शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

मुकुंदराव देवभानकर


मुकुंदराव देवभानकर...

नात्याने माझ्या सासऱ्यांचे मामा........म्हणजे आमच्या सौ.चे आजोबा वय वर्ष ७४ पण आजतागायत एवढा तरुण माणूस मी बघितलेला नाही.

मागच्या आठवड्यात एका लग्नाच्या निमित्ताने अहमदाबादला गेलेलो. अनायसे जातोच आहोत तर दोन ठिकाणं आवर्जून बघायचीच असं ठरवलेलं. एक म्हणजे अक्षरधाम मंदिर आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं गुजरातचं मुख्यालय असलेलं “हेडगेवार सदन”. काही कारणाने अक्षरधाम मंदिर बघायचं राहून गेलं पण मुकुंद आजोबांना भेटणं आणि तेही संघाच्या गुजरातच्या मुख्यालयात, नशिबात होतं.

गेली ४७ वर्ष मुकुंद आजोबांनी पूर्णवेळ संघकार्यासाठी वाहून घेतलंय. आता देशभर भ्रमंती चालू असते त्यांची. मला थोडाफार राजकारणात रस असल्याचं ( अक्कल असल्याचं असं नाही म्हणालेलो मी ) लक्षात आल्यावर छान गप्पा रंगल्या. आजोबांसारखेच संघकार्याला वाहून घेतलेले अजूनही काही सहकारी मग आमच्यात सहभागी झाले. सुरुवातीला मी अक्कल पाजळली पण मग जाणवलं की मी लहान तोंडी मोठा घास घेतोय. गंमत म्हणजे त्या लोकांना त्याचं काहीच वाटत नव्हतं एखाद्या बरोबरीच्या माणसाशी चर्चा करावी तशीच चर्चा चालू होती. बोलता बोलता राजकारणाबद्दलचे माझ्या डोक्यातले बरेच किडे कधी निघून गेले ते कळलंही नाही.

आजोबांच्या खोलीतली असंख्य पण खूप नीटनेटक्या पद्धतीने रचून ठेवलेली पुस्तकं नक्की मला हसत असणार
.अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन वर्षानुवर्ष निव्वळ फ्लेक्सवर दिसणारे “कार्यसम्राट” वगैरे राजकारणी किंवा स्वतःच्या वाढदिवसाला कुठल्या तरी अनाथाश्रमात जाऊन काही तरी वाटून फोटो काढून घेणारे “ज्येष्ठ” वगैरे समाजसेवक आजवर खूप बघितले पण एकाच ध्येयासाठी ......समाजासाठी अख्ख आयुष्य वाहून घेऊनही त्याबद्दल चकार शब्द काढायला तयार नसणारी मुकंदआजोबांसारखी माणसं माझ्या माहितीत तर फारशी नाहीत

......May be he "IS NOT THE” greatest but yessss he is great

आता ह्या वयात पण आजोबांना सामान्य लोकांसाठी देशपातळीवर काही नविन काम उभं करण्याची स्वप्न पडताहेत.

एरवी बायकोने ढोसलल्याशिवाय निघताना मोठ्या माणसांना नमस्कार करायची मला आठवण होत नाही पण त्या दिवशी मात्र कोणी आठवण करून न देताही मनापासून मुकुंदआजोबांना नमस्कार केला

रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

मी पुरस्कार परत करणार.....



निषेध - पुरस्कार परत करणार.....

काल एक किलो तुरडाळ आणायला बायकोने वाण्याकड़े पिटाळलं ...... रुबाबात शंभराची नोट काढून वाण्याला दिली आणि एक किलो तुरडाळ मागितली.

माझ्याकड़े दयाभावाने बघत वाण्याने सांगितलं "इतने में तो आधा किलो आयेगा"
मी म्हटलं "अरे बाबा राज्य सरकारने तसं जाहिर केलंय"
"तो जाके सरकारसे ले लो" असं म्हणून तो दुसऱ्या customer कड़े वळला
त्या वाण्याने आणि पर्यायाने सरकारने एका मराठी मध्यमवर्गीय माणसाला दाखवलेली "असहिष्णुता" बघुन माझ्यातला "सहिष्णु" माणूस जागा झालेला आहे.

साहित्यिक नसलो म्हणून काय झालं मलाही पुरस्कार मिळालेला आहे. त्या वाण्याचा आणि पर्यायाने सरकारचा निषेध म्हणून तो पुरस्कार मी परत करायचं ठरवलं आहे.

१९८३ साली ओक बाग़ गणेशोत्सव मंडळातर्फे घेण्यात आलेल्या चमचा लिम्बु शर्यतीत भाग घेतल्याबद्दल मिळालेला हा पुरस्कार मी परत करतो आहे. राज्य सरकारने आपला प्रतिनिधी पाठवून तो घेऊन जावा.

टीप - पुरस्कार म्हणून मिळालेली ही ताटली आम्ही गेली 32 वर्ष वापरली असली तरी मी स्वतः ती घासुन ठेवलेली आहे.

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

संजय भंसाळीचा "बाजीराव मस्तानी"

























संजय भंसाळीचा "बाजीराव मस्तानी" येतोय. काल त्यातलं एक गाणं whatsapp वर पाठवलं कोणी तरी ....... चक्क बाजीरावांच्या पत्नी काशीबाई, मस्तानी बरोबर नाचताना दाखवल्या आहेत.


सिनेमा म्हटल्यावर थोडाफार मसाला घालावा लागतो वगैरे ठीक आहे पण इतका ? पैसे कमवण्यासाठी इतिहासाची इतकी मोडतोड़ ?

आधीच थोर ब्राह्मणद्वेष्टया इतिहासकारांनी बाजीराव ही व्यक्तीरेखा कधी "मस्तानी" पासून वेगळी करुन एक अपराजित सेनानी म्हणून मांडलीच नाही त्यात आता ह्या गल्लाभरु सिनेमाची भर.

