शुक्रवार, २९ एप्रिल, २०१६

एक बदला अब शुरू हुआ

रात्री साधारण दोन अडीचच्या सुमाराला मोबाईल वाजला......चरफडत आणि डोळे चोळत घेतला .......... एका सख्ख्या मित्राचा फोन होता ..........
.
“अरे झोपला होतास का “.............त्याने विचारलं
“नाही........... मजल्यावरच्या मुक्या गोखले काकू, बहिऱ्या काळे आज्जी आणि मी मिळून आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळतोय .............साल्या ....ही वेळ आहे का फोन करायची ?” मी वैतागून विचारलं
“अरे मी आत्ता अमेरिकेत आहे.........आपल्याकडे किती वाजलेत रे” तो गप्पा मारायला चालूच झाला 
“तू अमेरिकेत आहेस हे सांगायला फोन केला आहेस? की इथे किती वाजलेत हे विचारायला तू रात्री अडीच वाजता फोन केला आहेस ?” मी डोळे चोळत पुढे विचारलं
“अरे एक मस्त बातमी आहे ..........मी इथे जो कोर्स करत होतो ना त्यात पहिला आलोय” त्याने माझ्या कुचकट प्रश्नांकडे दुर्लक्ष करत त्याचंच घोडं पुढे दामटलं
“हो का अरे व्वा...व्वा ...व्वां.. मला सांग ............तू एकटाच होतास की काय ह्या वर्षी त्या कोर्सला ?” मी पण जिद्दीने माझा कुचकटपणा पुढे रेटला
त्याने एक सणसणीत शिवी हासडून बाकी काहीही न बोलता फोन कट केला .........पूर्वी फोन आपटायचे तसे आता मोबाईल आपटत नाहीत सहसा, म्हणून बरं .............नाही तर त्याच्या एका फोनचे चार नक्कीच झाले असते
....
च्यायला एक तर ह्या असल्या स्कॉलर पोरांमुळे आमचं अर्ध आयुष्य “बघ त्याच्याकडे .....शिक काही त्याच्याकडून .....सुधार आता तरी” ………असा उद्धार करून घेण्यात जातं ................ आणि त्यातून हे लोक असे फोन करून स्वतःची कौतुकं सांगून डोक्याची अजून काशी करणार …..
.
मी मोबाईल सायलेंट मोडवर टाकला ...............आणि पुन्हा ताणून दिली .............एक बदला अब शुरू हुआ

गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

मोठ्या लोकांचं ऐकायलाच पाहिजे


वयाने आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या लोकांचं ऐकायलाच पाहिजे प्रत्येकाने .......................त्यांना जास्त कळतं म्हणून नाही पण ...............त्यांनी आयुष्यात आपल्यापेक्षा जास्त माती खाल्लेली असते म्हणून
.
.
हे मुळात कोणी तरी इंग्रजीत सांगितलेलं आहे ...............मी सोप्पं करून सांगितलं ..........मला फार अक्कल आहे म्हणून नाही तर .............माझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये बहुतांश लोक माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत म्हणून

‪#‎idiosyncraciesoflife‬

मंगळवार, २६ एप्रिल, २०१६

“विद्वान” आतापर्यंत करोडपती झाले असते....


कुचकटपणा ............उर्मटपणा ............. माजखोरपणा ........उठसुट लोकांना अक्कल शिकवणं....... ज्याचा त्याचा अपमान करणं.........आणि ज्या विषयातली अक्कल नाही त्यावरही ठासुन मत मांडणं ........
.
ह्या गोष्टी “सेवा” म्हणून लोकांना देऊन त्याचे जर पैसे मिळाले असते ....................तर माझ्यासारखे अनेक फेसबुकी “विद्वान” आतापर्यंत करोडपती झाले असते.

बायका..........

बायका ........बोलण्यात आणि नवऱ्याचा फोन, त्याचं फेसबुक ह्यावर पाळत ठेवण्यात जेवढी शक्ती आणि वेळ घालवतात

............. तेवढी शक्ती आणि वेळ चालण्यात घालवला तर....................

रविवार, २४ एप्रिल, २०१६

आज जरा जास्त झालेली आहे


एखादी व्यक्ती किती हलकट आहे ..........किती नीच आहे हे जगात फक्त तुम्हालाच माहित आहे असं वाटायला लागतं किंवा सगळ्यांना सगळं खूप Easily मिळालंय आणि तुम्हालाच तेवढं खूप जास्त struggle वगैरे करावं लागलंय असं वाटायला लागतं तेव्हा समजून जा ..................
.
.
.
आज जरा जास्त झालेली आहे ............हरामखोर मित्रांच्या “One for the Road” च्या आग्रहाला बळी न पडता ............ दोन पायांनी चालता येतंय तोवर नीट घरी निघा ............आणि घरी गेल्यावर तोंड बंदच ठेवा.......अगदी बायकोवर तुमचं किती प्रेम आहे ते पण सकाळी उठल्यावरच सांगा ............. नाही तर.......... त्यापुढे जे काय “struggle” करावं लागेल ते कुणाला सांगता पण नाही येणार आयुष्यभर .........

मंगळवार, १९ एप्रिल, २०१६

आता Next नंबर तुझाच

कुठल्याही लग्नात ......... नवऱ्या मुलाच्या किंवा मुलीच्या धाकट्या भावंडाना मोठी माणसं चिडवत असतात .............आता Next नंबर तुझाच हां...............

आयला एखाद्या पोराची नाही तर पोरीची सटकली आणि मयताला गेलेले असताना तो किंवा ती ..........सगळ्यांना तसंच म्हणाला तर चालेल का ?????

सोमवार, १८ एप्रिल, २०१६

“ट्रेन मे बाथरूम को कडी लगाने को भूलनेवाले............”


टिळक चौक, पारनाका हे भाग म्हणजे आमच्या कल्याणातले “सदाशिवपेठ” मानले जातात. ह्या भागाबद्दल एक दंतकथा सांगितली जाते. देव म्हणे अक्कल वाटायला निघाला तेव्हा त्याने पारनाक्यापासून सुरुवात केली. गांधी चौक कासारहाट उरकून टिळक चौकात अक्कल वाटल्यावर देवाकडची अक्कल संपली .........त्यामुळे बाकीचं कल्याण “तसंच” राहिलं.
.
ह्या अशा विद्वत्तापूर्ण वातावरणात आमचा एक मित्रही जन्माला आला...........आजच्यापुरतं तात्या म्हणू त्याला आपण. साधारण १९ / २० वर्षांपूर्वी आम्ही ८ /१० मित्र केरळला एका मित्राच्या लग्नाला निघालेलो. आम्ही सगळे तसे समवयस्क म्हणजे विशी बावीशीतले एकदम गब्रू जवान वगैरे. कल्याणला रेल्वेच्या डब्यात शिरल्या शिरल्या प्रत्येकाने नीट Scanning करून झालं.
.
संपूर्ण डब्यात............जरा गारवा वाटेल अशी ......... मोजून एकच “हिरवळ” ...........मग प्रत्येक वेळी जाता येताना ............”जरा हसली काय रे ?”............ “आयला बघत पण नाय जाम आखडू दिसतेय रे”............ “आईशप्पथ कौन सी चक्की का आटा खाती होगी याsssssर” ............”अशी पोरगी पटली तर आपण तर सिगरेट, गुटखा दारू बिरू असल्या गोष्टींना हात पण नाय लावणार” अशा “विधायक” गप्पा चालू झाल्या.
.
आमच्या मित्राला म्हणजे तात्याला मात्र हे सगळं अजिबात मान्य नव्हतं ........म्हणजे त्या हिरवळीचं “असाध्य” असणं पटतच नव्हतं त्याला. “अरे अशा पोरी उलट पटवायला एकदम सोप्प्या असतात” ह्या त्याच्या म्हणण्यावर आमचा तात्या ठाम होता. दरम्यान जेवायची वेळ झाली. बाहेरचं खायला नको म्हणून प्रत्येकाने काही तरी करून आणायचं ठरलेलं. तात्या त्याच्या घरून तिखट मिठाच्या पुऱ्या आणणार होता. सगळ्यांनी डबे उघडले ........... तात्याने पण डबा उघडला ...........पुऱ्याच होत्या पण शेवपुरीसाठी वापरतात तसल्या पुऱ्या...............बोंबला च्यायला आता ट्रेन कुठे थांबणार ? तिथे काय मिळणार ? कारण रात्रीचे ११ वाजलेले. जाम वैतागले सगळे ............पण तात्या ठाम होता ........मी ह्याच पुऱ्या आणतो सांगितलेलं............कसं बसं काही तरी पोटात ढकललं आणि आडवे झालो. पुन्हा हिरवळीचाच विषय चालू............तात्याचं .......”मनात आणलं तर दोन तासात पटवू शकतो ............ती कधीची मला स्माईल देतेय” वगैरे............विद्वत्ताप्रचुर प्रवचन ऐकत एकेकाला झोप लागली
.
सकाळी जसजसे उठलो तसतसे “हलके” होऊन .........ब्रश वगैरे करून पुन्हा एक डोळा “हिरवळीवर” ठेऊन पत्ते, गप्पा चालू झाल्या. तात्यासाहेब उठले आणि बाथरूम मध्ये गेले.......... २ मित्र बाथरूम जवळच्या दारात उभे राहून हवा खात होते .............खरं तर तिथून “हिरवळ” जवळून बघता येत होती म्हणून त्यांना हवा खायची होती.
.
नेमकी तेव्हाच “हिरवळ” उठली आणि घाईघाईने........... आमचे तात्यासाहेब गेलेले त्याच बाथरूमकडे वळली ............. दरवाजातले मित्र काही बोलणार तोवर हिरवळ ........दरवाजा उघडून आत ...........तात्या खाडकन उठून उभाच राहिला ..........
.
ज्या वेगाने ती बाथरूमकडे गेलेली त्याच्या चौपट वेगाने ती जागेवर परत गेली..........तिची काय चूक? .......... रेल्वेतल्या बाथरूमला दोन कड्या असतात एक जी आतून आणि बाहेरून दोन्हीकडून लावता येते ...........आणि दुसरी फक्त आतून लावता येते ती. तात्यासाहेबांनी एकच कडी लावली ती नेमकी बाहेरून उघडणारी .............१० मिनिटांनी मान खाली घालून तात्या आला ........त्या क्षणापासून तात्याचा जो काय band वाजवला सगळ्यांनी. पुढचे ६ दिवस तोंड पण नाही उघडलं तात्याने.
.
मधे बरीच वर्ष गेली तात्या परदेशात पण जाऊन आला नोकरीच्या निमित्ताने. एकदा ट्रेन्सचा प्रॉब्लेम होता खूप. एक एक करत पुन्हा मित्र भेटत गेले. platform वर एक गाडी उभी होती पण खच्चून भरलेली. नेमका आम्हाला तात्या दिसला. काय कसं काय वगैरे गप्पा चालू असताना एका मित्राने तात्याला विचारलं “काय तात्या परदेशात जाऊन आलास ...........मग जीवाची मुंबई केलीस की नाही ............पोरी एकदम free minded असतात ना रे तिकडे ? तात्याची कळी खुलली .........”अरे मग एकदम मज्जा असते तिकडे .........आपण तर फुल्ल्ल टू मज्जा केली” तात्याने त्याचं वाक्य संपवायच्या आत ..........शक्य तेवढा भाबडा चेहेरा करून एकदम प्रेमाने दुसऱ्या मित्राने तात्याला प्रश्न केला
.
.
...........तेव्हा तरी कडी नीट लावलेलीस ना रे ?
.
पेटलेला तात्या ......... .......वेडात मराठे वीर दौडले सात सारख्या आवेशाने .....समोरच्या खच्चून भरलेल्या लोकलमध्ये जीव तोडून घुसला .........लोकल निघून गेली ...........बरीच वर्ष झाली तात्या दिसला नाही ........बहुतेक आम्हाला बघून तात्या रस्ता बदलत असणार
म्हणून म्हणतो ................
.
“ट्रेन मे बाथरूम को कडी लगाने को भूलनेवाले............जगाला अक्कल सिखाया नहीं करते”

