्या लोकांसमोर पुन्हा उभा करु नका."