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

असहिष्णुता ?

आमिर खानचा नविन सिनेमा येतोय का ?

मागे एकदा कुठल्या तरी सिनेमाच्या रिलीजच्या तोंडावर नर्मदा बचाओ आंदोलनात जाउन मेधाताईंच्या बाजूला बसलेला 

ते प्रकल्पग्रस्त बुड़ले धरणात की जीवंत आहेत हे माहितेय का त्याला ?

त्या कमाल खानचं समजु शकतो .....पण फुक्कट पब्लिसिटी मिळवायला आमिर खानला पण असले धंदे करावे लागतात का ?

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

बिहार विधानसभेचे निकाल

बिहार विधानसभेचे निकाल यायला सुरुवात झाली तसे भाजपचे सोशल मीडियावरचे विद्वान वाचाळवीर भलतेच कार्यरत झाले.
"दिल्लीत सुशीक्षीतांनी आप ला निवडून आणले मग पाणीपूरीवाल्यांकडून काय अपेक्षा ठेवणार" अशा आशयाची बेताल वक्तव्य भाजप कार्यकर्त्यांच्या फेसबुक वॉल वर झळकायला लागली.

खरं तर "पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला फसवणं सोपं होतं पण पाणीपुरीवाल्यांना फसवणं भाजपला अवघड गेलं" असंही म्हणता येईल की.

दीड वर्षापूर्वी मिळालेला विजय भाजपला अजुन पचवता आलेला नाही त्यात हा असा पराभव कुठून पचणार ?

उन्माद ....पक्षाच्या विरोधातले ते सगळे मुर्खच ही भूमिका ....वाचाळवीरता ...... हे सगळे गुण भाजपच्या पक्षशिस्तीचा भाग झालेत का ?

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

ऑफिस मध्ये "कांड"


आमच्या ऑफिस मध्ये रोज काही तरी "कांड" चालू असतात ..........

मलाही सोडत नाही कोणी ......आज माझ्या केबिनच्या बाहेर, माझ्या नावाच्या पाटीखाली हा उपद्व्याप करून ठेवलाय कोणी तरी .......

मला कल्पना आहे तशी हे डोकं कोणाचं असणार त्याची ....

........इन ऑफिसवालो से मुझे बचाओ........

रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

कोणत्या दिशेने चाललाय हा प्रवास ?

एक थोर चीनी विचारवंत म्हणायचे "जोवर मांजर उंदीर खातंय तोवर ते पांढरं आहे की काळे याने काही फरक नाही पडत "
वरवर बघितलं तर हा व्यवहारवाद सहज पटण्यासारखा आहे.
.
सरकार बाबत पण मला तसंच वाटायचं .....काम करतंय ना ? मग ते "भगवं" "हिरवं" किंवा निळे असलं तरी चालेल.
अनेक अडचणीचे उंदीर सरकारने मारलेत हे मान्य आहे पण....
.
मी काय बघायचं नाही हे सरकार ठरवणार
मी काय बोलायचं नाही हे सरकार ठरवणार
मी काय खायचं नाही हे सरकार ठरवणार
कोणत्या दिशेने चाललाय हा प्रवास ?

सोमवार, ७ सप्टेंबर, २०१५

"लग्न" भल्या भल्यांना सरळ करतं

"लग्न" भल्या भल्यांना सरळ करतं. बायको हा प्राणीच असा असतो की तिथे सगळेच "शेर" ढेर होतात. पूर्वी बिघडलेल्या मुलाना सुधारण्यासाठी त्यांचं लग्न लावून द्यायचे म्हणतात.
आता कळलं दिग्बीजय सिंग इतके दिवस शांत का आहेत ? त्यांनी शेवटचं बेताल वक्तव्य कधी केलं होतं ते तरी आठवतंय का ? बसलेच ना गप्प लग्न ठरल्यापासून ?

पप्पुला सुधारण्यासाठी हा उपाय ट्राय करायला हरकत नाही त्यांच्या "मम्माने"


शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

भेंडी आणि शेपु


कोणी कधी काय खायचं नाही हे इतक्या खोलात जाउन सरकार ठरवतंय तर मग .....

भेंडी आणि शेपुच्या भाजीवर वर्षातले फक्त 365 दिवस सरकारने बंदी घालावी अशी माझी मागणी आहे.

माझा मावसभाऊ म्हणतो मुळात भेंडी ही भाजीच नाही ..... बायका तिला मारून मारून तिची भाजी करतात आणि नवऱ्यावर सुड उगवायला त्याच्या ताटात वाढतात 

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०१५

बुद्धीवादी आणि बद्धकोष्ठी


बुद्धीवादी आणि बद्धकोष्ठी हे समानार्थी शब्द नसले तरी समांतर शब्द आहेत.
😊
दोन्ही प्रकारचे म्हणजे बुद्धीवादी आणि बद्धकोष्ठी लोक "काय, कसं आणि किती" करायचं ह्याचा विचार करण्यातच जास्त वेळ घालवतात ,,,,,
😊
😊
आणि पुन्हा "अपेक्षित" परिणाम घड़णं त्यांच्या हातात कधीच नसतं.
😊
दोघात फरक एकच असतो .
बुद्धीवादी माणसाला हे माहितच नसतं की हा आजार आहे 😜😜