सोमवार, ११ एप्रिल, २०१६

IPL ला विरोध कशासाठी ?

70 लाख लिटर पाण्याचा अपव्यय होतो म्हणून काही लोक आणि संस्था महाराष्ट्रात IPL च्या सामन्याना विरोध करताहेत. दबावाला बळी पडून सरकारने खरंच राज्यात IPL ला बंदी घातली तर त्यांच्यासारखे कर्मदरिद्री तेच.

महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी किमान एक कोटी लोक फ्लॅटमध्ये राहतात ? एक व्यक्ति फ़क्त तीनदा घरातला "फ्लश" वापरते असं धरलं तरी किमान 15 कोटी लिटर पाणी फ्लश मध्ये वापरलं जातं असं म्हणता येईल ? नीट नियोजन केलं आणि  दिवसाकाठी ह्यातलं फ़क्त 5% पाणी वाचवता आलं तरी वर्षभरात साधारण 250 कोटी लिटर पाणी वाचू शकेल ?

मुळात पाणी ही समस्या जेवढी मोठी आहे त्यापेक्षा मोठी समस्या आहे पाण्याचं Distribution. मराठवाड्यातला दुष्काळ आजचा नाही बंदी घालायाचीच तर ती तिथल्या राजकारण्यांवर आणि त्यांनी स्वार्थासाठी तिथे उभ्या केलेल्या साखर कारखान्यावर घालावी लागेल.

अनुराग ठाकुर म्हणाले ते खरं मानायचं तर 100 कोटींचा महसुल अपेक्षित आहे राज्याला IPL मधून. सामन्याना विरोध करणाऱ्या लोकांनी खरं तर हा निधी दुष्काळग्रस्त भागासाठी वापरण्यासाठी सरकारवर दबाव आणावा...... किमान 50 खेड़ी सहज कायमची दुष्काळमुक्त होतील एवढ्या पैशात.

"काही लाख लिटर पाण्यासाठी एवढ्या महासुलावर पाणी सोडण्यात काय अर्थ आहे ?"

FYI -  मी क्रिकेटप्रेमी वगैरे अजिबात नाही. गेल्या 5 वर्षात दोनदा "लगान" बघितला आहे ते धरून एकूण पावणे चार सामने बघितले आहेत मी. ढोणी आणि विराट कोहली ( तो पण अनुष्काचा BF म्हणून) एवढे दोनच खेळाडू माहीत आहेत मला आताच्या संघातले

सोमवार, ४ एप्रिल, २०१६

Team Building and Knowledge Sharing


व्यवस्थापन शास्त्रात चांगली Team बनवता येणं आणि त्या Team ची Productivity सतत वाढवत नेणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. फक्त Corporate जगातच नाही पण Team Building चं महत्त्व राजकारण, समाजकारण, खेळ, मनोरंजन अशा प्रत्येक क्षेत्रात तेवढंच मानलं जातं. Team मधल्या आपल्या सहकाऱ्यांना आपण ज्या Project वर काम करतोय त्याची इत्यंभूत माहिती असणं गरजेचं असतं असंही मानलं जातं.



गावी म्हणजे कराडजवळ म्हासोलीला आमचं जुनं घर आहे, घर कसलं मस्त मोठाच्या मोठा वाडा आहे. काका तिथेच राहायचे पूर्वी पण आता नोकरीनिमित्त ते कराडला राहतात. लहानपणी सुट्टीत बऱ्याचदा आम्ही आठ दहा चुलत आणि आत्ते भावंडं, आमच्या गावच्या वाड्यात जमायचो. अख्खा दिवस वाडा डोक्यावर घ्यायचो. वाड्याच्या आतच एक विहीर म्हणजे आड होता, एका काकांचं किराणा सामानाचं दुकान होतं आणि आमचीच पिठाची गिरणी पण होती. कशासाठीच वाड्याच्या बाहेर पडायची गरज नसायची. हां पण त्यावेळी “घर घर मे शौचालय” वगैरे
concept एवढे कोणी seriously घेतलेले नव्हते त्यामुळे सकाळी सकाळी तांब्या घेऊन ...........बाहेर पडायलाच लागायचं.


मॉल्स, रेल्वे स्टेशन्स किंवा ऑफिसेस मध्ये पुरुष आणि महिला प्रसाधनगृह वेगळी असतात तशीच गावाकडे सकाळी “हलकं व्हायला जाण्याचे ठिकाणं पण स्त्रीया आणि पुरूषांसाठी वेगवेगळी असतात. तसे “बोर्ड” लावलेले नसले तरी ते तारतम्य तिथे सगळ्यांकडूनच पाळलं जातं.


आम्ही सगळे भाऊ सकाळी त्या “कार्यक्रमाला” एकत्रच निघायचो. सगळे लहानच असलो तरी त्यातही अगदीच दुसरी तिसरीतले भाऊ म्हणजे कच्चे लिंबू किंवा बच्चे कंपनी आणि आम्ही पाचवी सहावीतले म्हणजे “दादा कंपनी” असायचो. गावाकडे साप भरपूर असायचे आणि सगळ्यात जवळचं हॉस्पिटल साधारण ३० किलोमीटरवर ............रोज सकाळी आपापले तांबे घेऊन निघताना घरातली मोठी माणसं न चुकता दम द्यायची ...........”लांब जाऊ नका .........मस्ती करू नका” वगैरे वगैरे.


आम्ही सगळेच शहरात रहायचो ( कल्याण तेव्हाही म्हणजे ३० /३५ वर्षापूर्वीही शहरच मानलं जायचं )  त्यामुळे “त्या” अवस्थेत कोणी बघेल याची लाज वाटायची ...........मग आम्ही शक्य तेवढं गावापासून लांब जायचो .........मोठी झुडूपं असतील अशा जागा शोधायचो.


त्या दिवशी पण तसंच झालं........खूपच लांबवर गेलेलो आम्ही ........एकमेकांकडे पाठ करून कार्यक्रम उरकतच आला होता तेवढ्यात आमच्यापैकी एकाला साप दिसला ........त्याने “साप साप” म्हणून बोंबलायला सुरुवात केली ............चांगला ४/५ फुट लांबीचा काळाकुट्ट साप आमच्या जवळूनच सळसळत निघून गेला .........भीतीने काहींचा उरलेला “कार्यक्रम” पटकन उरकला .........तर काहींनी आवरता घेतला .........आणि घराकडे पळत सुटलो सगळे. घरी येऊन आम्ही साप बघितला हे सांगण्याची सोय नव्हती कारण मग कुठे बघितला हा प्रश्न आला असता.



इतक्या लांब का गेलात ह्याची विचारणा मोठ्यांकडून, तोडापेक्षा जास्त हाताने किंवा हातात लागेल त्या काठीने अगदीच वेळप्रसंगी पायाने पण झाली असती आणि उत्तरं देता देता पाठ आणि आणि बरंच “काय काय” सोलापटून निघालं असतं. आम्ही सगळ्यांनी घरी तोंडं बंद ठेवायचं ठरवलं........जे कच्चे लिंबू होते त्यांच्याकडून पण “आपण साप बघितला नाही, आपण लांब गेलो नव्हतो” असं दहा दहा वेळा वदवून घेतलं आणि चोरासारखे वाड्यात परतलो.


आम्ही सगळेच जरा गप्पगप्प आहोत हे घरातल्या मोठ्यांच्या लक्षात यायला वेळ नाही लागला .......आम्ही मोठे जेवढे होतो तेवढे बऱ्यापैकी बनेल होतो .........विचारलं गेलं तर मस्त गोल गोल फिरवलं सगळ्या मोठ्यांना ...............पण जसं जरा दमात घेऊन बच्चे कंपनीला विचारायला सुरुवात झाली तसं आमचं धाबं दणाणलं. पहिल्या एक दोन प्रश्नानंतरच त्यांनी बोंबलायला सुरुवात केली “आम्ही साप नाही बघितला ..........आम्ही लांब नव्हतो गेलो.......... “आम्ही साप नाही बघितला ..........आम्ही लांब नव्हतो गेलो” काय समजायचं ते सगळ्या घरात समजलं.


मग जे काय वरात निघाली आम्हा दादा कंपनीची .....................तासभर धुलाई चालू होती ..........सगळे आम्हाला बदडून दमले तेव्हा थांबलं सगळं ............. सालटी निघणं काय असतं ते तेव्हा नीट कळलं.

Team Building पण असंच असतं ना राव ............तुमचे सहकारी नीSSSSSSट विचार करून निवडावे लागतात ..........”कच्चे लिंबू” घ्यावेच लागणार असतील तर चालू Project मध्ये किती “साप” उरलेत ह्या बद्दलचं किती Knowledge Share करायचं हेही विचार करून ठरवावं लागतं नाही तर .........सालटी निघणार हे १००% निश्चित.


रविवार, ३ एप्रिल, २०१६

“देऊळ बंद”



मगाशी झी सिनेमावर “देऊळ बंद” सिनेमा बघत होतो .......छान आहे सिनेमा म्हणून ........मोहन जोशीचं काम तर अप्रतिमच आहे. बाकी काही फारसं मला पटलं नाही पण “सध्या” त्यावर बोलून लगेच ज्वलंत, धर्माभिमानी, धर्मरक्षक लोकांच्या भावना वगैरे खाजवायच्या नाहीयेत.

ह्या सिनेमातलं मला एक कळलं नाही .......स्वामी आधी म्हणतात की “देव जन्म आणि मृत्यूत ढवळाढवळ करू शकत नाही” आणि सिनेमाच्या शेवटी राघववर झाडलेली गोळी स्वतःवर घेतात ......रक्त सांडत सांडत जातात ....... राघवचा जीव वाचवतात .........असं कसं ?

Cinematic Liberty वगैरे थोडंफार मला मान्य आहे पण ही केवळ निर्मात्याच्या किंवा लेखकाच्या Logic मधली चूक आहे की देवाचं महात्म्य ज्यांना कळतं (असं त्यांचं म्हणणं आहे) त्यांच्याही डोक्यात असं काहे confusion आहे?

जाऊ दे मला काय ह्यातलं फारसं कळत नाही तसंही  मी “छोटा भीम” बघणंच जास्त चांगलं..............


बुधवार, ३० मार्च, २०१६

टी.आर.पी. साठी काय पण, कधी पण, कुठे पण ......



ह्या मिडीयाचं म्हणजे कसं झालंय माहितेय का ? आधी स्वतःच आग लावायची ................मग “सबसे पेहले” त्या आगीची “ब्रेकिंग न्यूज” द्यायची .....................मग आग विझवायला सरकारी यंत्रणा कशी चार मिनीटांऐवजी साडेपाच मिनिटात पोहोचली ह्यावर दिवसभर काथ्याकुट करायचा.............पुन्हा संध्याकाळी स्टुडिओत दोन चार “स्वयंघोषित” विद्वान जमा करायचे आणि..................... आग विझवायला दोनशे एकोणपन्नास लिटर पाण्याची आवश्यकता असताना फक्त दोनशे चाळीस लिटर पाणीच वापरून सरकारी यंत्रणेला मूर्ख ठरवायचं किंवा.................... आग विझवताना दोनशे बावन्न लिटर पाणी वापरून सरकारी यंत्रणेने पाण्याचा कसा अपव्यय केला ह्यावर AC स्टुडीओत वांझोटी चर्चा घडवून आणायची.

अगदी अलीकडची त्या कन्हैय्याची केस असेल किंवा त्या कुठल्या तरी साधू बाबाला पडलेलं जमिनीखालच्या खजिन्याचं स्वप्न असेल, काड्या घातल्या त्या मिडीयाने..................सरकारी यंत्रणा पण ह्यांच्या नादाला लागून मुर्खासारखी पावले उचलते आणि हसं करून घेते.

एका गोष्टीचा जरा विचार करून बघा ........ राजकारणी , गुंड किंवा अगदी काही वेळेला मोठे
Businessman सुद्धा उघड उघड एकमेकांच्या विरोधात उभे राहतात ...........आव्हान देतात ....................असं कधी कुठल्या न्यूज चानेलने केलंय का ? ................कधी झी न्यूज ने ए.बी.पी. न्यूजचं स्टिंग ओपेरेशन केलंय का ? कधी जय महाराष्ट्रवाल्यांनी ..........आय.बी.एन. लोकमतचं “भांडाफोड”वगैरे केलंय का ?..........जवळपास प्रत्येक राजकीय पक्षावर ............राजकारणातल्या व्यक्तींवर....................ह्या सुपारीबाज मिडीयाने वाट्टेल ते आरोप लावले.......... पोलिस किंवा इतर सरकारी अधिकारी कसे नालायक आहेत ते आपल्याला सांगितलं, पटवून दिलं ............वाट्टेल तशा बातम्या पसरवल्या पण आजवर कोणत्या तरी प्राईम टाईमच्या चर्चेच्या गुऱ्हाळात ह्या पत्रकारांना ...........आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय का ?

लोकशाहीचा चौथा स्तंभ ...........सशक्त लोकशाही साठी “स्वतंत्र” मिडीयाची कशी गरज आहे वगैरे सगळं मला मान्य आहे .................पण हा असला टी.आर.पी. साठी वाट्टेल त्या थराला जाणारा मिडीया असण्यापेक्षा ..........



उरलेल्या तीन स्तंभांवरच लोकशाही टिकलेली बरी. 

मंगळवार, २९ मार्च, २०१६

रिक्षावाल्या साहेबांचं सौजन्य

रोजच्या प्रमाणे त्या दिवशीही ऑफ़िसला जाण्यासाठी म्हणुन कॉम्प्लेक्स च्या गेटमधुन बाहेर पडलो, समोर बघितलं तर रस्त्याच्या पलीकडे चक्क ४/५ शेअर रिक्षावाले रांगेत उभे होते. कहर म्हणजे टोळकं करून बिड्या ओढत एकत्र न उभे राहता आपापल्या रिक्षात बसून होते.  मी रस्ता क्रॉस करणार तेवढ्यात माझ्यासमोर एक रिकामी रिक्षा थांबली.

रिक्षावाल्याने अदबीने विचारलं "साहेब कुठे जाणार" 
खरं तर आमच्या इथून रिक्षावाले ..........कधीच कुठेच जात नाहीत
मी चाचरत उत्तर दिलं "स्टेशन"
तो पुन्हा तेवढ्याच अदबीने म्हणाला "बसा साहेब"
"किती पैसे घेणार ?" महिनाअखेर होती ......... पुन्हा चाचरतच मी विचारलं
रिक्षावाला चक्क गोड हसला आणि म्हणाला "काय साहेब थट्टा करताय ? मिटर ने होतील तेवढेच दया "

मला चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं
, मी तसाच रिक्षात बसलो, त्याने मिटर टाकलं, मिटरचा आवाज ऐकुन दचकुन मी थोडा  भानावर आलो. गेल्या ४० वर्षात पहिल्यांदाच कल्याणातल्या रिक्षाच्या मिटरचा एवढा गोड आवाज ऐकला होता आणि चालु असलेलं मिटर पण बघितलं होतं.