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०१५

बाबासाहेब पुरंदरे
























बरं झालं शिवाजी महाराज ब्राह्मण नव्हते नाही तर “साहेबांच्या” जाती पातीच्या राजकारणात महाराज पण भरडले गेले असते.
पूर्वी कधी तरी काका विधातेच्या “संताजी” कादंबरीत एक उल्लेख होता. संताजी घोरपडे लहान असताना त्यांना शिकवणाऱ्या केशव भटांना त्यांनी विचारलं “स्वाभिमान आणि स्वामीनिष्ठा यात फरक काय “ केशव भटांनी दिलेल्या उत्तराचे नेमके शब्द मला आठवत नाहीत पण त्याचा अर्थ असा होता “स्वत:चा आणि स्वकीयांचा मान राखण्यासाठी जीवाची बाजी लावणं हा स्वाभिमान आणि स्वत:च्या स्वामीसाठी आप्त स्वकीयांच्या जीवावर उठायला तयार असणं ही स्वामीनिष्ठा”

“साहेबांच्या” श्वानपथकातल्या स्वयंघोषित इतिहासाचार्यांना ह्या पुढेही “साहेबांच्या धोरणानुसारच” नवीन नवीन शोध लागत राहतील आणि स्वामीनिष्ठेचं प्रदर्शन करण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखे शिव चरित्राचे कीर्तनकार त्यात भरडले जातील.... या सगळ्यात वेगळं किंवा आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.

मी इतिहासाचा अभ्यासक वगैरे नाही पण वाचक नक्की आहे. बाबासाहेब पुरंदरेनी महाराजांवर लिहायला बोलायला सुरुवात केली त्या आधी देखील महाराजांवर लिहीलं जात होतंच की, पण ती भाषा माझ्यासारख्या “मध्यमवर्गीय” अक्कल असणाऱ्याला न झेपणारी होती. तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी भगवत गीता साध्या सोप्या....त्या वेळच्या सर्वसामान्यांच्या भाषेत आणली....मला तुलना नाही करायची पण माझ्यासाठी ऋषीतुल्य बाबासाहेब पुरंदरेनी तसंच काहीसं केलं.

“साहेबांच्या” श्वानपथकात स्वेच्छेने भरती झालेल्यात मुंब्र्याच्या अनधिकृत वस्तीचा पुळका असणाऱ्या गावगुंडांपासून आयुष्यभर कुसुमाग्रजांवर भूंकून निर्लज्जपणे त्यांच्याच नावाचा पुरस्कार स्वीकारणारे पण आहेत याचं वाईट वाटतं.

काल तर ऐकलं की उदयनराजे भोसले पण आता बाबासाहेबांच्या विरोधात बोलताहेत .......हा विरोध त्यांनी सकाळी नोंदवला की संध्याकाळी हेही तपासून बघावं लागेल.

नकाच देऊ बाबासाहेबांना पुरस्कार काही फरक नाही पडत ...........महाराष्ट्राच्या घराघरात बाबासाहेबांनी लिहिलेलं शिवाजी महाराजांचं चरित्र आज भगवत गीता आणि ज्ञानेश्वरीच्या बरोबरीने जपलं जातं हाच खरा पुरस्कार आहे.

शनिवार, २५ जुलै, २०१५

हत्या– श्री.ना पेंडसे



लेखक – श्री.ना पेंडसे

पुस्तकाचं नाव वाचून मला वाटलेलं “हत्या” म्हणजे खून ह्या अर्थी, एखादी रहस्य कथा असावी पण मग कळलं ते कादंबरीतल्या एका व्यक्तिरेखेचं नाव आहे.
जेमतेम कळायला लागणाऱ्या वयातल्या एका मुलाची ही कथा. ढीगभर दुःख आणि गळ्यापर्यंत अडचणी सोसत पुढे जात राहणाऱ्या एका कोवळ्या जीवाची जीवघेणी धडपड. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता साधं दिसणारं पण वळणा वळणांनी पुढे जात राहणारं खिळवून ठेवणारं कथानक.

“तुंबाडचे खोत” प्रमाणेच तत्कालीन परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहते, वाचता वाचता आपणही त्या काळाचा, हत्याच्या आयुष्याचा एक भाग होवून जातो.


खूप छान कादंबरी 

शुक्रवार, २४ जुलै, २०१५

शांताराम - ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स




लेखक ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स
अनुवादक : अपर्णा वेलणकर

एक परदेशी गुन्हेगार भारतात येतो आणि मग इथलाच होवून राहतो. आत्मचरित्राच्या नावाखाली जवळपास १००० पानांचं एक थोतांड. माझ्या मते फार तर ३०% सत्य आणि ७०% कल्पना.

मुंबईतल्या अंडरवल्ड मध्ये हिरोगिरी करून, अनेक बदले वगैरे घेऊन, एकेकट्याने हाणामाऱ्या करून, समाजकार्य करून समाधान होत नाही म्हणून अफगाणिस्तानात जाऊन लढून, जिवंत परतलेल्या एका साहसावीराची सुरुवातीला खरी वाटणारी आणि नंतर नंतर कल्पनाविलासात भरकटलेली कादंबरी. जबरदस्त "मार्केटींग" मुळे अपेक्षा उंचावणारी एक पोकळ कथा एवढंच मला म्हणता येईल.

अपर्णा वेलणकरांनी केलेला अनुवाद मात्र मानावा लागेल. संपूर्ण पुस्तक मराठीतच प्रकाशित करून मग त्यावरून इंग्रजी अनुवाद केला असावा असं वाटावं इतपत उत्कृष्ठ अनुवाद.

गुरुवार, २३ जुलै, २०१५

पर्व - डॉ. एस. भैरप्पा


मुळ कन्नड लेखक डॉ. एस. भैरप्पा

अनुवाद उमा कुलकर्णी

माझ्या अंदाजाने महाभारत हा एक असा विषय आहे ज्यावर आजवर सगळ्यात जास्त लिहीलं आणि वाचलं गेलंय. मी आजवर वाचलेल्या आणि मला कळलेल्या महाभरतापेक्षा सर्वस्वी वेगळं "महाभारत" डॉ. भैरप्पानी "पर्व" मधे मांडलंय.