रिक्षा चालवता चालवता रिक्षावाले साहेब सांगायला लागले
"आता आम्ही प्रवाशांशी सौजन्याने वागायचं ठरवलंय, प्रत्येक रिक्षामधे एक रजिस्टर ठेवलंय त्यात प्रवाशांनी आमची सेवा कशी वाटली त्याबद्दल लिहायचंय, सर्वात चांगली सेवा देणाऱ्या रिक्षाचालकाचा आमच्या युनियनतर्फ़े सत्कार केला जाणार आहे, आम्ही रिक्षा चालवताना शिव्या देणार नाही, गुटखा खाउन पचापचा थुंकणार नाही, फ़ालतु कारणांसाठी प्रवाशांना झोडणार नाही, कुठलंही भाडं नाकारणार नाही, रात्रीची वेळ बघुन प्रवाशांना लुटणार नाही"

रिक्षावाल्या साहेबांचं सौजन्य पाहुन माझ्या डोळ्यासमोर पुन्हा अंधारी यायला लागली तेवढ्यात एकही हादरा बसु न देता रिक्षा स्टेशनला पोचली.

"किती झाले ?" मी पुरता सावरलो नव्हतोच खरं तर
"सतरा रुपए पन्नास पैसे" मी विसची नोट दिली
त्याने अडीच रुपए परत केले, मला पुन्हा गरगरायला लागलं, आज ऑफ़िसमधे सगळ्यांना चहा पाजायचं ठरवुन मी स्टेशनकडे वळलो.

साला...................पुन्हा तेच.......... बायकोने पुन्हा तोंडावर पाणि ओतुन झोपेतुन उठवलं आणि कळायला लागल्यापासुन ( नक्की कितव्या वर्षापासुन कळायला लागलं त्याबद्दल वाद होवु शकतो म्हणुन वर्ष लिहीली नाहीत) उराशी जीवापाड जपलेलं एक स्वप्न पुन्हा मोडलं.

माझ्या स्वप्नाचा चक्काचुर होत असताना "खळ्ळ्ळ फ़टॅटॅटॅक" असा आवाजही आला मंडळी..........


शनिवार, २६ मार्च, २०१६

"TRP" साठी कुठल्याही थराला जाणारा मिडीया


भ्रष्टाचार, काळा पैसा, गुन्हेगारी ह्या समस्या जेवढ्या मोठ्या आहे तेवढीच मोठी समस्या आहे "TRP" साठी कुठल्याही थराला जाणारा मिडीया. त्या कसाबला पण ह्यांच्या समोर उभं केलं असतं तर नुसत्या प्रश्नांनी जीव घेतला असता ह्या लोकांनी त्याचा.............काय असू शकले असते ह्यांचे प्रश्न ?

१. कसाबजी सेंकडों लोगोंको मार कर आपको कैसा लग रहा है ?
२. तुम्हाला तुरुंगात देतात ती बीर्याणी तुम्हाला आवडते का ? बीर्याणी नंतर स्वीटडीश पण देतात का ?
३. पाकिस्तानमधे शाहरुख खान लोकप्रिय आहे की सलमान खान ?
४. तुम्हाला शुक्रवारी फ़ाशी जायला आवडेल की कोणताही दिवस चालेल ?
५. तुरुंगात डास फ़ार आहेत का ?
६. तुरुंगात तुमच्यासाठी शौचालय भारतीय आहे की पाश्चात्य पद्धतीच ? तुम्हाला कोणतं आवडतं
७. तुम्हाला वाटतं का की तुमचा नेमबाजीचा सराव थोडा कमी पडला ?
८. तुम्हाला परत संधी मिळाली तर कमीत कमी किती लोकांना मारु शकाल असं तुम्हाला वाटतं.
९. तुमच्यात पण टारगेट वगैरे असतं का ? तुमचं २००८ चं टारगेट पुर्ण झालं का ? इंसेटीव्ह कीती मिळणार ?

हे प्रश्न ऐकता ऐकता कसाब बेशुद्ध पडला असता  त्याला हॉस्पीटल मधे नेताना त्याने विचारलं असतं "तुमच्याकडे दयामरण देतात का ? असतील तर लगेच मला फ़ाशी दया आणि देत नसतील तर मला पुन्हा तुरुंगात टाका." वाट्टेल ते करा पण पुन्हा मला ह्या लोकांसमोर पुन्हा उभा करु नका."

मंगळवार, २२ मार्च, २०१६

Don’t try temporary solutions

प्रत्येक मोठ्या कंपनीत HR Department असतं. त्या कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक Employee ची productivity जास्तीत जास्त राहील ( कमीत कमी पैशात ) हे बघणं ह्या Department चं मुख्य काम असतं. ह्या HR Department कडून वेळोवेळी Training पण घेतली जातात.

मी काही कधी कुठल्या मोठ्या कंपनीत काम केलं नाही ( मला घेतलं नाही कोणी ) पण अशी
Training खिशातले पैसे भरून पण Attend करता येतात. मला सवय होती, अशा ट्रेनिंगला जाऊन आलो की त्याचं एक छोटसं presentation बनवून ठेवायचं. सहज जुनी presentations बघताना एक presentation पुन्हा बघितलं. ह्या ट्रेनिंग मध्ये शिकवलं गेलेलं की कोणत्याही प्रॉब्लेमच्या मुळाशी जा “Don’t try temporary solutions, go to the Root cause” .........अजून पण बरंच काही “तत्त्वज्ञान” शिकवलेलं.
माझं आजोळ सांगली जिल्ह्यातलं विटा. गोष्टीत असायची तशीच मामाची छान शेती, शेतातलं घर, बारमाही पाणी असलेल्या विहिरी आणि अतोनात जीव लावणारे मामा मामी. साधारण एकाच वयातल्या मावस बहिणी, मामे भाऊ, बहिणी सगळी मिळून आम्ही १२/१५ भावंडं सुट्टी लागली कि गावाला पळत सुटायचो. अख्खा दिवस नुसता धुडगूस असायचा.

पाणी मुबलक होतं त्यामुळे उन्हाळ्यात पण थोडी फार शेती व्हायची. आंबे, काकडी, बोरं, पेरू, भुईमुग अशा गोष्टींवर आमची आधाशी नजर जेवढी असायची तेवढीच पाखरांची आणि माकडांच्या टोळ्यांची पण असायची. शेतातलं घर त्यातल्या त्यात उंचावर होतं त्यामुळे शेतात माकडं शिरलेली घरातून पण दिसायचं.

माकडांची टोळी शेतात शिरलेली दिसली की आमच्या अंगात वारं शिरायचं. मोठ्या काठ्या नाचवत मोठ मोठ्याने पत्र्याचे डबे आणि तोंडं वाजवत आम्ही माकडांच्या दिशेने पळत सुटायचो. सोबतीला मामाने पाळलेली दांडगट आक्राळ विक्राळ कुत्री पण असायची. हाताला लागतील ते दगड, मातीची ढेकळं आम्ही माकडांवर भिरकावायचो.

१२ /१५ किंचाळणारी पोरं, हातातल्या काठ्या, कर्कश्य वाजणारे डबे आणि नुसत्या भुंकण्याने मळा दणाणून सोडणारी कुत्री. माकडं धूम पळत सुटायची. मळ्याच्या हद्दीपर्यत मग हा चोरपोलिस खेळ चालायचा ........आम्ही शिकार करून आल्याच्या आवेशात परत फिरायचो.


एके दिवशी संध्याकाळच्या वेळी अशीच माकडं शेतात घुसलेली दिसली. विचार करायची सवय तेव्हाही नव्हती. मी आणि माझ्या बरोबरचे माझे दोघे मामेभाऊ असे आम्ही तिघेच आरडा ओरडा करत पळत सुटलो. हे लक्षातच नव्हतं की त्या वेळी मळ्यात फक्त आम्ही तिघेच होतो. अगदी कुत्री पण घरातल्या बाकीच्यांच्या बरोबर लांबवर हिंडायला गेलेली. नेहेमीप्रमाणे आरडाओरडा करत दगड भिरकावायला सुरुवात केली. माकडं पटकन दाद देईनात. आम्ही खूपच आरडाओरडा करतोय हे बघून त्यांनी काढता पाय घेतला. आम्हाला अजून अवसान चढलं आणि आम्ही त्या नादात कोरड्या ओढ्यातून दगड मारत त्या टोळीच्या मागे पळत सुटलो. मळ्यापासून लांब आल्याचं आमच्या आधी माकडांना कळलं आणि त्यांच्या पाठोपाठ मला कळलं.

काही क्षणात बाजी पलटली ...........काही क्षणांपूर्वी माकडं पुढे आणि आम्ही मागे धावत होतो ........आता आम्ही पुढे आणि दात विचकत किंचाळणारी माकडं आमच्या मागे लागलेली. अर्थातच  बाकीच्या दोघांचं काय झालं ते बघायला सुचलंच नाही.

जीव खाऊन मळ्याकडे पळत सुटलो. प्रत्येकाला ठेचा लागल्या, गुढगे फुटले, कोपरं सोलपटली, माकडांनी “कुठे कुठे” बोचकारलं.........मळ्यात शिरून घराजवळ पोचलो तेव्हा कुठे माकडं परत फिरली. लागल्याचं दुःख होतं पण “जान बची तो लाखो पाये” हे तेव्हाही कळत होतं.

त्या AC हॉल मध्ये पैसे घेऊन Training द्यायला, “
Don’t try temporary solutions, go to the Root cause always” हे घोकून घ्यायला तुमचं काय जातंय राव “ज्याचं सोलापटतं त्याला कळतं”

माकडांसारख्या उपद्रवी प्रॉब्लेम्सच्या मागे जरूर लागा पण त्या आधी उपलब्ध साधनसामुग्री नीट तपासून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची “हद्द” सोडू नका कारण तुम्हीच खाजवून ओढवून घेतलेला “प्रॉब्लेम” जर का तुमच्या मागे लागला तर ...........
.
.
कायम मळ्यात परतायला वेळ मिळेलच असं नाही. 

बुधवार, १६ मार्च, २०१६

लस्ट फॉर लालबाग - विश्वास पाटील



मुळात मी विश्वास पाटलांच्या लिहीण्याचा कट्टर भक्त, सर्वात पहिली कादंबरी वाचली ती झाडाझडती. मग व्यसनच लागलं पाटलांच्या लिहीण्याचं. चंद्रमुखी, पानिपत, पांगिरा, महानायक , संभाजी, नाना पाटलांवरचं क्रांतीसुर्य, रणांगण अशी जवळपास सगळीच पुस्तकं आधाशासारखी वाचून काढली.
बरेच दिवस येणार येणार ऐकलेलं लस्ट फॉर लालबाग हातात पडेपर्यंत जीव वरखाली होत होता. पुस्तक वाचायला घेतलं...... जसजसं पुस्तक वाचून होत गेलं तसतसा मी मात्र पुस्तकापासून Disconnect होत गेलो. काही तरी चुकतंय असं वाटत राहिलं. इच्छा होत नव्हती तरीही शेवटपर्यंत वाचून काढलं.


Normally चांगल्या कादंबरीवरून चित्रपट काढला जातो पण पुस्तक वाचताना सतत कुठे तरी असं वाटत राहिलं की कुठल्या तरी “मसाला” चित्रपटावरून ही कादंबरी लिहीली आहे. गिरणी कामगार .......बंद पडत चाललेल्या गिरण्या .......दत्ता सामंतांनी कामागारांसाठी दिलेली झुंज .......त्याच वेळी गुन्हेगारी विश्वाचा मुंबापुरीवर वाढत चाललेला प्रभाव ............आणि चोरावर मोर असलेले राजकारणी........त्यातच नायकाची प्रेमकथा ........तत्त्वासाठी झगडणारा त्याचा बाप .............आणि मग कलाटणी देणारा ........अनपेक्षित शेवट.... हे सगळं सगळं आहे कादंबरीत

वास्तव चित्रपटातला संजय दत्त सापडला कादंबरीत, जागोजागी दिवार मधला अमिताभ सापडला,“अपहरण” चित्रपटातला अजय देवगणचा बाप सापडला कादंबरीत, वास्तव मधलीच रिमा लागू पण सापडली .........फक्त माझ्यासाठी “ग्रेट” असलेले विश्वास पाटील मात्र शेवटपर्यंत नाही सापडले मला कादंबरीत.

त्यांच्या आधीच्या लिखाणामुळे माझ्याच अपेक्षा मी खूप वाढवून ठेवलेल्या असतील किंवा असंही असेल की मला कादंबरी कळलीच नाहीये. 

मंगळवार, १५ मार्च, २०१६

जाट - पटेल - मराठा आरक्षण


अलिकडे जाट समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी उग्र आंदोलन केलं. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर प्रचंड परिणाम तर झालाच पण जाळपोळ आणि लुटमारीसारख्या प्रकारांबरोबरच बलात्कारासारखे हीन प्रकार पण झाले. मुळात जाट समाज असेल, गुजराथ मधला पटेल समाज असेल किंवा महाराष्ट्रातला मराठा समाज असेल, यांना आरक्षण देताना “राजकीय अपरिहार्यता” हा एकच निकष लागू होतो. रस्त्यावर उतरून, जाळपोळ करून आरक्षण मागणारे पण तेच आणि मंत्रालयातल्या गुबगुबीत खुर्चीत बसून “देणारे” पण तेच.फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाबद्दल बोलायचं झालं तर ही आकडेवारी खूप बोलकी आहे
  1. महाराष्ट्रातल्या ५०% पेक्षा जास्त जमिनीची मालकी मराठा समाजाकडे आहे.
  2. महत्त्वाच्या १०५ पैकी ८६ साखर कारखाने मराठा समाजाच्या ताब्यात आहेत. साखर कारखाने ताब्यात असणं म्हणजे किती ताकद असते हे शेतकरीच जास्त चांगलं सांगू शकतील. 
  3. महाराष्ट्रातल्या ५४% शैक्षणिक संस्था मराठा समाजाच्या ताब्यात आहेत. 
  4. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून म्हणजे साधारण १९६२ पासून आजवर सातत्याने ५५% आमदार विधानसभेत बसले आहेत.
  5. आजवर १७ पैकी १२ मुख्यमंत्री मराठा समाजातले होते.
कोणाच्या दबावाला किती बळी पडायचं हे जरी सरकारच्या हातात असलं तरी शेवटी त्यात नुकसान खुर्च्या उबवत बसलेल्या राजकारण्यांचं नाही. ज्या गोष्टीची ह्या राजकारण्यांच्या पुढच्या १५/२० पिढ्यांना गरज पडायची गरज नाही ते देऊन टाकायला ह्यांचं काय जातंय.दुःख म्हातारी मेल्याचं पण आहे आणि काळ सोकावातोय त्याचं पण आहे.

http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/3415/12/12_chapter%207.pdf





रविवार, १३ मार्च, २०१६

ब्रेकिंग न्यूज ............


दोन तीन दिवसांपूर्वी कल्याणात मध्यरात्री कधी तरी एक रिक्षा जाळण्यात आली ...........झालं ....लगेच ब्रेकिंग न्यूजला चटावलेले पत्रकार कामाला लागले आणि राजसाहेबांवर खापर फोडून मोकळे झाले. त्यातल्या त्यात जनाची नाही तर मनाची लाज बाळगून काहींनी बातमी देताना एक प्रश्नचिन्ह मात्र आठवणीने टाकलं.
मध्यरात्री गाड्या जाळण्याचे प्रकार ह्या पूर्वी झालेले नाहीत का ? कोणी तरी विकृत व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट हे प्रकार गेली अनेक वर्ष करतो आहे हे सगळ्यांनाच माहित आहे..........नशीब त्यामागे पण मनसेच आहे असा "सनसनीखेज" वगैरे खुलासा नाही केला ह्या विद्वान पत्रकारांनी.

मनसे असेल किंवा कोणतेही इतर राजकीय पक्ष असतील जी काही आंदोलने करायची ती उघडपणे करतात .......लपून छपून तुमची ती “स्टिंग ऑपरेशन” केली जातात आंदोलने नाहीत हे तुम्हाला समजायला काहीच हरकत नव्हती.

कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षांनी काय आदेश दिलाय आणि तो कधी पाळायचा आहे हे जेवढं त्यांच्या कार्यकर्त्यांना कळतं तेवढंच जनतेलाही कळतं .........उगाच ब्रेकिंग न्यूजच्या पुड्या सोडून आणि जनतेची दिशाभुल करून तुम्ही तुमची TRP ची पोळी कशाला भाजून घेताय ?

चला असं धरून चालू की राजसाहेबांनी केलेलं भाषण प्रक्षोभक होतं TRP खेचण्यासाठी होतं, पण त्याचा आणि एका निरपराध मराठी माणसाची रिक्षा जाळण्याचा संबंध कसा काय लावू शकता तुम्ही? त्या भाषणाबद्दल तुम्ही लिहा ..........तो तुमचा अधिकार आहे ........टीका करा तोही तुमचा अधिकार आहे........पण न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरू नका .......ते तुमच्या मर्यादेचं उल्लंघन आहे.

“नागरीकांकडून अमुक भावना व्यक्त होत आहे” किंवा “नागरिक रोष व्यक्त” करत आहेत अशी विधानं जेव्हा तुम्ही तुमच्या बातमीत छापता तेव्हा किती नागरीकांना खरंच विचारता ? त्यातले ते “नागरिक” म्हणजे निव्वळ तुमचे आश्रयदाते असतात हे आता सगळ्यांनाच कळायला लागलंय.

राज साहेब काय बोलले आणि बोलले ते बरोबर की चूक हा माझ्या ह्या लेखाचा विषय नाही. जी बातमी तुम्ही देताय ती बातमी फक्त द्या, त्याचा अर्थ लावायचं काम तुमचे वाचक करतील. अर्थ लावायची अक्कल त्यांना आहे असं गृहीत धरायला काय हरकत आहे?. त्या बातमीचा तुम्हाला लागलेला अर्थ पण छापा पण तो अर्थ नागरिकांच्या नावावर खपवू नका.