आजवर महाभारत म्हणजे चमत्कार आणि अमानवीय शक्ती प्राप्त असलेल्या चांगल्या / वाईट व्यक्तींमधला संघर्ष इतकंच कळलं होतं. पर्व मधे डॉ. भैरप्पानी चमत्कार किंवा अमानवीय गोष्टींना फ़ाटा दिलाय. चमत्कार गाळल्यामुळे कोणतीही व्यक्तीरेखा छोटी होत नाही उलट त्यामुळे प्रत्येक घटनेची कारणमिमांसा करणं सोपं झालं.

पर्वमधे चमत्कार नाहीत, प्रत्येक व्यक्तीरेखेला मानवी चेहेरा मिळालाय तसंच त्यांचं वागणं बोलणं त्यांच्या भावना ह्या प्रत्येक गोष्टीला human touch मिळाल्यामुळे पुस्तक वाचताना नकळत आपण स्वतः देखील महाभरताचा एक भाग बनुन जातो. चुक की बरोबर हे जरी ठरवता नाही आलं तरी प्रत्येक घटनेची माझ्या परीने मला कारणं शोधता आली.

डॉ. भैरप्पानी मांडलेले दोन मुद्दे पटले आणि मनात कायमचं घर करुन बसले.

१. युधिष्ठीराच्या जुगारातल्या पराभवाबद्दल लिहीताना डॉ. भैरप्पा म्हणतात ध्युत खेळायला संपत्ती लागते पण जिंकण्यासाठी अजुनही बरंच काही लागतं.
२. द्रौपदी बद्दलच्या इतरांच्या लालसेबद्दल लिहीताना डॉ. भैरप्पा म्हणतात पाच पतींबरोबर संसार आणि पर्यायाने शय्या सोबत करणाऱ्या स्त्री बद्दल समाजात जरा जास्तच लालसा निर्माण होते.

महाभारत एका वेगळ्या अर्थाने समजुन घ्यायचं असेल तर अवश्य वाचावं असं पुस्तक.


मंगळवार, २१ जुलै, २०१५

एम. टी. आयवा मारु - अनंत सामंत



लेखक - अनंत सामंत

पुस्तकाचं नाव वाचल्यावर वाटलं भाषांतर असेल पण नंतर कळलं मुळ मराठीच पुस्तक आहे.

अथांग सागर आणि हा सागर पार करायला लागणारी दुर्दम्य इच्छाशक्ती. निसर्गाशी, स्वतःच्या भावनांशी, मर्यादांशी अपुऱ्या साधनांच्या सहाय्याने टक्कर देत पुर्ण केलेली एक भयाण सफ़र.

बापाच्या विकृतीवर विकृत सुड घेणारी उज्वला, खेडवळ पत्नीला पाश्च्यात्य संस्कृतीत वावरायला तयार करायला धडपडणारा, प्रसंगी त्यासाठी तिच्या भावनांचा विचार न करता लैंगिक विकृतीकडे झुकणारा दीपक, ह्या सगळ्या छळवादातुन जवळपास वेडी झालेली उज्वला, वेश्यालय चालवणारी ॲना  प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे वेगळं अस्तित्व आहे तरी एक क्षण असा येतो की प्रत्येकाचा शेवटही एकच दिसु लागतो. त्यावेळी प्रत्येकाचं वागणं प्रत्येकाच्या मर्यादा अधोरेखित करतात.

जहाजावरचं आयुष्य, तिथली दडपणं तिथले धोके आणि ह्या सगळ्याला कसलीही भिक न घालणारा व्यवहार खुप संयमित भाषेत चित्रीत केलाय सामंतांनी.


पुस्तक वाचुन झाल्यावर मानवी विकृती, हव्यास, निसर्गाशी लढताना दिसणाऱ्या मर्यादा सगळं सगळं आपल्यावर अनेक ओरखडे उठवुन जातं.

गवत्या - मिलिंद बोकील



लेखक – मिलिंद बोकील

एका  भरकटत राहिलेल्या, अस्वस्थ पण सुशिक्षित आणि सुसंस्कृत भटक्याची ही कहाणी. अफाट लेखनशैलीमुळे गवत्या, बाज्या, अनु, मेहेर , गुरुजी, जानकी अगदी एकूण एक पात्र उभी राहतात डोळ्यासमोर.

सगळ्या भरकटण्यात एक सुसूत्रता दिसते, आकांडतांडव न करता, तत्त्ववेत्त्याचा आव न आणता स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून जाणवत राहतो.

खूप संथ कहाणीचा शेवट मात्र मला नाही आवडला .....”Typical Happy Ending “

एकूण कादंबरी मात्र “शाळा” इतकी  नाही पण खिळवून ठेवते एवढं नक्की 

मंगळवार, १९ मे, २०१५

Programming Language


आमच्या ऑफिस मध्ये PHP Developers साठी Interviews चालू आहेत .....

.मी उगाच तिथे लुडबुड करायला गेलो .....
.
आमच्या टीम लीडरने समोरच्या मुलीला प्रश्न विचारला .........तू कोणत्या Programming Language मध्ये तुझं Final Year चं प्रोजेक्ट केलं आहेस ?
...........English..........तिने शांतपणे उत्तर दिलं ........

.बिचारा टीम लीडर अजून शुद्धीत यायचाय ...........मी निट कलटी मारून बाहेर आलोय .........

गुरुवार, १४ मे, २०१५

तुंबाडचे खोत ( भाग पहिला ) - श्री.ना. पेंडसे



लेखक  - श्री.ना. पेंडसे

पेशवाईच्या अस्तानंतर कोकणातील बऱ्यापैकी सधन "खोत" घराण्याची  साधारण चार पिढ्यांची कथा. कादंबरी काल्पनिक असली तरी त्या त्या काळात चपखल बसणाऱ्या व्यक्तीरेखांमुळे कादंबरी वाचताना आपल्याला त्यातील व्यक्ती, घटना खऱ्या वाटु लागतात.