गेल्या पंचवीस वर्षात मी जेवढे राजकारणी जवळून बघितलेत तेवढेच पत्रकार देखील बघितलेत. ज्यांच्या वृत्तपत्राचं नाव पण कधी ऐकलेलं नसतं, जे अख्खा दिवस महापालिकेत पडीक असतात त्यांचा चरितार्थ त्या २/४ हजार खप असलेल्या वृत्तपत्राच्या नोकरीतून कसा भागतो हा प्रश्न सामान्य नागरीकांना पडू शकतो ........मला नाही.
नगरसेवकांच्या १५ / २० फुट लांबीच्या गटाराच्या कामाच्या भूमीपूजनाच्या बातमीसाठी पण रांगेत उभं राहून पाच पाचशे रुपयांची पाकिटं घेणारे पत्रकार बघितलेत मी. ज्याला त्याला नैतिकतेचे धडे देण्याचा अधिकार दिला कोणी ह्या पत्रकारांना ? राजकारणी देतात म्हणून आम्ही घेतो असं तुमचं म्हणणं असू शकेल पण तृम्ही घेता म्हणून राजकारणी देतात ही वस्तुस्थिती आहे.

मुळात हल्ली पत्रकारांनी राजकारण्याना तत्त्वनिष्ठा वगैरे शिकवणं म्हणजे मल्लिका शेरावतने सनी लीओनी ला पावित्र्यावर प्रवचन देण्यासारखं वाटतं मला.

हे मी जे काही लिहीलंय त्यातून मला कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला योग्य ठरवायचं नाहीये...... पण हो .....ब्रेकिंग न्यूजला चटावलेल्या पत्रकारांच्या बुद्धीमत्तेबदल आणि नीतीमत्तेबद्दल निश्चित प्रश्नचिन्ह उभं करायचं आहे.

मंगळवार, ८ मार्च, २०१६

जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिनाचं औचित्य साधुन मी जाहिर करतो की ......माझ्या परिचयातल्या बहुतांश बायका / मूली ह्या.......अत्यंत .........शिष्ठ........ भांडकुदळ...…....पैशाला चिकट........मारकुट्या...... .मठ्ठ....... .आळशी.......दिवसभर सेल्फ़ी काढत T P करणाऱ्या........ किंवा WA आणि फेसबुकवर पडिक असणाऱ्या ......कुचकट ........ वगैरे नाहीत हे मला (आजच्यापुरतं तरी) मान्य आहे.

एक जात सगळ्यां सुस्वभावी ....... बुद्धिमान ......समजुतदार.......प्रेमळ..........मितभाषी.......समजुतदार आहेत अशी मला ...........शंका आहे

इथे जर "चुकून" कोणाच्या अवगुणांचा उल्लेख झाला असेल तर निव्वळ योगायोग समजावा ही विनंती

साधासुधा
महेंद्र कुलकर्णी

शनिवार, ५ मार्च, २०१६

मोबाइलकुमार आणि मोबाइलकुमारी

आज संध्याकाळी कल्याण रेलवे स्टेशनच्या बाहेर बसलेल्या फेरीवाल्यांचं सामानसुमान जप्त करून महानगरपालिकेच्या गाडीत भरुन नेते होते......

थोडंसं पुढे एस टी स्टॅंड च्या समोर चार चार रांगा करून ....80% रस्ता अडवून रिक्षा उभ्या केल्या जातात ...... ह्या रिक्षा आणि टोळकी करून बिड्या ओढ़त आजुबाजूला उभे असलेले रिक्षा चालक पण त्याच गाडीत भरून नेता नाहीत का येणार ? रहदारीची कोंडी तरी कमी होईल

जाता जाता रस्त्याच्या माधोमध चालताना मोबाइलवर बोलत किंवा कानात बुचं घालून गाणी ऐकत बागडणारे दहा पंधरा मोबाइलकुमार आणि मोबाइलकुमारी पण त्याच गाडीत भरून न्यायला हरकत नाही

गुरुवार, ३ मार्च, २०१६

व्यवहारज्ञान.........आणि समयसूचकता



गेली दहा वर्ष “पूर्णवेळ” व्यवसाय करूनही काही गोष्टी मला आत्मसात करता आलेल्या नाहीत. कदाचित “गाणं” जसं रक्तात असावं लागतं तशाच ह्या गोष्टी रक्तात असाव्या लागतात.
साधारण १० / १२ वर्षापुर्वीची गोष्ट आहे. मी नविनच मोटरसायकल घेतलेली. तेव्हा ऑफिस चर्नी रोडला  म्हणजे गिरगावात होतं. कल्याणपासून by road अंतर होतं ६० किलोमीटर. तरीही आठवड्यातून चार दिवस मी मोटरसायकल घेऊन ऑफिसला जायचो. कल्याणला राहणारे आणि माझ्यासारखेच किडे असणारे काही मित्र जाता येताना बरोबर असायचे.

इम्रान नावाचा माझा एक मित्र म्हणजे अस्सल नमुना.... बऱ्याचदा इम्रानच माझ्या बरोबर असायचा. त्याचं ऑफिस तेव्हा नरीमन पॉइंटला होतं. संध्याकाळी निघताना एकमेकांना फोन करायचा आणि मी त्याला सी.एस.टी. स्टेशनच्या समोरून pickup करायचं असं आमचं ठरलेलं असायचं.

त्या दिवशीही तसंच त्याला घेतलं आणि भायखळ्याला पोचलो तेव्हा आठवलं, एका मित्राच्या मुलाने क्रिकेट साठी जे सीझनचे बॉल  लागतात ते आणायला सांगितलेले. हे बॉल मिळतात अहमदाबाद स्पोर्ट्स नावाच्या दुकानात मेट्रोजवळ. म्हणजे पुन्हा ट्राफिक मधून रांगत भायखळा ते मेट्रो उलटं जावं लागणार होतं, साधारण ८ किलो मीटर. बॉल नेले नसते तर मित्राच्या लेकाने क्रिकेटची Bat डोक्यात घालायची खूप शक्यता होती.

परत फिरावं लागणार हे इम्रानला सांगितलं, त्याची काहीच हरकत नव्हती. तेवढ्यात समोर यु टर्न मारायला जागा दिसली पण........... तिथे यु टर्न चालणार नसल्याची पाटी होती. पुढे जायला लागणार होतं. मी विचार करत होतो, पुढे लवकर यु टर्न मारता येण्याची शक्यता कमी होती.

“भाई तू मार यु टर्न कूछ नहीं होगा” इम्रानने “ग्यारंटी” दिली. मी पटकन त्या पाटीकडे दुर्लक्ष करत यु टर्न मारला..........आणि .......रस्त्याकडेच्या झाडाआडून बरोबार .......पोलिसमामा दत्त म्हणून समोर अवतरले.

हो.... नाही .....पाटी दिसलीच नाही .......खूप अर्जंट काम आहे .......वगैरे वगैरे सांगून झालं ............शेवटी मामा शंभरवरून पन्नास रुपयात सोडायला तयार झाले. मी पैसे दिले मामा दुसरा बकरा शोधायला झाडामागे चाललेच होते.

“ओ साब एक मिनिट इधर आओ” इम्रानने हाक मारली ....माझ्या पोटात गोळा आला, आता हा बाबा वाद घालतो की काय म्हणून. तोवर मामा जवळ आले
“मेरेको बीस रुपये दो वो पचास मे से” इम्रानने मामांना सांगितलं. मामांच्या आणि माझ्याही चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं इम्रानच पुढे बोलला......
“मैने इसको बोला यु टर्न मारनेको इस के लिये इसने यु टर्न मारा............मेरी वजह से आप को पचास मिला तो उसमेसे मेरेको भी मिलना चाहिये ना साब” शक्य तेवढ्या निरागस आवाजात इम्रान बोलला............मी गाडी stand वर लावून हसत सुटलो ...........मामांना काय बोलावं तेच सुचलं नाही ...........हसत हसत त्यांनी माझी ५० ची नोट इम्रानच्या हातावर ठेवली आणि हसत हसतच जायची खूण केली (मनातल्या मनात साष्टांग नमस्कार पण घातला असणार)

आम्ही अहमदाबाद स्पोर्ट्स मधे गेलो मग कल्याण कडे निघालो. आता हा माझे माझे पन्नास परत करणार की स्वतःकडेच ठेवणार ह्याचा विचार करत आम्ही कल्याणला पोचलो. इम्रानच्या घराजवळ सोडल्यावर पठ्ठ्या सरळ चालू पडला. म्हटलं च्यायला गेले पन्नास.....जाऊ दे गेलेलेच होते. पण मग थोडा विचार करून इम्रानला आवाज दिला

“इम्रान यार इधर आ.........साले तेरेको शरम नहीं आती ? सी.एस.टी. से यहां तक मेरे गाडी पे आरामसे बैठ के आया ....पेट्रोल का आधा पैसा तो दे” त्याच्या कडून जे व्यवहारज्ञान शिकलो ते मी त्याच्यावरच वापरलं.