ब्राह्मण समाजाचं त्या काळातील समाजावरील वर्चस्व, दादा खोताच्या करारी, कठोर मुखवटयामागे लपलेली लिंगपिसाट वृत्ती, त्याच्या अघोरी शिक्षा ह्या सगळ्यातुन त्या काळातल्या सरंजामशाही मानसिकतेचं किळसवाणं दर्शन होतं. शेवटी अघोरी विद्या प्राप्त करण्यासाठी नरबळी देउन ह्या सगळ्याचा कळस होतो आणि त्या हव्यासापोटी तुंबाडकरांची एक पिढीच गारद होते.

पुढची पिढी म्हणजे गणेशशास्त्रींची पिढी, सभ्य सात्विक स्वभाव आणि आयुर्वेदाचा प्रचंड अभ्यास ह्या जोरावर पुन्हा घराण्याला प्रतिष्ठा प्राप्त होते पण शास्त्रीबुवांनंतर पुन्हा घराणं रक्तातल्या सरंजामशाहीकडे वळतं.

कादंबरीत वेगवेगळ्या व्यक्तीरेखांमधुन तत्कालीन सामाजिक परिस्थीतीवरही प्रकाश टाकला गेला आहे, टिळक श्रेष्ठ की गांधी ह्या वादाची पाळंमुळं त्या काळातील समाजव्यवस्थेत होती असंही जाणवतं. स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेणारा विश्राम, वाघावर झेप घेणारा बजापा, त्या काळच्या रुढींना आव्हान देत शाळेत शिकवणारी ताई, शाळेसाठी जीवाचं रान करणारा नरसु, प्रेमासाठी आयुष्याची होळी करणारी जुलाली अशा व्यक्तीरेखा नकळत आपल्या काळजात घर करुन जातात.

अन्नात केस आला म्हणुन रखेलीसारख्या ठेवलेल्या मोलकरणीचे केस भादरणारा दादा खोत
रोग्यांकडुन एका पैशाचीही अपेक्षा न ठेवता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झटणारा गणेशशास्त्री
खुले आम रखेल्या ठेउनही सख्ख्या भावांच्या बायकांशी संबंध ठेवणारे, प्रसंगी बलात्कार करणारे जुळे,
निडर साहसी पण जुलालीच्या प्रेमात तिला शेवटपर्यंत साथ देणारा बजापा
गुरासारखा मार खाउनही अन्यायाविरुद्ध पाय रोवून उभा राहाणारा आणि नंतर स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेणारा विश्राम, 
दिराकडून झालेल्या बलात्कारातून दिवस गेल्याचे कळल्यावर जीव देणारी गंगा
असा हा वळणावळणांचा, चढउतारांचा तुंबाडच्या खोतांचा इतिहास अस्वस्थ करणारा आहे.


मंगळवार, ५ मे, २०१५

शहेनशहा - ना.सं. इनामदार




लेखक  - ना.सं. इनामदार

साधारण ३०० वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या छाताडावर दैत्य होऊन नाचलेला एक क्रूर सेनानी - औरंगजेब

आजवर औरंगजेब म्हणजे खलनायक, एक क्रूर, पाशवी शक्ती लाभलेला इस्लामी शहेनशहा एवढंच ऐकलं होतं. इनामादारांनी कादंबरीच्या स्वरुपात मांडल्यामुळे असेल कदाचित पण मला मात्र हा खलनायक , खलनायक न वाटता एक जबरदस्त सेनानी, कुशल राजकारणी आणि कडवा मुसलमान वाटला. अफाट सत्तेची हाव असणं हे ३०० वर्षापूर्वी तरी निश्चितच "खलनायक" बनण्यासाठी पुरेसं नव्हतं. त्याने भावांना मारलं नसतं तर मुघल परंपरेप्रमाणे त्याला त्याच्या भावांनी मारलं असतं. तो जगला, त्याने राज्य केलं कारण तो त्यासाठी सक्षम होता, लायक होता.

त्याला शिकवल्या गेलेल्या, समजावल्या गेलेल्या इस्लामचं त्याने आयुष्यभर पालन केलं.

मला इतिहास माहीत नाही पण ना.सं. इनामदारांनी "मांडलेला" शहेनशहा मात्र मला खटकला नाही कारण त्याच्या वागण्याचं त्याच्याकडे Justification" होतं.

सोमवार, २७ एप्रिल, २०१५

नॉट विदाउट माय डॉटर - बेट्टी मेहमुदी


मूळ लेखिका बेट्टी मेहमुदी,

अनुवाद लीना सोहोनी

अमेरिकन संस्कृतीत वाढलेली एक तरुणी मूळच्या इराणी मुस्लीम डॉक्टरच्या प्रेमात पडते, त्याच्या भूलाथापाम्ना बळी पडून काही काळासाठी इराणला जायला तयार होते आणि माग मात्र त्याचा खरा चेहरा बघून उध्वस्त होत जाते. पराकोटीचे अत्याचार सहन करूनही लेखिका स्वदेशी परतते.

सतत प्रचंड अपमान , अनन्वित अत्याचार सोसूनही शेवटच्या क्षणापर्यंत वाघीणीसाराखी लढणारी एक समर्थ आई, एक एकाकी स्त्री एका बाजूला तर पराकोटीचा इस्लामी पुरुषसत्ताक समाज एका बाजूला. असा हा खरं तर असमान लढा.

वाचायला घेतल्यावर शेवटच्या पानापर्यंत पुस्तक हातून सोडवत नाही एवढं मात्र खरं.

बुधवार, २२ एप्रिल, २०१५

उचल्या - लक्ष्मण गायकवाड


लेखक - लक्ष्मण गायकवाड


१९८७ मधे प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकाच्या जवळपास ६/७ आवृत्ती निघाल्या. स्वातंत्र्याचा अर्थही पुरेसा न कळलेल्या, मुख्य प्रवाहापासुन जाणुन बुजुन लांब ठेवल्या गेलेल्या एका समाजाची ही कहाणी.

लेखकाने मनोगतात सांगितल्याप्रमाणे सदर पुस्तकाचे साहित्यीक मुल्य काय आहे ? पुस्तकातुन सामान्य माणसाला काय मिळालं ? असले वांझोटे प्रश्न पुस्तक वाचल्यावर पडत नाहीत. जे आहे ते गावाबाहेरचं खरकटं वास्तव.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच पोलिस "आजीच्या थानाला धरु धरु मारत होते " असं वाक्य येतं आणि माझ्यातल्या पांढरपेशा मध्यमवर्गीय हादरतो. आमच्या पिढीजात शहरी चौकटीतुन आम्हाला असलं हिडीस कधी काही दिसलंच नाही. संपुर्ण पुस्तक वाचताना आपण त्या किळसवाण्या जगाचा भाग होवुच शकत नाही. लांब बसुन एखादया डबक्यातल्या किडयांची वळवळ पहावी तितक्या अलिप्तपणे मी हे पुस्तक वाचलं.

उंदीर भाजुन खाणं, मांजर खाणं नुसत्या कल्पनेनीही आपल्याला मळमळल्यासारखं होतं पण कुठे तरी आपल्या स्वच्छ, हायजीनीक वगैरे जीवनशैलीवर घणाचे घाव घातल्यासारखं वाटतं. चोरीचं शिक्षण देताना मार खायचं पण शिक्षण दीलं जातं. ह्या शिक्षणात "नागडं करुन गांडीत मिरचु भरलं" तरी तोंड बंद ठेवायला शिकवलं जातं. पोलिसांचा खबरी म्हणुन लेखकाच्या आजोबाला राजरोस पणे कु-हाडीचे घालुन मारलं जातं तरीही कुठेही तक्रार न करता प्रकरण दाबलं जातं. एकुणच मुख्य प्रवाहातील कायदा व न्याय व्यवस्थेवरचा अविश्वासच ह्यातुन प्रतिबींबीत होतो.

पुढे एका प्रकरणात बापानेच मुलीला बायकोप्रमाणे "वापरल्याचा" उल्लेख येतो, जातपंचायतीकडुन त्याला शिक्षाही ठोठावली जाते. अशिक्षीत, असुनही किमान नितीमत्तेचं भान ह्या समाजाला असल्याची ही खुण वाटते.

ह्या जमातीवर चोर जातीचा शिक्का ब्रिटीशांनी मारला, व्ही. टी. ( आताचं छत्रपती शिवाजी टर्मिनस ) च्या इमारतींसारखाच आपण हा शिक्काही अभिमानाने जपला.

शिक्षणाशी दुरान्वयेही संबंध नाही, चोर म्हणुन नोकरी नाही, शेतीवाडी नाही अशा परिस्थीतीत पोलिस आणि इतर उच्च्वर्णीयांकडुन केली गेलेली पिळवणुक, लेखकाचा तक्रारीचा सुर कुठेच दिसत नाही जे आहे जसं आहे तसंच्या समोर ठेवलं गेलंय.

पुस्तकाच्या शेवटच्या भागात लेखकाने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणुन केलेले प्रयत्न दिसतात. दलितांचा वापर आजही फ़क्त "व्होटबॅंक" म्हणुनच केला जातो हे वास्तव समोर येतं. राजकारण्यांना दलित मतं हवी असतात पण सत्तेच्या सारीपाटात बरोबरीचं स्थान देण्यात आजही कमीपणा मानला जातो.

पुस्तक वाचुन झाल्यावरही मला सावरायला बराच वेळ लागला. आपणच आपल्याला प्रश्न विचारत राहतो आणि निरुत्तर होवुन आपलीच कीव करत राहतो.


रविवार, १२ एप्रिल, २०१५

राडा - भाऊ पाध्ये



लेखक - भाऊ पाध्ये

आपल्या पिढीला भाऊ पाध्ये हे नाव माहित असणं जरा अवघड आहे. मुळात भाऊ पाध्येंची पुस्तकं विकत मिळणंच खुप अवघड आहे. साधारण १९७५ साली प्रकाशीत झालेलं हे पुस्तक १९९६ साली निखिल वागळेंनी पुनः प्रकाशीत केलं.

एकंदर भाऊ पाध्येंचं लिखाण मला कायम परखड समाजवादाकडे झुकणारं वाटत आलय. "राडा" घडत जातो तो शिवसेना महाराष्ट्रात रुजली तेव्हाच्या काळात. शिवसेनेची तेव्हाची मानसिकता, आणि त्याचे समाजावर होत असलेले परिणाम ह्यांचं सुरेख चित्रण राडामधे वाचायला मिळतं.

सधन अण्णेगिरी कुटुंब, अण्णेगिरी कुटुंबातला लाडका मुलगा मंदार, लाडातुन आलेला हट्ट्ट्टीपणा, नैसर्गीक निडर स्वभाव तरीही आतुन खुप हळवा मंदार अण्णेगिरी ही राडा मधली सर्वात महत्त्वाची व्यक्तीरेखा भाऊ पाध्येंच्या लेखणीतुन समर्थपणे आपल्या समोर उभी रहाते. तुसडया, विक्षीप्त मंदारबद्दल कुठे तरी आत नकळत सहानुभुती निर्माण होते.