“भाई देने के लिये तो मै आधा क्युं पुरा पैसा दे दु .....लेकीन अगर किसी को येह समझा तो तेरी क्या इज्जत रहेगी ? लोग सोचेंगे तू मेरे लिये रिक्षा चला रहा है .......यार तू इतना बडा आदमी .....येह अच्छा दिखेगा क्या ?
मगासच्याच निरागस आवाजात ......चेहेऱ्यावर तेवढीच निरागसता ओतून इम्रानने उत्तर दिलं
च्यायला आला का “इज्जत का सवाल” त्यात आणि “बडा आदमी” वालं चोकलेट.............मी काही विचार करून उत्तर देईपर्यंत “इम्रान भाईनी” त्यांच्या बिल्डींगच्या पायऱ्या चढायला सुरुवात पण केली.

आजतागायत ना ते पन्नास रुपये आणि पेट्रोलचे अर्धे पैसे त्याने मला देऊ केले ना मी मागायच्या फंदात पडलो .........ज्या गुरुकडून जे शिकतो ते त्याच्यावर वापरायचं नाही एवढं मात्र शिकलो.

म्हणून मला मनापासून वाटतं व्यवहारज्ञान .........आणि समयसूचकता ह्या गोष्टी रक्तातच असाव्या लागतात कोणी तरी शिकवून त्या येत नाहीत.


शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

भाजपची देशभक्ती

भाजपने सोशल मिडीयावर देशभक्ती शिकवत फिरणारं त्यांचं श्वानपथक आवरायला तरी हवं किंवा त्यांना देशभक्तीची Certificates विकणारं वेगळ दूकान तरी काढून दयायला हवं.

काश्मीर मध्ये ते अब्दुल्ला बापलेक आणि पीड़ीपी हे दोन्ही पक्ष "कुंपणावरचेच" आहेत की मग तिथे तुम्ही काहीही "राजकीय तडजोडी" केल्या ते चाललंच ना ?

मी जे दुकान काढून Certificates विकायचं सुचवतोय त्यातही बरेच पर्याय आहेत. म्हणजे 

"अट्टल देशभक्त" ....
"कुंपणावरचा देशभक्त" ....
"प्रादेशिक देशभक्त....
"धर्मनिरपेक्ष देशभक्त"...
"हिंदुत्ववादी देशभक्त"
"मुस्लिम देशकभक्त".....
"जेमतेम देशभक्त"  ....
दुकानदारी काही भाजपसाठी नविन किंवा अशक्य गोष्ट नाही. त्यातून आता आमिर खान सारखा "अट्टल देशभक्त" पण आहेच हाताशी ..... सलमान पण सुटलाच आहे.
मस्त प्रमोशन करतील दुकानाचं ....... अजिबात पैसे न घेता.

बाबांनो देशाच्या नाशिबाने कधी नव्हे ते मोदींसारखं कणखर  नेतृत्व ह्या देशाला मिळालंय. ते जे काही करताहेत ते लोकांपर्यम्त पोचवण्यासाठी तुमची विद्वत्ता आणि वेळ खर्ची घाला.

तुमची अक्कल पाजळुन जो तरुण वर्ग मोदींच्या पाठीशी उभा राहतोय त्यांना संभ्रमित करू नका ....... ह्या तरुणाईला तुम्ही केलेल्या देशभक्तीच्या सगळ्याच व्याख्या कळतील आणि पटतील असं गृहीत धरु नका.
तुम्हाला काय तुमच्या व्याख्या नाही पटल्या तर तुम्ही ह्या तरुणाईला पटकन देशद्रोही ठरवून मोकळे व्हाल पण मग राजकारण्यासारखी हे शिक्के सहन करण्याएवढी निगरगट्टता ह्या तरुणाईत असेलच असं नाही.

ते दुकानाचं मात्र बघाच........ असंख्य बेरोजगार विद्वानांना ..... रोजगार तरी उपलब्ध होईल .......

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

डेव्हिड हेडली........इशरत जहां........मुंब्रा हृदयसम्राट




डेव्हिड हेडली जे सांगतोय ते खरं मानून आपण जर पाकिस्तानला आणि आय एस आय ला २६/११ साठी जबाबदार धरणार असू तर त्या इशरत जहां साठी गळे काढणाऱ्या तमाम "धर्मनिरपेक्ष" वगैरे महात्म्याना "देशद्रोही" ठरवून त्यांच्यावर पण खटले भरायला हवेत

सगळ्यात आधी तर इशरतला शहीद ठरवून तिचं वकीलपत्र घेतलेल्या त्या "मुंब्रा हृदयसम्राटाला" उचलून जेल मध्ये टाकायला हवं .........पाच लाख दिलेले ना तिच्या कुटुंबाला ?
एका ठराविक धर्माच्या बदनामी साठी भाजपच हे सगळं त्या हेडली कडून वदवून घेतंय असंही एका "विद्वानाने" म्हटलंय ......

बरं झालं ते दिग्बीजय सिंग अजून "हनिमून" मध्ये व्यस्त आहेत नाही तर म्हणाले असते ....... "हेडली अतिरेकी नव्हताच तो तर "संघाचा" माणूस आहे .....आणि अमेरिकेतून नाही .........संघाच्या नागपूरच्या मुख्यालयात बसून तो साक्ष देतोय .........."

येड्याचा आणि बाजार साला

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

महिला आणि शनि बघतिल ना काय ते ...

प्रत्यक्ष शनिदेवापेक्षा त्याची बडवेगिरी करण्यात धन्यता मानणारेच महिलांच्या मंदिर प्रवेशाने धास्तावलेत
महिला आणि शनि बघतिल ना काय ते ... तुम्ही कशाला रक्त आटवताय ?

आणि दुसऱ्या धर्माची उदाहरणं कशाला देताय?

स्टेशन बाहेर रिक्शावाले कुठे जायचंय विचारतात .... आपण सांगितलं की पुढच्या रिक्षाकडे बोट दाखवतात .....मग तो रिक्शावाला पुन्हा त्याच्या पुढच्या रिक्षाकडे बोट दाखवतो....मग पुन्हा....

भाऊ तुम्ही तुमचं बोला ना काय ते उगाच लोकांचे दरगे कशाला दाखवताय

महिलांनी शनीदेवाची पूजा केल्याने ज्या कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार असतील त्यांनी खरं तर ताबडतोब काळे सफारी सूट घालून शनी देवाची "बाउन्सरगिरी" करायला शनी शिंगणापूरला पळत सुटायला हवं.
उगाच सोशल मिडीयावर लिहीत बसून सुशिक्षित असल्याचा आव आणण्यात काय अर्थ आहे ?

शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

मालक


आपण सगळे कळपातली
मेंढरं झालो आहोत
युगानुयुगे चाबकाच्या इशा-यावर
चालत आलो आहोत

चाबुक तोच असतो
पण बदल होतो हातांचा
चाबुक खरं झेंडा असतो
बेगडी, पोकळ ध्येयवादाचा

चाबकाच्या एका इशा-यावर
कधी हिंस्त्र पशु होतो
कधी एकमेकांना डसणारे
काळे विषारी साप होतो

झडतात आपली बोटं
अजिंठा, खजुराहो घडविणारी
मग फ़ुटते हातालाच एक मशाल
निरपराध घरं जाळणारी

सगळ्या कळपांच्या सगळ्या मालकांना
हेच तर हवं असतं
मानवतेच्या प्रेतांचा जाळ करुन
त्यांना शेकत बसायचं असतं

सगळ्या कळपांचे सगळे मालक
कधीकधी एकत्र जमतात
वेळ घालवायला मालक
मस्त रमीचा डाव मांडतात

सत्तेचा आणि संपत्तीचा
ट्रायो बनवताना
छोटया मालकांचे
लाचार जोकर होतात

नको असलेले,तत्त्वांचे पत्ते
मालक खुशाल फ़ेकुन देतात
नवी गणितं नवे सिक्वेन्स
पुन्हा नव्याने जुळवत राहतात

आपण असतो कोंडलेले,
कळपाभोवतीच्या कुंपणात
झुंजतो आपण दुस-या कळपाशी
किंवा लढतो आपापसात

बंड वगैरे कर्मदरिद्री विचार
दाबून टाकतो मुर्खपणा मानून
रोज थोडं थोडं मरत राहतो
आतल्या आत सडून

जाणवतंय तुम्हाला ह्यातलं काही ?
पटतंय माझं म्हणणं की पटायचंय ?
आता "वा" किंवा "छान" म्हणुन
पटकन आपल्या कळपात परतायचंय ?...... आता "वा" किंवा "छान" म्हणुन पटकन आपल्या कळपात परतायचंय ?

रविवार, ३१ जानेवारी, २०१६

पुणं बदललंय ?

पुणं हल्ली खुप बदललंय .... कालपासून बघतोय ..... काल हॉटेल मध्ये जेवायला गेलो तर वेटर अदबींने बोलत होते

सकाळी 8 वाजता खाली उतरलो तर चक्क वाण्याचं दूकान उघडलेलं होतं

मला जाम चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं

सकाळी मिसळ खायची होती AvanTea Mehta ला विचारल, तिने काटा किरर् म्हणून एक ठिकाण सुचवलं ... आणि आत गेल्या गेल्या ही पाटी बघुन जीव भांड्यात पडला.