शिवसेना शाखाप्रमुख नाना खारकर, त्याची बहिण ( मंदारच्या भाषेत "रांड) शालिनी, फ़ंटा, मनवेल, खुबसुरत काकु, दारुचा अड्डॆवाला गजु अशा सगळ्या व्यक्तीरेखांमधुन त्या वेळच्या एकंदर राजकीय, सामाजिक परिस्थितीबरोबरच मानवी मनाचे खेळही उलगडुन दाखवले आहेत.

घरच्यांशी पटलं नाही म्हणुन ऐश्वर्यावर लाथ मारणारा मंदार शराबी मधल्या अमिताभ ची आठवण करुन देतो, विनाकारण शालिनीला छळण्यातुन मंदार एकंदरच समाजातील शालीनतेचे बुरखे घेउन वावरणा-या वर्गालाच आव्हान देतो, नाना खारकर आणि मंडळींना नडताना मंदार झुंडशाही विरुद्ध पाय रोवुन उभा ठाकतो. एकंदरच मंदार "लार्जर दॅन लाईफ़ " वाटायला लागतो तितक्यात त्याच्या हातुन अनावधानाने खुन होतो, तेव्हा मात्र मंदार सामान्य माणसासारखा वागुन आपल्याला पुन्हा जमिनीवर आणुन ठेवतो.

संपुर्ण कादंबरीमधे "खुबसुरत काकु", रांड शालिनी " असे उल्लेख वारंवार येत रहातात आणि आपल्या मध्यमवर्गीय, सांस्कॄतिक वगैरे विचारसरणीला लाथा हाणत राहतात. भाऊ पाध्येंचं लिखाण आजच्या काळात एवढं झोंबतं तर १९७५ साली किती आग लागली असेल.


शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

एका दिशेचा शोध - संदीप वासलेकर


लेखक - संदीप वासलेकर

संदीप वासलेकरांनी मांडलेले मुद्दे, दीलेली आकडेवारी थक्क करणारी आहे. भारत एक आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे असं एक चित्र सातत्याने आपल्यासमोर उभं केलं जातं. ऐकायला कितीही गोड वाटलं तरी अर्थिक महासत्त्ता वगैरे बनणं  म्हणजे हे पोकळ स्वप्नच आहे ही वस्तुस्थिती वासलेकरांच्या ह्या पुस्तकातुन समोर येते.

सरकार किंवा वित्तीय संस्थांकडुन जी आकडेवारे दिली जाते त्या पेक्षा न दीलेली आकडेवारी बरीच मोठी असते.  अर्थिक ताकदीत जरी भारत पहिल्या पाच दहा देशांमधे असला तरी एकुण नागरी सुविधा, आरोग्य, शिक्षण अशा इतर मह्त्त्वाचे निष्कर्ष लावले तर मात्र आपण पहिल्या शंभरात पण नसु.

नुसती आकडेवारी मांडुन, निष्कर्ष काढुन वासलेकर थांबत नाहीत तर त्यांनी मार्गही सुचवलेत.


अभ्यासण्यासारखं पुस्तक.

बुधवार, ८ एप्रिल, २०१५

कंपनी ऑफ़ विमेन - खुशवंतसिंग



लेखक -- खुशवंतसिंग अनुवादीत

खरं तर खुशवंतसिंगांचं नाव बघुन पुस्तक घेतलं पण पुस्तक तद्दन बाजारु आहे. फ़ुटपाथवर मिळणाऱ्या "तसल्या" पिवळ्या पुस्तकांपेक्षा जरा बरं म्हणता येईल एवढी नको त्या गोष्टींची वर्णनं. पुस्तक नक्की कशावर, आणि का लिहीलंय ते शेवटपर्यंत समजलं नाही.

एक घटस्फ़ोतित उद्योजक, त्याच्या मोकाट, भरकटलेल्या आयुष्य़ाची ही कहाणी. पुस्तकाचा ८०% भाग "रसाळ" वर्णनांनी भरलेला. शेवट मात्र एखाद्या बोधकथेसारखा, संदेश वगैरे देणारा.

सोमवार, ३० मार्च, २०१५

ब्लास्फेमी - तेहमिना दुर्रानी


लेखिका - तेहमिना दुर्रानी 

खरंच मुळापासुन हादरवणारं पुस्तक. पुस्तकाची पार्श्वभुमी जरी इस्लामी असली तरी पुस्तकातल्या पुरुष व्यक्तीरेखा एकाच जागतिक मानसिकतेचं प्रतिनिधीत्व करतात. थोडा वेगळ्या पद्धतीने विचार केला तर एकाच वेळी स्त्रीची अनेक रुपं बघायला मिळतात.

नवऱ्याचे अनन्वित अत्याचार मुकाटयाने सहन करणारी एक "सहनशील स्त्री"
स्वतःच्याही नकळत कोणावर तरी मोहुन जाणारी हळुवार "प्रेमिका"
मुलीसाठी, मुलीला अशा अत्याचारापासुन वाचविण्यासाठी पाप पुण्याचा विचार न करता मार्ग शोढणारी "माता"
संयमी आतल्या आत धुमसत राहणारी "आणि संधी मिळताच जीव तोडुन वार करणारी  "रणरागिणी चील"


अफ़ाट पुस्तक आहे.

बुधवार, २५ मार्च, २०१५

पॅपिलॉन - हेन्री शेरीयर




मूळ लेखक हेन्री शेरीयर –

अनुवाद रविंद्र गुर्जर

एका फ्रेंच कैद्याची आत्मकथा. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अचाट साहसी वृत्ती एवढ्या भांडवलावर ८ ते १० वेळा तुरुंग फोडून पलायनाचा प्रयत्न करणारा कथा नायक म्हणजेच स्वतः लेखक. वरकरणी सत्यकथा वाटत असली तरीही सुरुवातीचा काही भाग सोडला तर मला मात्र निव्वळ बाजारू "फिल्मी" कथा वाटली. सहज विश्वास ठेवता न येणाऱ्या घटना एवढ्या सातत्याने घडत राहतात की विश्वास ठेवणंच अवघड होत जातं.