एक मिसळ दोघात खायची असेल तर 20 रूपए Extra भरावे लागतील ही धमकीवजा सूचना वाचून आपण पुण्यातच असल्याची खात्री पटली

मिसळ पण पाटी वरच्या धमकीपेक्षा तिखट ...पण तितकीच "सही"

रविवार, १० जानेवारी, २०१६

मुख्यमंत्री साहेब ........






प्रति.
मा.श्री देवेंद्रजी फडणविस,
मुख्यमंत्री – महाराष्ट्र
महोदय,
विषय – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात होत असलेल्या रस्ता रुंदीकरणाबाबत
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या दरम्यान आपण ह्या महानगरपालिका क्षेत्राच्या विकासासाठी हजारो कोटींचे “Package” जाहीर केलेले आहे. दिलेल्या शब्दाला आपण जागाल ह्या बद्दल आम्हा नागरीकांच्या मनात कोणताही संशय नाही.

कल्याणकर नागरिक म्हणून मला अभिमान वाटतो की आपल्याला व आम्हालाही अपेक्षित असलेल्या “स्मार्टसिटीच्या” दिशेने आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त श्री ई. रविंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाने पावले टाकण्यास सुरुवात केलेली आहे. ह्याच पद्धतीने जर वाटचाल चालू राहिली असती तर कदाचित राज्यातील पहिल्या स्मार्टसिटीचा मान आमच्या शहराला मिळाल्याशिवाय राहिला नसता.

ह्या शहराच्या दुर्दैवाने आपल्याच पक्षाचे आमदार, खासदार तसेच आपल्या मंत्री मंडळातील आपले सहकारी संपूर्ण ताकदीनिशी स्थानिक प्रशासनाच्या आणि पर्यायाने सार्वत्रिक जनहिताच्या विरोधात जाऊन मुठभर व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसत आहेत. सदर प्रकारात संबधितांकडून आपलेही नाव घेण्यात येत आहे.
.
कारवाईच्या विरोधात दबाव निर्माण करण्यासाठी आयुक्तांच्या बदलीच्या बातम्या जाणून बुजून “गुजराती” वृत्तपत्रांच्या आणि आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून पसरविल्या जात आहेत.

गेल्या अनेक महिन्यात आयुक्त श्री ई. रविंद्रन यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. प्रशासनातील अनेक बेशिस्त अधिकारी व कर्मचारी आज घरी बसवलेले आहेत. आमच्या हितासाठी सकाळी ६ वाजल्यापासून कल्याण डोंबिवली शहरांच्या गल्लीबोळात स्वतः फिरणारे आयुक्त ह्या शहराने आजवर पाहिलेले नाहीत. पूर्वी ३६५ दिवस आणि २४ तास भरून वाहणाऱ्या कचरा कुंड्या आयुक्तांच्या भितीने वाहायच्या थांबलेल्या आहेत.

असं असताना जर खरोखरच मुठभर व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडून आयुक्तांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला किंवा त्यांनी सुरु केलेल्या मोहिमेवर गदा आणली गेली तर ह्या शहरातील नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत ह्याची आपण नोंद घ्यावी ही विनंती.

सदर प्रकरणात लक्ष घालून आपल्या पक्षातील स्थानिक आमदार खासदार व आपल्या मंत्र्यांना योग्य ती “समज” देऊन आपण स्थानिक प्रशासन व आम्हा कल्याणकरांच्या पाठीशी उभे रहावे ही विनंती.

आपला

जबाबदार कल्याणकर
कल्याण पश्चिम - ४२१३०१
.
वर लिहिलेलं पत्र मी मा. मुख्यमंत्री साहेबांना मेलवर माझ्या वैयक्तिक नाव व पत्त्यासह पाठवलेले आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्हीही पाठवा
cm@maharashtra.gov.in आणि chiefminister@maharashtra.gov.in

शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

निषेध नक्की कोणाचा करायचा ?


सकाळी ८.२३ ला कल्याणहून दादरला जाणारी स्लो लोकल, ही गाडी कारशेड मधून येत असल्याने कल्याणला सहज जागा मिळते. ठाकुर्ली, डोंबिवलीला आणि मग मुंब्र्यापर्यंत बऱ्यापैकी गर्दी होते. ठाण्यात मात्र गर्दी बरीच कमी होऊन जाते.


आजही तसंच झालं मुंम्र्याला खूपच गर्दी झाली बराच आरडाओरडा चालू होता, प्रत्येक डब्यात आत शिरण्यासाठी जीव तोडून ढकला ढकली सुरु असतानाच गाडी सुटली. गाडीने वेग घेतला. सुसाट निघालेली गाडी कळव्याजवळ आली आणि मागच्या कोणत्यातरी दारातून एक जोरदार किंकाळी ऐकू आली. किंकाळी बाईची की पुरुषाची हेही कळलं नाही. “क्या हुवा ?” जो तो एकमेकांना विचारू लागला “अरे यार कुछ नहीं... कोई तो गाडीसे गिर गया” कोणी तरी माहिती पुरवली. “अरेरे बेचारा” दोन चार जणांना वाईट वाटलं.

कळवा आलं मग ठाणा ...मग मुलुंड. गर्दी चढत राहिली उतरत राहिली. लोक पुन्हा आपल्या गप्पा आणि मोबाईल मधे बिझी झाले. ज्यांना उतरायचं होतं ते हळू हळू दरवाजाकडे सरकू लागले.

नाहूर आलं, पडलेल्या माणसाचा विचार करत मी उतरलो. डोक्यात चालू होतं फेसबुकवर सणकून काही तरी लिहायचं रेल्वे प्रशासनाला, सरकारला अगदी पंतप्रधानांना पण जाम हाणायचं. बाकीच्यांचं मरू दे पण निदान मी तरी फार संवेदनाशील आहे हे अख्ख्या जगाला ओरडून सांगायचं, पटवून द्यायचं.
.
इतक्यात मी ज्या गाडीतून उतरलो त्याच गाडीच्या लेडीज डब्यातून एक तरुणी धाडदिशी Platform वर पडली. आजूबाजूचे लोक तिला उचलायला धावले. नशिबाने तिला फार लागलं नव्हतं .........मी लांबच होतो. नकळत घड्याळाकडे लक्ष गेलं. मी वळलो आणि ऑफिसकडे चालायला सुरुवात केली.

हे असंच चालत आलंय आणि असंच चालणार ..............निषेध नक्की कोणाचा करायचा ?

सरकारचा ? रेल्वे प्रशासनाचा ? त्याच गाडीत जीवाच्या आकांताने घुसू पाहणाऱ्या त्या माणसाच्या अपरिहार्यतेचा ? पोटापाण्यासाठी मुंबईत कुत्र्या मांजराचं जीणं जगणाऱ्या गर्दीचा ? खिडकीत बसून फक्त बघ्याची भूमिका वठवणाऱ्या माझ्यासारख्या लाखो “हतबल” माणसांचा ?
.
त्या पडलेल्या माणसाचं काय झालं माहित नाही .....जर वाचला नसेल तर मेणबत्त्या वगैरे घेऊन मूकमोर्चा निघेल. त्या मोर्चाला मात्र मी आवर्जून जाईन. त्याच्या कुटुंबाच्या दुःखात मी पण सहभागी आहे हे सांगायला आणि कोणाचा तरी निषेध पण तोही “मुक्याने” नोंदवायला. फेसबुकवर टाकायला एक सेल्फी पण काढेन.
.
कधी तरी मीही असाच .....लोकलच्या दारातून जीवाच्या आकांताने आत शिरायचा प्रयत्न करत असेन .......गाडी वेग पकडेल ......त्या माणसासारखा माझाही हात सुटेल ............

निदान तोवर तरी मी खूप संवेदनाशील आहे गर्दीपेक्षा वेगळा आहे हे ओरडून सांगत राहीन ...

सोमवार, ४ जानेवारी, २०१६

एलपीजी सबसिडी


१० लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न असणाऱ्याची एलपीजी सबसिडी बंद होणार**
.
काल परवा कुठे तरी वाचलं की १० लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न असणाऱ्याची एलपीजी सबसिडी बंद होणार ...........खरोखर चांगला निर्णय 
.
ह्याच १० लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न असलेल्यांच्या मुलांना मिळणारा आरक्षणाचा लाभ का नाही बंद होत ? आरक्षणाचे फायदे किती पिढ्यांना द्यायचे ह्यासाठी काही मर्यादा नाहीच घालता येणार का ?
.
माझ्यासमोर अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्या आईवडलांनी सरकारी नोकरीत आरक्षणाचे फायदे घेतले आता चिरंजीव स्वतः फायदे घेत आहेत आणि त्यांच्या पुढच्या पिढीसाठीदेखील हेच फायदे उपटण्याच्या तयारीत आहेत.
.
ह्या स्पर्धेच्या युगात सर्वांचा “Starting Point” सारखाच असला पाहिजे वगैरे सगळं मान्य आहे पण न्याय द्यायचा म्हणून अजून किती वर्ष “Finish Point” च्या पुढे नेऊन सोडायचंय ?