कथानक ज्या काळात आणि जिथे घडले त्या काळची तिथली परिस्थिती कदाचित वेगळी असेल पण ९०% घटना मला तरी अशक्यप्राय वाटल्या.

एक साहसकथा म्हणून वाचायला ठीक आहे पण "ग्रेट" वगैरे नाही वाटलं मला पुस्तक.

बुधवार, १८ मार्च, २०१५

कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला ? - शेषराव मोरे


लेखक - शेषराव मोरे

पुस्तकाबद्दल अनेक परस्परविरोधी लेख निरनिराळ्या वृत्तपत्रात आणि इंटरनेटवर वाचनात आले आणि पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण झालं म्हणून पुस्तक घेतलं. पुस्तकात मांडलेली मतं चूक की बरोबर त्यावर इतिहासाचे किंवा समाजशास्त्राचे अभ्यासक चर्चा करत राहतील पण एक वाचक, एक भारतीय नागरिक म्हणून काही गोष्टींची नोंद घ्यावीशी वाटली.
१. १८५७चं बंड मुळात इस्लामी राज्यकर्त्यांनी पुरस्कृतकेलेलं बंड होतं.

२. ब्रिटीश राज्यसत्तेने ह्या बंडाचा सूड एवढा भयानक पद्धतीने घेतला ज्याची तुलना हिटलरने केलेल्या ज्यू हत्याकांडाशीच होऊ शकते. दिल्लीतल्या प्रसिद्ध जामा मशिदीचा वापर अनेक महिने घोड्यांच्या तबेल्यासाठी केला गेला. चौकाचौकात हजारो मुसलमानांना फाशी दिली गेली. मिर्झा गालिबने लिहिलेलं खरं मानायचं झालं तर एकट्या लखनौ मध्ये मुस्लिमांची संख्या अडीच लाखावरून एक हजारावर आली. मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना परागंदा होण्याची वेळ भारतीय इतिहासात पहिलीच असावी.

३. मोगल खानदानातील २९ पुरुषांना संपविण्यात आलं.

४. स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातसर अहमदयांनी प्रथम मांडली. जीना त्या वेळी बहुदा जन्मालाही आले नसावेत

५. राष्ट्रवादी मुस्लीमांना अखंड भारत हवा होता पण हिंदुच्या बरोबरीने सत्तेत भागीदारी ( ५०%) हवी होती ( जेमतेम १५% असूनही )

अतिशय विचारपूर्वक आणि मुद्देसूद केलेल्या मांडणीमुळे संपूर्ण पुस्तक वाचनीय आहे. फाळणीबाबत बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला विचार ह्या विषयावर पुरेसा बोलका आहे.
जर हिंदुस्थान अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते...
मुसलमान ही शासनकर्ती जमात बनली असती... जेव्हा फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्‍वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंध, महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मला एकच वाटतंआज पाकिस्तान आणि पाकिस्तानी मानसिकता सीमेच्या पलीकडे आहे, मधे पोलादी भारतीय लष्कर आहे तरीही आपल्याला एवढा उपद्रव आहे, हीच कीड सीमेच्या अलीकडे असती तर तुमचं आमचं आयुष्य १००% नरकच झालं असतं.


रविवार, १५ मार्च, २०१५

बकऱ्याची बॉडी - समर खडस



लेखक - समर खडस

अफाट पुस्तक, प्रत्येक कथा अफाट, हलवून टाकणारी. स्वतःची समाजवादी विचारसरणी न लपविता खडस स्वतःला समाजवादी म्हणविणाऱ्यांचे बुरखे सहज फाडून काढतात. so called "System" वर हल्ला चढवताना हल्लेखोरांच्या "मर्यादा" स्पष्ट करून दाखवायलाही खडस कचरत नाहीत.

बकऱ्याची बॉडी खेरीज "भायेरची", "नशीब", "असे हे विलक्षण जग", "बेगम", "रेताड", "त्या तिथे", "तवंग नाही तलावात" ह्या कथा असलेलं हे पुस्तक एकदा हातात घेतलं की सोडवत नाही.

भाऊ पाध्येंची आठवण होते प्रत्येक कथा वाचताना. खूप दिवसांनी एवढं "सकस" काही वाचायला मिळालं.

मंगळवार, १० मार्च, २०१५

एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर



लेखिका – वीणा गवाणकर

आजपासून साधारण दीडशे वर्षांपूर्वी कापसावर अवलंबून असणाऱ्या दक्षिण अमेरिकेतील शेतकऱ्यांसाठी “देवदूत” ठरलेला एक कृष्णवर्णीय संशोधक म्हणजे  “कार्व्हर” आयुष्यभर फक्त कष्ट आणि कष्टच उपसत, सरळ संपन्न आयुष्य नाकारून समाजासाठी, सामान्य शेतकऱ्यांसाठी राबलेला एक “संत” असंच त्याच्या बाबतीत म्हणावं लागेल. वर्णभेदाच्या झळा सोसूनही कोणताही द्वेष मनात न ठेवता सर्वांसाठीच आयुष्यभर झटला हा प्राणी.
अफाट बुद्धिमत्ता, कमालीचा सोशिक स्वभाव स्वीकारलेल्या कामावरची निष्ठा अशा गुणांचं अनोखं रसायन असणारा कार्व्हर वीणा गवाणकरांनी खूप ताकतीने मांडलाय.

१००% संग्रही असावं असं पुस्तक